पटवारी संतोष पवार यांच्या हत्येचा बिगर सात बारा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : हिंगोली जिल्ह्यात पटवारी संतोष पवार यांची खुलेआम भर दिवसा हत्त्या झाली त्याची पुनरावृत्ती पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी पांढरकवडा तहसीलदार मार्फत उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.

पुढें निवेदनात नमूद आहे की,सदर घटना माणुसकीला च नव्हे तर लोकशाहीला काळीमा फासणारी आहे कारण कोणत्याही सरकार मध्ये महासुल विभाग हा अतिशय महत्वाचा भाग असुन त्याच्या कणा म्हणजे पटवारी आहे त्याचीच भरदिवसा हात्त्या होत असेल तर या पेक्षा आपल्या सरकारचे दुर्दैव कोणतेही दुसरे नाही म्हणून पटवारी संतोष पवार यांच्या हत्येची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी करुन लवकरच बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पटवारी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे सहीत दिलीप मडावी, पुरुषोत्तम कोदापे, नीलखंड मडावी, नागोराव मडावी, शंकर मरस्कोल्हे, रामचंद्र सिदम, रामकिसन कुमरे यासह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे महिला अध्यक्षा श्रीमती रेश्मा अगिलवार उपस्थित होत्या.

गोरज येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोरज येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहेत. 

निर्मला किसन आत्राम (अंदाजे वय 38) असे वीज पडून मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुपारी गोरज शेतशिवारात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करित असताना मृतक महिला गावाच्या दिशेने निघाली असता दुपारी 3.15 वाजता च्या दरम्यान घराच्या दारात ती पोहचण्याच्या अगोदरच गावाच्या जवळच वीज पडल्याने निर्मला आत्राम ही विवाहित महिला जागीच मृत पावल्याचे माहिती आहे. 

आज दि. 30/8/2024 रोज शुक्रवारला दुपारी दोन अडीज वाजता च्या दरम्यान गोरज परिसरात ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती, पावसामुळे ती घराकडे निघाली असता अगदी गावाच्या लगत असलेल्या एका बंड्या जवळच अचानक वीज पडून निर्मला आत्राम या महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

तीच्या पश्चात पती, दोन मुलं असा बराच आप्त परिवार आहे. 

हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ वणीत काम बंद आंदोलन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आली. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांना जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा विदर्भ पटवारी संघ, नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ, उपविभागीय शाखा वणी तलाठी संघाने निषेध व्यक्त केला असून काल वणीत काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

मौजे आडगांवं रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या झालेली असून या भ्याड हल्याचा विदर्भ पटवारी संघ तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून ही हत्या एका तलाठ्याची नसून ही समग्र महसूली व्यवस्थेची हत्या आहे. अशी विदर्भ पटवारी संचाची धारणा झाली आहे.

सदर घटनेतील दोषीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा तसेच तलाठी/मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी/पटवारी/मंडळाधिकारी समन्वय महासंघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काल विदर्भ पटवारी संघ नागपूरचे वतीने गुरुवार दि.29/08/2024 रोजी उपविभाग वणीतील सर्व तलाठी एक दिवशीय कामबंद आंदोलन पुकारत कडकडीत निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान,वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वणी उपविभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी व तलाठी कर्मचारी उपस्थित होते. 

तिकडे रोगराईने डोकं वर काढले इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडावाने वंचित बहुजन आघाडी आक्रमक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात उप विभागीय अभियंता, वणी यांना निवेदन देण्यात आले. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.

शहरात विविध रोगराई ने डोकं वर काढले असता शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने उष्णतेच्या उकाड्याने वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून वणीकरवाशी व परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत विचारणा करतोय म्हटलं तर कोणीही बोलायला तयार नसल्याने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी सार्वजनिक करावे अशी, मागणी निवेदनातून करण्यात आली. विजेची तक्रार केल्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला आहे. वरील नमूद सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिष पाते, सह मिलिंद पाटील, प्रदीप मडावी, शारदा मेश्राम, उत्तम मडावी, संतोष पेंदोर, शिवेंद्र ब्राह्मणकर, गजानन दामोदर, विलास दुर्गे, कपिल मेश्राम, मारोतराव कोठेकर, सिद्धार्थ गोमासे, अर्चना नगराळे, प्रशांत गाऊत्रे, विशाल देठे, वैशाली गायकवाड, बुद्धघोष लोणारे,प्रणिता ठमके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वणीत दहीहंडी चा थरार: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : दहीहंडीचा उत्सव म्हटलं की मुंबई आणि ठाण्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे आपण ऐकलंच आहे. पणमात्र, विदर्भात तरी प्रत्यक्षात खूप कमी बघितलं जात म्हणायला हरकत नाही. मात्र, तेच आता प्रत्यक्ष बघण्यासाठी तयार रहा, कारण मनसे घेऊन येत आहे, सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सव. उद्या शुक्रवारी 30 ऑगस्ट ला सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

वणी शहरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. हे मागील वर्षीपासून आपण कुतूहलाने पाहत आहोत. यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वावर मनसे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येत आहे. या मनसे दहीहंडी उत्सवाची जय्यत झाली असून उद्या (ता.30) रोजी या उंच अशी दहीहंडी चा थरार वणीकरांना थेट अनुभवायला मिळणार आहे. या उत्सवात मराठी सिनेअभिनेत्री माधुरी पवार ही देखील उपस्थित असणार आहे. त्यामुळे ही 'दहीहंडी' आणखीनच शिगेला पोहचली आहे. 

शासकीय मैदान येथील भव्य पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा होणार आहे. विशेष म्हणजे माधुरी पवार या सिनेअभिनेत्रीला दहीहंडी उत्सवाकरिता मनसे कडून खास आमंत्रित करण्यात आले आहे. दिलखेचक दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोविंदा पथकं वणीत दाखल होणार आहेत. 

मुंबई, ठाण्याप्रमाणे विदर्भातील वणी येथे उद्या होणाऱ्या सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्याकरिता व हर्षउल्हासाच्या वातावरणात सहभागी होण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.