वणी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चांगलीच आक्रमक झाली असून काल दि.31 जुलै रोजी विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. 

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधी साठा देखील वेळेवर उपलब्ध राहत नाही, रुग्णालयामध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही, प्रसुती गृहाची देखील दुर्दशा झाल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशातच वणी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर आणि आत मध्ये कचऱ्यांचा ढिगाळा मोठ्या प्रमाणात साचला असून यामध्ये सरपटणारे प्राणी विंचू डाळ आणि साथीच्या आजाराची देखील वाढ होताना वणी शहरात दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये एखादी सरपंच झालेला पेशंट असो वा प्रसुतीकरिता गेलेली महिला तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना चंद्रपूर रेफर करण्यात येते. मात्र, अशीच घटना घडली वणीच्या शास्त्रीनगर येथील एका परिवारा सोबत बापलेकाला सर्प दंश झाला. मात्र, उपचार न मिळाल्याने चंद्रपूर रेफर करण्यात आले अशातच त्या बालकाचा वाटेतच मृत्यू झाला.

मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या ट्रामा केअर देखील शोभेची वस्तू बनल्याचे चित्र वणी शहरात दिसत आहे. मात्र,आरोग्य मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन वणीकरांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यवतमाळ युवा जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. निवेदनावर किशोर काळे, शादाब अहमद, धनराज येसेकर, जावेद सय्यद, रितिक चांदेकर, साहिल शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.

राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय

श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी दि. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

श्री. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.

श्री. राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.


उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने कुमार अमोल सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सवित्रीबाई फुले गुण गौरव समिती, मारेगाव च्या वतीने दिल्या जाणारा "विद्यार्थी गुण गौरव" आयोजित करण्यात आला. यात तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून यवतमाळ सत्ता चे तालुका प्रतिनिधी तथा सह्याद्री चौफेर चे मुख्य संपादक कुमारअमोल कुमरे यांना तहसीलदार उत्तम निलावाड साहेब व मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांच्या हस्ते ३१ जुलै रोजी शेतकरी सुविधा केंद्र येथील सभागृहात शाल व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कुमार अमोल कुमरे यांनी आपल्या अल्पवाधित वेळात किंबहुना डिजिटल युगात सह्याद्री चौफेर ई पेपर ची निर्मिती करून पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून वणी विधानसभा क्षेत्रा सह मारेगाव तालुक्यापासून तर मुंबईपर्यंत बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. 

सामाजिक पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्य व शोध पत्रकारितेत त्यांनी मागास, दुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यात प्रश्नांना वाचा फोडली. कुमारअमोल कुमरे यांच्या पत्रकारितेतील या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीने त्यांची सन २०२३-२४ च्या तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली होती.

दीपक चौपाटी परिसरात गॅरेज'ला भीषण आग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील चौपाटी परिसरातील 'किंग स्कुटर' गॅरेज'ला अचानक आग लागली, ही घटना काल मंगळवारी (ता. 30) ला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली असून यात लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
शहरातील दीपक चौपाटी परिसरात किंग स्कुटरचे मोटारसायकल दुरुस्ती गॅरेजचे दुकान होते. त्या गॅरेज ला अचानक आग लागली. आगीने पुर्ण दुकानाला कवेत घेत पाहता पाहता रौद्र रूप धारण केले होते. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले असुन संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
दरम्यान,नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप तरी अस्पष्ट असून या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

रंगनाथ स्वामी मंदिर जवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती.

विजय बोथले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज शहरात काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बैठकीत सर्वानुमते काँग्रेस कमिटी च्या तालुका उपाध्यक्षपदी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात व काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पाटिल ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय बोथले यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विजय महादेव बोथले (कुंभा) यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून, पक्षात ते गेली पंधरा वर्षापासून सक्रिय व प्रामाणिकपणे काम करत असल्याने काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे व जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी त्यांच्या पक्षातील कामाची दखल घेत मारेगाव तालुका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
यावेळी पद निवडीला उत्तर म्हणून, आपण रात्रंदिवस मेहनत करून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करून पक्षाची सर्वधर्म समभाव ही भावना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे यावेळी बोलताना विजय बोथले यांनी सांगितले. 
ते या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावर, बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर, माजी सरपंच विजय घोटेकर, माजी पंचायत समिती सदस्य गजानन खापणे सह आदींना दिले.