विद्यार्थी तथा नागरिकांसाठी मार्डी-मारेगाव बस सेवा उपलब्ध करा - शिवसेना (उबाठा)

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी परिसरातून जवळपास 200 ते 250 विद्यार्थी मारेगाव येथे विविध शाळा, कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी खासगी वाहनाने ये-जा करतात. मात्र, महामंडळाकडून एकसुध्दा बस फेरी नसल्याने विद्यार्थी तथा नागरिकांकरिता बस फेरी कायमची सुरु करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना (उद्धव बाबासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने वणी आगार प्रमुखांना देण्यात आले.

मार्डी परिसरातील विद्यार्थ्यानाचा वाढता आलेख पाहता, मोठ्या प्रमाणात संख्या आहेत. परंतु त्या मानाने विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यास महामंडळाची बस उपलब्ध नाही. मात्र, विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेऊन आपले नाईलाजाने ज्ञानार्जन घेत आहे, परंतु हे अवैध खासगी वाहतूक जीवघेणा ठरत असून नुकताच काही दिवसाआधी एका 10 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये दुःखद निधन झाले. यास जबाबदार कोण? तसेच मार्डी परिसरामधुन जवळपास 20 ते 22 गावामधील लोकांना शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यांची सुध्दा पुरती गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

सदर परिसरातील जवळपास 200 ते 250 विद्यार्थी मारेगाव येथील शाळा महाविद्यालयात येतात, संबंधीत शाळा-कॉलेज यांनी दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थी तथा नागरिकांसाठी महामंडळ बसची तत्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) मारेगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

पुढे निवेदनात असेही म्हटलं आहे की, आमच्या दिलेल्या पत्राचा विचार केला गेला नाहीत व दिवाळी पुर्वी बसची व्यवस्था करण्यात आली नाही, तर अन्यथा चक्काजाम आंदोलन करू, दरम्यान उद्भवणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. यावेळी शिवसेना (उबाठा) चे डॉ. मनिष मस्की सह माजी पं स.सभापती, तथा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे; राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन...

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

जालना : सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत वेळ देत उपोषण तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून थोडा वेळ देऊ.

पण आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही. तुम्ही वेळ घ्या, पण आम्हाला आरक्षण द्या. मात्र आता दिलेला हा वेळ शेवटचाच असेल. आम्ही सरकारला 2 जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत, असं सांगत मनोज जरांगे यांनी तूर्तास उपोषण सोडत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर नऊ दिवसानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण सुटलं आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार आहे. तसं आज ठरलंय. त्यांनी हे मान्य केलंय. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी विशेष सांगतोय. अर्धवट आरक्षणाचा निर्णय झाला असता तर आपला एक भाऊ नाराज झाला असता तर दुसरा खूश झाला असता. दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे. एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू या मताचा मी नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करा. वेळ घ्यायचं तर घ्या. पण सगळ्या भावांना आरक्षण द्या, असं ठरलं. त्यांनी ते मंजूर केलं. ही समिती महाराष्ट्रभर काम करेल. अहवाल देईल. आम्ही त्यांना सांगितलं ही शेवटची वेळ आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.


विहार लेक पवई येथील वासनेचा बाजार मांडलेली सर्व हॉटेल्स बंद करा- डॉ. राजन माकणीकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारे विहार लेक पवई येथील वासनेचा खुलेआम बाजार मांडणारे सर्व हॉटेल्स तात्काळ बंद करावेत अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

या परिसरात के. अशोक राय यांच्या टुरिस्ट हॉटेल सह एक्स प्रेस हॉटेल आणि स्टुडिओ, हॉटेल ग्रीन वूड, हॉटेल ग्रीन व्हील, हॉटेल कॅफे विहार तसेच हॉटेल हील विव नावांची हॉटेल्स असून केवळ आणि केवळ "चमडी पे दमडी" या उक्तीप्रमाणे वासनेचा बाजार मांडला गेला आहे. प्रेमियुगल आपली शारीरिक भूक भागविण्यास तोंडाला रुमान बांधून या ठिकाणी येतात. आणि दुस्कृत्य करतात, हे भविष्यात जोडप्यांना अवघड होऊन बिकट परिस्तिथीला तोंड द्यावं लागत.

या सर्व हॉटेलच्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार लेक तलाव आहे. या तलावात या हॉटेलात येणाऱ्या एखाद्या पर्यटकाने काही टाकले तर पूर्ण मुंबई मृत्युंच्या दारावर पोहोचू शकते. त्यामुळे अश्या ठिकाणी हॉटेल्स ना ठेवणे कधी श्रेयस्कर ठरेल असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. माकणीकर म्हणाले की, विस्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार या हॉटेल्स मध्ये अल्पवईन प्रेमियुगलांना सरळ प्रवेश मिळतो. हॉटेल्सच्या वतीनेही इच्छुकांन्ना व पैसे मोजणाऱ्यांना वेगळी व्यवस्था करवून त्यांना सहवासासाठी मुली पूर्वील्या जातात. या गोष्टींची खबर पोलिसांना असूनसुद्धा ते न्यायालयाने शारीरिक संबंधाला परवानगी दिली, असं सांगून हॉटेलच्या वासनेच्या बाजाराला सकारात्मक आणि कायदेशीर रूप देतात.

आंबेडकरी ऍक्टिव्हिस्ट व समजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी या सर्व हॉटेल चे ऑडिट तपासावे, अग्निशमन दल व पालिकेच्या परवानग्या तपासाव्यात, येणारे जाणारे कॉल लॉग, सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व फुटेज तपासावे, जमा केलेली कागदपत्र व नोंदी घेतलेले रजिस्टर तपासावे. अशी मागणी करुन सरसकट वासनेचा बाजार बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दि.5 नोव्हेंबर रोजी राजभवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉ.माकणीकर दिला आहे.

आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ; २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा..!

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबरोबरच त्यांना २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले.

राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सद्य:स्थितीत राज्यात ८० हजारांवर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात ७ हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५ हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात ३ हजार ६६४ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज ६ हजार २०० रुपये मानधनवाढ जाहीर केली आहे. गटप्रवर्तकांना केंद्र शासनस्तरावरूनही ८ हजार ७७५ रुपये मानधन मिळत असून, त्यांना आता २१ हजार १७५ रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना २ हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.


दहावी, बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; "इथून" करा डाउनलोड..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
लेखी परीक्षा कधीपासून सुरु होणार? 
बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधीपासून सुरु होणार?
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आज (02 नोव्हेंबर 2023) ला उपलब्ध होणार आहे.