मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला पडला विसर...ना फॉगिंग मशीनद्वारे फवारणी; ना स्वच्छतेचा जागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट-ग्रामपंचायत मच्छिन्द्रा मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना आजपर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने कुठलीही जंतुनाशक कीटकनाशक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी न केल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येवून विविध आजार डोकं वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या पावसाचे दिवस चालू असल्याने अनेक रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नाल्या गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. साहजिकच ही जबाबदारी ग्रामपंचायत यांची आहे. परंतु मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळा सुरू होऊन एक- दोन महिन्याचा कालावधी लोटूनही मुहूर्त सापडलेला दिसत नाही, किंबहुना ग्रामपंचायत हेतू पुरस्पर दुर्लक्ष याकडे करित असल्याचे बोलल्या जात आहे. 
पेसा ग्रामपंचायत, पावर सुशिक्षित युवकांकडे असून देखील गावात घाणीचे साम्राज्य. नियोजन शून्य असल्यामुळे विकास थंड बस्त्यात आहे. शासन योजना देतील त्या आम्ही राबवू यावर डिपेंड राहून चालणार नाहीतर सरपंच महोदयांनी तालुका स्तरावर जाणे येणं, भेटीगाठी, योजनाची माहिती काढणे, योजना राबविणे, योजना खेचून आणणे हे अपेक्षित असते. तसेच आपल्या गावात जाऊन गावपातळी वरील किरकोळ समस्या कडे लक्ष द्यायला हवे. परंतु असे होतांना दिसत नाही. मात्र, सध्या पावसाळा सुरु आहे, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी कधी करणार? असा सवाल आहे. 

विशेष म्हणजे सरपंचाचे विद्यार्थी दशेच वय,त्यामुळे वेळेअभावी अनुभव कमी पडत असल्याने आता तालुका पंचायत समिती प्रशासनाने धूर फवारणीचे तत्काळ आदेश देऊन विविध प्रकारच्या जंतूनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे हे रोगराई मिशन पूर्ण करावे. तसेच गावात स्वच्छता मोहीम, आरोग्य अबाधित राहावे याबाबतची जनजागृती, ठिकठिकाणी जमा असलेले सांडपाणी याची विल्हेवाट लावण्यात यावी व सामान्यांना रोगराई, गावात डासांचा प्रचंड वाढलेल्या प्रकोप पासून दिलासा देण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे. 



देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला असून, खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे.

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे.

जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार देशामध्ये 23.14 दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 21.93 दशलक्ष (94.8%) योजना भूजल आणि 1.21 दशलक्ष योजना(5.2%) भूपृष्ठावरील जल योजना आहेत.

लघु जल सिंचन योजनांमध्ये डगवेल्सचा सर्वाधिक वाटा आहे. त्याखालोखाल कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये अनुक्रमे कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांमध्ये आघाडीवर आहेत. सर्व लघु सिंचन योजनांपैकी 97.0 टक्के योजना वापरात आहेत, 2.1 टक्के योजना तात्पुरत्या स्वरुपात वापरात नाहीत, तर 0.9 टक्के योजना कायमस्वरुपी बंद आहेत. लघु सिंचन योजनांपैकी बहुसंख्य (96.6 टक्के) योजना खासगी मालकीच्या आहेत. भूजल योजनांपैकी खाजगी मालकीचा वाटा 98.3 टक्के आहे, तर भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये खासगी मालकीचा वाटा 64.2 टक्के आहे.

भूजल योजनांमध्ये डगवेल्स, कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. भूपृष्ठावरील योजनांमध्ये पृष्ठभागावरील वाहते पाणी आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. 5 व्या सिंचन योजना गणनेच्या तुलनेत 6 व्या गणनेत लघु जलसिंचन योजनांमध्ये 1.42 दशलक्ष योजनांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल आणि भूपृष्ठावरील अशा दोन्ही योजनांमध्ये अनुक्रमे 6.9 टक्के आणि 1.2 टक्के वाढ झाली आहे.

महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी नामदेव वाघमारे व गजानन गायकवाड यांना तत्काळ शासकीय मदत करा-रामदास आठवले


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : तालुक्यातील तिवरंग येथील नामदेव संभाजी वाघमारे या शेतकऱ्याने कर्जामुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तसेच अंबोडा येथील शेतकरी गजानन फकीरा गायकवाड या शेतकऱ्याचे दिनांक 21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुरात शेती खरडून गेली होती. यामुळे आता लोकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तसेच मध्यवर्ती बँकेच्या कर्जामुळे व मुलांना शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. दोन्ही शेतकऱ्यांच्या घरी रिपाई आठवले चे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी सांत्वना पर भेट दिली होती. तसेच शासनाकडून आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या परिवारांनी सांगितले.

आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आले असता सदर शेतकऱ्यांच्या समस्या महेंद्र मानकर यांनी आठवले यांना सांगितल्या समस्या ऐकताच आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अजूनही कोणती शासकीय मदत झाली नाही. दोन्ही शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे व त्यामुळे तिवरंग येथील शेतकरी नामदेव वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली व अंबोडा येथील गजानन गायकवाड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ताबडतोब शासकीय मदत देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

"त्या" कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : केंद्र सरकारने नुकताच बिआयएस हा नवीन कायदा आणला आहे. या कायद्यान्वये कमी गुणवत्तेचा कापूस खरेदी केला जाणार नाही व खरेदी केल्यास जिनिंग धारकांना दोन वर्षाची शिक्षा किंवा खरेदी केलेल्या मालाची 10 पट दंडाची तरतूद या कायद्यात असणार आहे. हा शेतकऱ्यांचा जीव घेणारा कायदा केंद्र सरकार अमलात आणू पाहत आहे. ह्याच कायद्याच्या विरोधात, केंद्र मोदी सरकारचा मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करित सदर कायदा रद्द करावा, यासाठी आज दि.28 ऑगस्ट रोजी कृ उ बा समितीचे माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सभापती गौरी शंकर खुराणा व काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्फत निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मारेगाव हे महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दुर्लक्षित तालुका आहे. मारेगाव तालुक्याच्या दोन खास ओळख. मागासलेला तालुका, आत्महत्याग्रस्त तालुका. मारेगाव हे असेच एक बेरोजगारीने कळस गाठलेला तालुका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येथे मागासलेला दुर्लक्षित आदिवासी समाज यासह शेतकरी वर्ग मोठा असून यांचा मुख्य व्यवसाय हा शेती. त्यांचे मुख्य पिक कापूस हे पिक असून शेतीवरच येथील जीवन आहे. मागील वर्षांपासून अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा सुरु असल्याने कपाशीचे पिक हे दर्जेदार येत नाही, तर मध्यम दर्जाचे कपाशी चे पिक येतात. अशातच मात्र, केंद्र सरकारने मध्यम दर्जाचा किंवा कमी गुणवत्तेचा कापूस व्यापाऱ्याने खरेदी करायचा नाही, असा कायदाच काढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त करित आता जगायचे की, मरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला.
2014 ला भाजपच्या नेत्यांनी 'अच्छे दिना'चे नारे देऊन सरकार स्थापन केल. परंतु आज शेतकऱ्यांना मात्र,हेच का अच्छे दिन असा प्रश्न पडू लागला असताना या कायद्याने शेतकऱ्यासाठीचे धोरण हेच शेतकऱ्याच मरण ठरु पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मरणाच्या दारात झोकणारा सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा काँग्रेस पार्टी च्या वतीने जन आंदोलन छेडण्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड ईशारा मारेगाव कमिटी च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी नरेंद्र पा. ठाकरे (संचालक पणन, मुंबई), कृ. उ बा समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, विजय घोटेकर, यादव पांडे, आकाश बदकी, गंगाधर ठावरी, विनोद आत्राम, प्रफुल विखणकर, सय्यद समीर, आकाश भेले, मंगेश उईके, भाऊराव मेश्राम, विलास काळे,विजय बोथले, दिवाकर हस्ते, मारोती सोमलकर, विनोद धोबे, आनंद मसराम, प्रकाश पिदूरकर, जनार्दन गाडगे, आदीसह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संघर्षातून सिद्धीकडे... लेखक पवन कुसुंदल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जीवन जगत असताना आपण पाहतो,कधी अस वाटत आता सर्व मार्ग बंद झालेत आणि आपण हताश होतो व नकारात्मक भूमिका मनावर हावी होऊन पुढे पाहणच बंद करतो.अनेकांनी ह्या स्थितीचा अनुभव जीवनात एकदा तरी घेतला असेलच.जीवन हे संघर्षाने उज्वल बनते हे काही नवीन नाही प्रत्येकजण जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत राहतो ज्यामध्ये उपजीविका भागवण्यासाठी विविध प्रकारची कामे असतील कुणी नोकरी तर कुणी व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहेच.

         शिक्षण,आकलनशक्ती,चातुर्य, समज आणि बुद्धिमत्ता जरूर सर्वांच्या वेगवेगळया असतील परंतु जगण्याची जिद्द सर्वांची सारखी असते व यासाठी मनुष्य अविरत प्रयत्न करत राहतो.पशू ,पक्षी आणि जीवजंतू हे सुद्धा जगतच असतात मग त्यांचा उदरनिर्वाह कोण चालवतो कारण ते तर माणसा सारखे काहीच काम,व्यवसाय करत नाहीत.ईश्वराने जन्म दिला आहे तेंव्हा त्याची काळजी सुद्धा तो करणारच.पृथ्वीतलावर केवळ मनुष्य धडपडत राहतो आणि जीवनाबद्दल कायम उदासीन सुद्धा राहतो.
        आपण मोठ-मोठ्या व्यक्तीबद्दल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रखरतेने लक्षात येईल की कुणाचेच जीवन हे सुखकर नव्हते सर्वांनी आकंठ संघर्षातून जीवन घडवले आहे.हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून त्यांनी ते साध्य करून दाखवलं जे इतर लोकांना अशक्य वाटत असे.अखंड स्वराज्याची स्थापना केवळ संकल्पना होती परंतु शिवकालीन इतिहास पाहिला तर बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात हीच संकल्पना साध्य करून दाखवली,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली व त्या शिक्षणाच्या ताकतीने संविधान निर्मिती करून मोलाचे योगदान दिले.भारत सुध्दा एक दिवसात स्वतंत्र झाला नसून त्यात अनेक थोर लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रबळ इच्छाशक्तीचा वाटा आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदम्य साहस,लोकमान्य टिळकांची संघटन शक्ती,सावित्री बाई फुले यांनी महिलांसाठी शिकण्याची मुहूर्तमेढ रोवली तर भगतसिंग यांनी अगदी पोर वयात बलिदान दिले व हे सर्व करू शकले कारण त्यांनी नकारात्मक भावनेला जीवनात थारा दिला नाही.
         एक एक धागा जोडून सुंदर वस्त्र निर्मिती होते.एक एक विट रचून इमारती बांधल्या जातात.पक्षी एक एक गवताची काडी जमा करून घरटे तयार करतात म्हणून कुठेतरी छोटीसी सुरुवात केल्यानंतरच मोठं मोठी ध्येय साध्य होऊ शकतात.एक छोटी ठिणगी संपूर्ण जंगल उध्वस्त करण्याचं सामर्थ्य ठेवते आणि हीच ठिणगी जर मनात एक जिद्द पेटवण्यासाठी पडली तर माणसासाठी काहीच अशक्त राहत नाही.झाडावर चढताना साधी मुंगी सुध्दा हजारदा पडते परंतु जिद्दीने पुन्हा एकदा प्रयत्न करतेच.माणसाने मधाची पोळी काढून घेतली म्हणून मधमाशी कधी मधसंचयाचे काम सोडत नाही मग जर हे करू शकतात तर माणूस बलशाली,बुद्धीशाली असून का खचून जातो.एक शारीरिक विकलांग भिक मागताना दिसतो तर कुठेतरी असाच एक विकलांग काम करताना पण आपण पाहतो मग विकलांगता ही शारीरिक अपंगत्वाचे कारण नसून मानसिक अपंगत्वाचे आहे हे सिद्ध होते.नकळतपणे फेकलेले बी रुजते तर खडकातून वर मान काढत सुंदर रोपटे जन्म घेऊ शकते कारण मनाची तयारी भक्कम असेल तर सुरुवात कुठूनही करता येते.
        संघर्षमय जीवन जगासाठी उदाहरण बनून जाते.लढाई न करता हार मानन्यापेक्षा लढत मरणे कधीही उत्तम.