सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
जीवन जगत असताना आपण पाहतो,कधी अस वाटत आता सर्व मार्ग बंद झालेत आणि आपण हताश होतो व नकारात्मक भूमिका मनावर हावी होऊन पुढे पाहणच बंद करतो.अनेकांनी ह्या स्थितीचा अनुभव जीवनात एकदा तरी घेतला असेलच.जीवन हे संघर्षाने उज्वल बनते हे काही नवीन नाही प्रत्येकजण जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत राहतो ज्यामध्ये उपजीविका भागवण्यासाठी विविध प्रकारची कामे असतील कुणी नोकरी तर कुणी व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहेच.
शिक्षण,आकलनशक्ती,चातुर्य, समज आणि बुद्धिमत्ता जरूर सर्वांच्या वेगवेगळया असतील परंतु जगण्याची जिद्द सर्वांची सारखी असते व यासाठी मनुष्य अविरत प्रयत्न करत राहतो.पशू ,पक्षी आणि जीवजंतू हे सुद्धा जगतच असतात मग त्यांचा उदरनिर्वाह कोण चालवतो कारण ते तर माणसा सारखे काहीच काम,व्यवसाय करत नाहीत.ईश्वराने जन्म दिला आहे तेंव्हा त्याची काळजी सुद्धा तो करणारच.पृथ्वीतलावर केवळ मनुष्य धडपडत राहतो आणि जीवनाबद्दल कायम उदासीन सुद्धा राहतो.
आपण मोठ-मोठ्या व्यक्तीबद्दल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रखरतेने लक्षात येईल की कुणाचेच जीवन हे सुखकर नव्हते सर्वांनी आकंठ संघर्षातून जीवन घडवले आहे.हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून त्यांनी ते साध्य करून दाखवलं जे इतर लोकांना अशक्य वाटत असे.अखंड स्वराज्याची स्थापना केवळ संकल्पना होती परंतु शिवकालीन इतिहास पाहिला तर बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात हीच संकल्पना साध्य करून दाखवली,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली व त्या शिक्षणाच्या ताकतीने संविधान निर्मिती करून मोलाचे योगदान दिले.भारत सुध्दा एक दिवसात स्वतंत्र झाला नसून त्यात अनेक थोर लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रबळ इच्छाशक्तीचा वाटा आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदम्य साहस,लोकमान्य टिळकांची संघटन शक्ती,सावित्री बाई फुले यांनी महिलांसाठी शिकण्याची मुहूर्तमेढ रोवली तर भगतसिंग यांनी अगदी पोर वयात बलिदान दिले व हे सर्व करू शकले कारण त्यांनी नकारात्मक भावनेला जीवनात थारा दिला नाही.
एक एक धागा जोडून सुंदर वस्त्र निर्मिती होते.एक एक विट रचून इमारती बांधल्या जातात.पक्षी एक एक गवताची काडी जमा करून घरटे तयार करतात म्हणून कुठेतरी छोटीसी सुरुवात केल्यानंतरच मोठं मोठी ध्येय साध्य होऊ शकतात.एक छोटी ठिणगी संपूर्ण जंगल उध्वस्त करण्याचं सामर्थ्य ठेवते आणि हीच ठिणगी जर मनात एक जिद्द पेटवण्यासाठी पडली तर माणसासाठी काहीच अशक्त राहत नाही.झाडावर चढताना साधी मुंगी सुध्दा हजारदा पडते परंतु जिद्दीने पुन्हा एकदा प्रयत्न करतेच.माणसाने मधाची पोळी काढून घेतली म्हणून मधमाशी कधी मधसंचयाचे काम सोडत नाही मग जर हे करू शकतात तर माणूस बलशाली,बुद्धीशाली असून का खचून जातो.एक शारीरिक विकलांग भिक मागताना दिसतो तर कुठेतरी असाच एक विकलांग काम करताना पण आपण पाहतो मग विकलांगता ही शारीरिक अपंगत्वाचे कारण नसून मानसिक अपंगत्वाचे आहे हे सिद्ध होते.नकळतपणे फेकलेले बी रुजते तर खडकातून वर मान काढत सुंदर रोपटे जन्म घेऊ शकते कारण मनाची तयारी भक्कम असेल तर सुरुवात कुठूनही करता येते.
संघर्षमय जीवन जगासाठी उदाहरण बनून जाते.लढाई न करता हार मानन्यापेक्षा लढत मरणे कधीही उत्तम.