सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कोरोनाच्या काळात बंद पडलेली वणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची एस.टी. बस सेवा तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
ही बस वणी आगारातून दररोज सकाळी ७ वाजता सुटते आणि रात्री ८ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचते. या सेवेमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी नियमित प्रवास करणाऱ्यांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. सेवा बंद असल्यामुळे गेल्या काही वर्षांत प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा अधिक खर्च आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी महिन्यात वणी आगार प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत ही बस सेवा पुन्हा सुरू केली.
या निर्णयाबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत. तसेच ही सेवा नियमितपणे सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.