महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी नामदेव वाघमारे व गजानन गायकवाड यांना तत्काळ शासकीय मदत करा-रामदास आठवले


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : तालुक्यातील तिवरंग येथील नामदेव संभाजी वाघमारे या शेतकऱ्याने कर्जामुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तसेच अंबोडा येथील शेतकरी गजानन फकीरा गायकवाड या शेतकऱ्याचे दिनांक 21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुरात शेती खरडून गेली होती. यामुळे आता लोकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तसेच मध्यवर्ती बँकेच्या कर्जामुळे व मुलांना शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. दोन्ही शेतकऱ्यांच्या घरी रिपाई आठवले चे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी सांत्वना पर भेट दिली होती. तसेच शासनाकडून आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या परिवारांनी सांगितले.

आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आले असता सदर शेतकऱ्यांच्या समस्या महेंद्र मानकर यांनी आठवले यांना सांगितल्या समस्या ऐकताच आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अजूनही कोणती शासकीय मदत झाली नाही. दोन्ही शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे व त्यामुळे तिवरंग येथील शेतकरी नामदेव वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली व अंबोडा येथील गजानन गायकवाड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ताबडतोब शासकीय मदत देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.