मोठी बातमी: खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00 वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यांच्या पश्चात आ.पत्नी, आई, भाऊ, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात शोककळा पसरली.

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा राजकीय प्रवास 
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.



वणी: फ्लॅट मध्ये तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला मृतदेह

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील कृष्णअपार्टमेंट मध्ये एका बंद खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी 29 में रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान, उघडकीस आली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रिया देवानंद बागेश्वर (ता. वरोरा) जिल्हा चंद्रपूर असे मृतक तरुणीचे नाव आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट च्या खोलीत सदर मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे मृतक ही परजिल्ह्यातील असून तिच्या जवळ दोन आधार कार्ड आढळून आले, तरुणी रूम करून राहत असून ती चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात शिकत होती अशी माहिती मृतकाच्या आई कडून पोलिसांना मिळाली, घटनास्थळी तिच्या डोक्याच्या मागून प्रहार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले, शिवाय बंद दरवाजा,संशयास्पद स्थितीत मृतदेह असल्याने घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


मृतक पंचवीस वर्षीय तरुणी ही साई मंदीर, जवळ वरोरा येथील असून ती वणी शहरातील ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट मध्ये राहत होती. ती राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकांना स्थानिकांनी माहिती दिली, घर मालकांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. बंद खोलीत अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला असून सदर तरुणीचा मृत्यू दोन तीन दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद आहे.

फिर्यादी घर मालक राकेश विजय डूबे (30) रा.गोकुल नगर वणी. यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासात घेतला. अधिक तपास व‍ पोलिस करीत आहेत.

आदिवासी भागातील जल, जंगल, जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यावेत- मालती सेलमे


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : निसर्ग आणि मानव यांचा अन्योन्य संबंध आहे. आदिकाळात माणूस जंगलाच्या सानिध्यात राहिला आणि जंगलाच्या सोबतीनेच जगाला. सध्या या जंगल संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. ही संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यायला हवीत असे उद्गार गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री मालती मडावी सेलमे यांनी काढले.

शेगांव (बु) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संवादक म्हणून प्रसिद्ध कवयित्री गीता रायपुरे देव्हारे यांनी भूमिका पार पाडली. अध्यक्षस्थान चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांनी भुषविले. याप्रसंगी बदलापूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रहास मोरे, कवी विवेक पत्तीवार उपस्थित होते. कवितेविषयी गीता देव्हारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मालती सेलमे म्हणाल्या, जंगलची संपत्ती गोळा करीत आम्ही वाढलो, झाडे, झुडपे, जंगल, वेली हे सर्वच आमच्या सगेसोयऱ्यांसारखेच आहेत. आमच्या भागात सोईसुविधा नसल्यामुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आज आम्ही शहरात राहतो. नागरी जीवन व त्यातील धुसमट पाहून मन दुःखित होते. असे सांगून त्यांनी आदिवासी संस्कृतीची विविध वैशिष्टये सांगितली. या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी निसर्गाचा वेध घेणाऱ्या विविध कविता सादर केल्या. 'ह्या हिरव्या पांदणवाटा ओढती माझे पाय', पावसा ये जरा जरा, संविधान गीत, रमाईचे महात्म्य सांगणारी कविता, बालमनाच्या वेध घेणाऱ्या कविता अशा अनेक कविता सादर करून मुलाखतीत रंगत आणली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रहास मोरे म्हणाले, कवीने सामाजिक भान ठेवून कवितेतून प्रकट झाले पाहिजे, समाजाला सोडून कवितेचा विचार होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कवितेच्या घरातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप भेले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला विकास अधिकारी विद्याधर वैद्य, खेमजई येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज गायकवाड, कवी राजू मांडवकर उपस्थित होते.

यशस्वितेसाठी कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील, भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते, विकास ग्रुपचे अमोल दातारकर, धर्मराज लोडे तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


वयोवृध्द आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे.

दंड व शिक्षा
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी 'फौजदारी प्रक्रिया संहिते'मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना 'आई - वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७' च्या कलम २४ नुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कायद्यातील तरतूद
जे ज्येष्ठ नागरिक स्वत:चे पलानपोषण करण्यास समर्थ नाही ते त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. 'फौजदारी प्रक्रिया संहिते'च्या कलम १२५ नुसार ज्येष्ठांना त्यांच्या मुलांकडून स्वत:च्या पालनपोषणासाठी पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोटगीची ही रक्कम मुलांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांचे उत्पन्न व त्याच्या परिवाराचा खर्च विचारात घेऊन न्यायालय पोटगीची रक्कम ठरवीत असते.

हे करू शकतात पोटगीसाठी अर्ज
या कायद्याखाली स्वत: ज्येष्ठ नागरिक अथवा पालक, जर ते असमर्थ असतील तर त्यांनी अधिकार दिलेली व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकते. अथवा न्यायाधिकरण स्वत: त्याची दखल घेऊ शकते. मुलगा किंवा नातेवाइकांनी न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषणासाठी ठरवून दिलेली रक्कम अदा केली नाही तर न्यायाधिकरण आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्वत: फौजदारी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करते.


नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समोर कोळशाच्या काळा बाजारासह अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरु असलेल्या कोसारा, बोटोणी चोरट्या कोल बाजारासह मटका, अवैध दारू विक्री यातून महिण्याला लाखों रूपयाचा काळा घोडबाजार होत असून तस्करा कडून मुजोरी वाढल्यामुळे परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा येथील वर्धा नदी जवळ तसेच बोटोणीच्या ढाब्याजवळ कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. शासन मान्य कोळसा खाणीतून हा कोळसा क्षमते पेक्षा अधिक ट्रक मध्ये भरून कोळसा चोर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. येथून कोळशाची चोरी केली जात असून चोरून आणलेला कोळसा येथे खाली केल्या जात आहे. जमा झालेला कोळसा खाली ट्रक मध्ये लोड करून काळ्या बाजारात विकला जात आहे. चोर बाजारातुन खरेदी केलेल्या कोळशाची खुल्या बाजारात या कोळशाला 8 ते 9 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय दोनही ठिकाणी मोठया प्रमाणात फोफावला आहे.

यांचप्रमाणे अवैध दारू विक्री, मटका, भंगार चोरी, वाळूची तस्करी याचे प्रमाणही दर दिवशी उच्चांक गाठत असून कोसारा येथील चोर बाजारात 15-20 ट्रक रोज खाली होत आहे, तर बोटोणी च्या चोरबाजारात 25 ते 30 ट्रक रोज खाली होत आहे. बोटोणीतील कोळसा चोर बाजाराने आरोग्य धोक्यात आले आहे. कोसारा चोर बाजारात संबंधित लोकं मुकाट्याने हात ओले करित असल्याचे बोलल्या जात आहे.

कोसारा पाईन्टवरून व बोटोणी पाईन्ट मिळून लाखों रुपये दर दिवशी निव्वळ नफा या व्यवसायातून माफियाना मिळत असल्याची चर्चा आहे. चोरून आणलेल्या कोळशाच्या चोरट्या बाजारातून लाखों रुपयाचे दर दिवशीचे उत्पन्न असल्यामुळे चोरटे सामान्य माणसा सोबत मुजोरी करीत आहे. वेळीच या चोर बाजाराला आवळ न घातल्यास परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

यापूर्वीचे एसडीपीओ अपयशी

यापूर्वीचे एसडीपीओ हा चोर बाजार बंद करण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, नव्याने रुजू झालेले वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे या अवैध व्यवसायाला आळा घालतील अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

7 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

या चोर बाजारात दर दिवशी 50-60 टन कोळशाचा अवैध अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे. या बाबत वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सात दिवसांत हा चोर बाजार बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष झाल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या पुर्वी नव्याने रुजू झालेले एसडीपीओ यांनी दखल घेतल्यास कदाचित आंदोलनाची कार्यकर्त्याना काही गरज पडणार नाही. मात्र कोळंसा चोर बाजार बंद करण्याचे त्यांच्या समोरील आव्हान ते कसे पेलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.