डॉक्टर एकनाथ डाखरे यांना पुत्रशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे सुपुत्र तुषार डाखरे (35) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजता च्या दरम्यान निधन झाले. मनमिळाऊ स्वभावाच्या तुषार यांचे अशा अवेळी जाण्याने डाखरे कुटुंबासह मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

शहरातील प्र. क्र. 9 येथे डाखरे कुटुंब राहतात. वडील एकनाथ डाखरे हे मारेगाव येथे डॉक्टर असुन, तुषार यांचे मेडिकल स्टोअर्स तथा एका ढाब्याचे संचालक होते. 

काल मंगळवार ला रात्री 10 वा. दरम्यान,ढाब्यावर असताना  त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तुषार यांचे निधन झाले. 


गौराळा स्मशानभूमी रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गौराळा स्मशानभूमी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊनही रस्ता कायमस्वरूपी बांधून देण्यात अपयशी ठरत असलेल्या प्रशासनाच्या विरोधात अखेर सोमेश्वर गेडेकार यांनी (25 एप्रिल) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील स्मशानभूमी च्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामवासियांनी खडीकरण व मजबुतीकरण करून कायम स्वरूपी रस्ता बांधून देण्यात यावा व मयत व्यक्तीचा शेवटचा प्रवास तरी सुखमय व्हावा यासाठी प्रयत्न प्रशासनाने दुर्लक्ष न करता जातीने लक्ष देऊन करावे अशी आर्तहाक नागरिकांची आहे. तूर्तास पंचायत समितीच्या या गलथानपणाला गावाकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

परिणामी वारंवार निवेदन देत सदर बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिली तरी देखील प्रशासनाने ही बाब गंभीर्याने घेतली नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर गेडेकार यांनी आज मंगळवारपासून पंचायत समितीचे समोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी अनेकांनी उपोषण स्थळी भेट देत मागणी केली.


■ स्मशानभूमी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आम्ही गावाकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा. तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम न करता कायमस्वरूपी खडीकरण व मजबुतीकरण देण्यात येत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरु राहील -
सोमेश्वर गेडेकार, उपोषणकर्ते

निधी उपलब्ध करून स्मशान भुमीच्या रस्त्याचे काम प्राधान्याने करून देण्यात यावे.
आकाश बदकी, नगरसेवक नगरपंचायत, मारेगाव 




शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : “राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. उपसमितीसमवेत अखिल भारतीय किसान सभेने मांडलेल्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात सविस्तर चर्चा करण्यात येईल,” असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सांगितले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे अखिल भारतीय किसान सभा यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, ॲड. अण्णा शिंदे, डॉ.उदय नारकर, किसन गुजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, वनाधिकार, देवस्थान जमीन, वरकस इत्यादी जमिनी, घरांच्या तळ जमिनी, हिरडा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी, दुग्ध पदार्थ आयात आणि दूध प्रश्न, जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन, शेतमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

चारचाकी वाहणाला पार्किंग झोन मध्ये लागली आग...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात असलेल्या नगर परिषद पार्किंग झोन मध्ये एका चारचाकी कार ला अचानक आग लागल्याची घटना आज दि. 25 एप्रिल ला दुपारी 1.30 च्या दरम्यान आग  घडली.

वणीच्या मध्यभागी  असलेल्या पार्किंग झोन मध्ये वाहन दाखल झाले असता, येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने वाहन वाहकांना सूचित केल्याने कारमधील मंडळी ताबडतोब बाहेर निघाले. दरम्यान, अचानक आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.

सदर कार पार्किंग मध्ये असतांना या वाहणाला नेमकी आग लागली कशी? याचे कारण अद्याप कळू शकले नसुन, उपस्थितांच्या समयसुचकतेने या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सतर्कतेने अनर्थ टळल्याने वाहणधारकांनी सूटकेचा निःश्वास सोडला..

शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा..! मुक्काम पोस्ट झेडपी शाळा..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

खासगी शाळांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपणार आहेत, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच होऊ नयेत, यासाठी नवं धोरण करण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत.

शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, त्याचबरोबर शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लावून राहिले आहेत.

शिक्षकांच्या बदल्या न करण्याचं धोरण राज्य सरकार का आणतंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळं शिक्षक कायम त्रासलेले असतात. या त्रासातून शिक्षकांना कायमचा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी व्हावा, यासाठी हे धोरण आखलं जातंय. माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये आयुष्यभर शिक्षक एकाच शाळेत शिकवतात. त्याच धरतीवर शिक्षकांना एकाच शाळेत थांबून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल, असं शालेय शिक्षण खात्याला वाटतं. मात्र या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 दरम्यान, गेल्या 3 वर्षांपासून सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. कोरोनाची 2 वर्षं आणि नवं ऑनलाईन सॉफ्टवेअर यामुळं शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त सापडेला नाही. आता राज्य सरकारनं बदल्या न करण्याचंच धोरण लागू केलं तर या कटकटीमधून शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि सरकारचीही कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेणार? दर्जेदार शिक्षणासाठी बदल्यांना चाप बसणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.