'भाजप हटाव - देश बचाव' भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ तालुक्यात रूई येथुन अभियानाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत 'भाजप हटाव - देश बचाव' ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार घेतला असुन त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध तालुक्यात मोहीम सुरु आहे.आज यवतमाळ तालुक्यातील रूई वाई येथुनही मोहीमेला सुरवात करण्यात आली आहे.याप्रसंगी मोहीमे ला सुरुवात करतांना पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. भाजप सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फसला असून, एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढत असताना, विविध घटनांमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना सरकार मोकाट सोडत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातही हाच प्रकार गेल्यावर्षी दिसून आला असून, त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न वाढत असून, शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होते आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन कॉ.अनिल घाटे यांनी केले.यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला प्रमाणे यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अनिल घाटे , कॉ.बंडु उईके , नारायणराव बोरकर, निरंजन गोंधळेकर, ईश्वर दरवरे , गुलाबराव उमरतकर , दिलीप‌ महाजन, दिवाकर नागपुरे, अभिक्षक उईके, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सूर्यभान आत्राम ठार


मारेगाव | विवेक तोडासे 
                          
मारेगाव : करंजी बोटोणी राज्य मार्गावर बोटोणीजवळील पेट्रोल पंपा नजिक 22 एप्रिल ला रात्री 8 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सूर्यभान बापूराव आत्राम वय (४५) रा मेंढणी ठार झाले. 
        
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजी बोटोणी राज्य महामार्गावर मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोटोणी व जळका यांचे दरम्यान सुर्यभान बापुराव आत्राम वय ४५ हे आपल्या मोटारसायकल ने करंजी येथुन रात्री आठ वाजता सुमारास बाजार घेऊन गावी जात होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुर्यभान हे गंभीर जखमी झाले त्यांना प्रथम करंजी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

करंजी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. त्यांचे पच्छात पत्नी, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे.

सावधान : तुमचीही फसगत होऊ शकते, जशी हिची झाली...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव :  नौकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील भाड्याने वास्तव्यात असलेल्या महिलेला थेट मध्यप्रदेश येथे चक्क! दीड लाख रुपयात विक्री केल्याची घटना उघडकीस आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील दोघांकडून फसवणूक झालेल्या महिलेच्या आईने रामनगर (चंद्रपूर) पोलिस ठाण्यात 20 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली. मारेगाव शहरात आपल्या मुलीसोबत भाड्याची रूम करून राहणारी महिला ही रोजमजुरी करून आपल्या मुलीसह उदरनिर्वाह करीत असतांना चांगली नौकरीच्या शोधात असताना पिडीत महिलेच्या संपर्कात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील एक महिला व पुरुष आलेत. त्या दोघांनी तुला कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने भद्रावती येथे बोलाविले. येथे तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन मध्यप्रदेश कडे रवाना झाल्याची माहिती आहे.

पीडितेस मध्य प्रदेश जिल्हा रतलाम येथील जितू पाली या इसमाला दीड लाख रुपयात विक्री केल्याची खळबळजनक घटना,फिर्याद महिलेच्या आईने चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून संशयीतावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मारेगाव पोलीस स्टेशन कडे दि.21 एप्रिल ला वर्ग करण्यात आले.

याघटनेचा अधिक तपास मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली एक पोलिस पथक नेमून हे पथक मध्यप्रदेश कडे रवाना झाले आहे. 

जिल्ह्यात 1 मेपासून मिळणार केवळ 600 रुपयांत घरपोच वाळू…

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी तसेच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. त्यानुसार ग्राहकांना एक ब्रास वाळूसाठी ६०० रुपये महसूल विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून पैसे भरावे लागतील, त्यानंतर थेट घरपोहोच वाळू १ मेपासून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या ८ हजार रुपये ब्रासने मिळणारी वाळू ६०० रुपयांना मिळणार असल्याने एक ब्रासमागे ग्राहकांचे ७ हजार ४०० हजार रुपये वाचणार आहेत. श्रीरामपूर येथे पहिला वाळूचा डेपो तयार करण्यात आला असून, अन्य दोन ठिकाणी असे वाळूचे डेपो सुरू करण्यात येणार आहेत.

आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वाळूचे लिलाव हे बोली पद्धतीने होत होते, मात्र या लिलावात पारदर्शकता आणण्यासाठी तत्कालीन सरकारने वाळूचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाळूचे लिलाव हे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले होते, मात्र लिलावाच्या किचकट प्रक्रियेमुळे वाळू साठे निश्चित करूनही लिलावांना कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे दरवर्षी महसूल प्रशासनाला वाळू लिलावांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते. वाळूतून वाढलेली गुन्हेगारी व वाळूचे वाढलेले दर लक्षात घेऊन राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. बुधवार (१९ एप्रिल) ला महसूल विभागाने वाळू धोरणाचा शासनाचा निर्णय जारी केला आहे.

वाळू लिलावांसाठी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य, वाळू गटांवर राहणार सीसीटीव्हीचे लक्ष :

शासनाच्या निर्णयानुसार वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य राहील. शिवाय वाळू गटांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आणि डेपोमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पासाठी वाळूचा एक गट राखून ठेवण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नदीपात्रातून वाळू घेतल्यानंतर डेपोपर्यंत जाणाऱ्यां वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 

 १ मेपासून महसूल विभाग ग्राहकांना थेट घरपोच वाळू देणार आहे. त्यासाठी तीन डेपोदेखील निश्चित केले आहेत. त्यासाठी महसूल विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

-सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी

विदर्भवाद्यांचा महाराष्ट्र दिनी उमरेड कोळसा खाणी समोर "कोयला रोको आंदोलन"

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज/ऊर्जा निर्मितीकरीता देशभर जाणारा कोयला दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणी मधून बाहेर जाणारा 'कोयलो रोको आंदोलन' करण्याचा निर्णय घेतला असून, हे आंदोलन 1 मे ला दुपारी 12 वाजता सुरू होईल व स्वातंत्र्याच्या एलगाराचे रणशिंग फुंकले जाईल.
        
कोयला या खनिजाने उत्पादन महाराष्ट्रातील खास करून विदर्भातील नागपूर यवतमाळ व चंद्रपूर याच जिल्ह्यात होते व त्या आधारे 6300 मेगावॅट वीज विदर्भात तयार होते व त्यापैकी विदर्भाला केवळ 2200 मेगावॅट वीजच वापरावयास मिळते विदर्भात 58 टक्के शेती पंपाचा अनुशेष असून 6 ते 12 तास लोड शेडिंग सहन करावी लागते व प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचे फुफुसाशी संबंधित सर्व आजार विदर्भातील प्रदूषित जिल्ह्यात आहे. दिल्ली व हरियाणा येथील हृदयरोग तज्ञांची चमू 4 वर्षाआधी विदर्भात येऊन गेली असून त्यांनी पाच वर्षात प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर देशात सर्वाधिक हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात मिळतील असे जाहीरपणे सांगितले होते.
           
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई गेल्या 118 वर्षापासून सुरू असून ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या 12 वर्षापासून आंदोलनाची मालिका सुरू ठेवली असून ही आरपारची लढाई समजून तिचा बिगुल वाजवण्याच्या दृष्टीने व 31 डिसेंबर 2023 पूर्वी करू किंवा मरू,जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही निकराची लढाई लढून विदर्भ निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्धार केला असून 19 डिसेंबर 2022 पासून "शुरू हुई है जंग हमारी लढेंगे जितेंगे", "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ" कटेंगे मगर हटेंगे नाही असा एल्गार करून आरपारची लढाई करून 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ मिळवून विदर्भातील जनतेच्या स्वाधीन करण्याचा चंग बांधला आहे.
        
विदर्भातील जनता 100 वर्ष महाराष्ट्रात राहिली व ब्रह्मदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी विदर्भातील जनतेचे बरे होणे नाही म्हणून महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून सर्व आंदोलक त्या दिवशी काळ्या पट्ट्या,काळे वस्त्र व काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनात सहभागी होतील. सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आणि ते म्हणजे "विदर्भाचे स्वतंत्र राज्य'' 
             
घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारचा व संसदेचा अधिकार आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केंद्राशी संबंधित कोयला व खनिजाला कोयले रोको आंदोलन करून केंद्राला टाचणी टोचण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विदर्भातील खासदार व केंद्रीय मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गावबंदी घोषित केली आहे.

विदर्भ राज्य निर्मितीचा घडी हळूहळू जवळ येत असून 31 डिसेंबर पर्यंत तीव्र आंदोलने करून या मागणीला विदर्भ राज्य निर्मिती करून पूर्णविराम देण्याचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समिती ने सोडला असून वणी येथिल विश्राम गृहात संपन्न झालेल्या बैठकीला विदर्भाचे नेते नेते अ‍ॅड. वामनराव चटप प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, राजू पिंपळकर, बाळासाहेब राजूरकर, नामदेवराव जेनेकर, देवा बोबडे, होमदेव कनाके, धीरज भोयर, संजय चिंचोळकर, अनिल टोंगे, मोहन हरडे, काशीनाथ देऊळकर, शशिकांत नक्षीने, दिनेश रायपूरे, विजय बोबडे, रामजी महाकूलकर, पांडुरंग पंडिले, राम मुडे सर, अशोक चौधरी, निलिमा काळे, कलावती क्षीरसागर, नारायण मांडवकर, सुभाष वैद्य, प्रभाकर उईके, योगेश बेलेकर, सिद्धार्थ ताकसांडे इत्यादी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.