मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे १५ अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

चित्रपट परीक्षणाकरीता ३३ टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

मोठी बातमी ! विद्यापीठ कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून संपावर परीक्षांच्या कामकाजावरही होणार बहिष्कार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर

पुणे : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे.

पहा काय आहे कारण:

महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे 

 तसेच महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आज जारी होणार तुमचं हॉल तिकीट; या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध..

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध झाली आहेत. http://www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठीकोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे

हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास?
प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे. प्रवेशपत्रं हरवलं तर? प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्रं हरवलं तर?
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय प्रजासत्ताक दिनी चिमुकल्यांनी केले मार्डीवासियांना मंत्रमुग्ध

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
         
मारेगाव : मारेगाव तालुक्यात 26 जानेवारी 'प्रजासत्ताक दिन' मोठया थाटात सपन्न झाला. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही प्रजासत्ताक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले. या सोहळ्या मध्ये जि.पं. शाळा हायस्कुल, महाविद्यालय कान्व्हेंट सह अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.

तालुक्यातील मार्डी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण कला सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. या मंच बहारदार नृत्य सादर करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यात ईन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल ला प्रथम क्रमांक मिळाला. या सांस्कृतिक कार्यक्रमात अंगणवाडी क्र 1, अंगणवाडी केंद्र क्रमांक 2, इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल, इंडियन स्कॉलर ऍकेडमी,जिल्हा परिषद शाळा, आदर्श हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हर्षदा गानफाडे या विद्यार्थीनीने 'आई ' ही थीम सादर करताना दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणले.
 
मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, गणेश कनाके, सूरज पंडिले, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, भास्करराव धानफुले, किसनराव चौधरी, माणिक कांबळे, प्रफुल झाडें, राजकुमार बोबडे, बेबी मोहुर्ले, मनीषा चौधरी, मंगला टिपले, शोभा कालर, छाया पुसाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे परीक्षण जि प शाळेचे मुख्याध्यापक गिरिधरराव राऊत, सुरेश नाखले यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने गोधणी येथे तृणधान्य वर्ष साजरे

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास 194 देशांनी मिळून त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी श्री.सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक श्री सचिन आत्राम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रोजी गोधनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा सहभाग घेऊन गावात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढावे या करिता शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणार्‍या विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.

प्रभात फेरी मध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढविणे व पौष्टिक तृणधान्याची आरोग्य विषयक महत्त्व बाबत जनमानसात जनजागृती करणे, तृणधान्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्यासह विविध उपपदार्थ तयार करणे व त्यांचा आहारात समावेश वाढविणे असे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत.

कार्यक्रमात कृषी सहाय्यक सचिन आत्राम , मनोहर पेठे मुख्याध्यापक जि. प.शाळा गोधणी यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील मूल्य व त्याचे आहारातील महत्त्व या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली तसेच लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आरोग्याच्या समस्या, स्थूलता, बद्धकोष्ठता, मधुमेह महिला व लहान मुलांमध्ये अनेमिया यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे नियमित सेवन करण्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा यासारख्या पौष्टीक तृणधान्यांचा समावेश वाढविणे त्याचबरोबर सदरील पौष्टिक तृणधान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ, बेकरीचे पदार्थ तयार करणे शक्य असून त्यांचा आहारात वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म उन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35 टक्के व जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत प्रक्रियेसाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी, युवकांनी, बचत गटाच्या महिलांनी लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभे करावेत असे सदर प्रसंगी बोलताना आवाहन केले.

याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांनी शेत तिथे तृणधान्ये व मिलेट ऑफ द मंथ या संकल्पना शेतकर्‍यांपर्यंत रुजवून आत्मसात करणे बाबतचे मत व्यक्त केले. या प्रसंगी गावातील सरपंच सौ.मंदा मंडाळी, उपसरपंच श्री धनंजय गवळी, पोलिस पाटील सौ.मीना गवळी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.