मारेगाव महाविद्दालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महविद्दालय, येथे, दि. 22 एप्रिल 2022 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे विज्ञान प्रद्रशनीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनीत बी. एस. सी. भाग 3 च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी टाकावू वस्तू पासून विशिष्ठ प्रकारचे मॉडेल बनवून प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवन पाटील कापसे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, कनिष्ठ महविद्यालयाचे प्राचार्य श्री. हेमंत चौधरी व प्रा.‌ डॉ. पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कापसे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून सादर केलेल्या प्रकल्पाला भविष्यामध्ये प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुळकर्णी, डॉ. चिरडे, डॉ. राऊत, प्रा. कांबळे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. वांढरे व श्री. आकाश कुमरे इत्यादी मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अड्सरे यांनी परिश्रम घेतले.

यवतमाळात अमोल मिटकरी विरोधात ब्राम्हण संघ आक्रमक

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : इस्लामपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. ब्राह्मण समाजाविषयी तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करुन ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण पुरोहित सेवा संस्थेने केली आहे. शनिवार शहर पोलिस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली असून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
 
आमदार अमोल मिटकरी यांनी अपमानास्पद उल्लेख केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी ब्राह्मणांच्या केलेल्या नकलेवर हसून दाद देत या भावनांना प्रोत्साहन दिले. धार्मिक भावना तसेच जनसामान्यात ब्राह्मण वर्गाबाबत गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण करून खिल्ली उडविली. पौराहित्य करणार्‍या ब्राह्मण समाजाचा सार्वजनिक बदनामी केली. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य केल्याबद्दल आमदार मिटकरी वर कारवाईची मागणी ब्राम्हण, पुरोहीत संस्थेने केली आहे. याशिवाय परंपरागत हिन्दु विवाह पद्धतीवर टीका केली आहे. सभेत राज्य शासनातील मंत्री उपस्थित हेाते. मात्र, त्यांनी यांचा निषेध केला नाही. आमदार मिटकरी यांचे वक्तव्य व्देष निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्यांचेवर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण पुरोहीत सेवा संस्थेने केली. यावेळी ब्राम्हण सेवा संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सात महिने उलटूनही मुलाचा शोध लागत नसल्याने १ मे महाराष्ट्र दिनापासून "त्या" मातेचे उपोषण

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : सावर्ला येथील १८ वर्षीय बेपत्ता असलेल्या मुलाचा सात महिने लोटूनही पोलिसांना शोध लावण्यास अपयश येत असल्याने बेपत्ता मुलाची आई गेली सात महिन्यापासून पोलीस स्टेशन चे चकरा मारत असून माझ्या मुलाचा शोध लावा असा टाहो 'सह्याद्री चौफेर' न्यूज ला बोलतांना फोडला आहे.

सविस्तर असे की, वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा सावर्ला येथील अजय अनिल तामगाडगे (१८) इयत्ता १२ वी पास होता, पुढे बि ए (BA1st) प्रथम वर्षांकरिता प्रवेश घेणार दरम्यान, ७ सप्टेंबर २०२१ रोजी अजय नेहमीप्रमाणे घरून बाहेर पडला. मात्र, तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. याबाबत ८ सप्टेंबर २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात अजय बेपत्ता असल्याची तक्रारी त्याच्या आईने दाखल केली. तेव्हा पासून पोलीस त्या बेपत्ता मुलाच्या शोधात आहे. परंतु गेली सात महिने लोटूनही पोलिसांना मुलाचा शोध लावण्यास यश आले नाही.
परिणामी मुलाची आई सुमन तामगाडगे ह्या पोलीस स्टेशन च्या येर जाऱ्या करीत असून माझ्या मुलाचा शोध लावा म्हणून सतत मागणी करीत आहे. परंतु सात महिने लोटूनही पोलिसांना बेपत्ता मुलाचा शोध लावण्यास यश येत नसल्याने मुलाच्या न्यायासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून, येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून वणी पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा आज (ता.२५) एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आहे.

समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योग-व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही या महामार्गाचा फायदा झाला पाहिजे, यासाठी हा महामार्ग या जिल्ह्यांपर्यंत वाढविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूरपर्यंत २१० किलोमीटर स्वतः वाहन चालवत श्री. शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार, वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

शेलूबाजार येथून श्री. शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास स्वतः वाहन चालवत प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे त्यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातीलच वेरूळजवळ वन्यप्राण्यांना आवागमन करता यावे, यासाठी बांधण्यात आलेला वन्यजीव उड्डाणपूल, नागपूर जिल्ह्यात वायफळ येथील टोल प्लाझा व परिसर, तसेच नागपूर येथे ज्या भागातून महामार्गास प्रारंभ होतो, त्या भागाची सुद्धा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली.

समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थाने विदर्भात समृद्धी येणार आहे. येथील औद्योगिकीकरणासह उद्योग-व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. महामार्गाचा विदर्भातील अन्य जिल्ह्यांनाही फायदा झाला पाहिजे, ही भूमिका समोर ठेवून हा महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या महामार्गाच्या वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूर या पहिल्या टप्प्यातील २१० किलोमीटर मार्गाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या २ मे रोजी लोकार्पण होणार आहे. जो मार्ग पूर्ण झाला आहे, तो सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतुकीस खुला होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी आर्वी टोल प्लाझा येथे बोलताना सांगितले.

या महामार्गावर वाहने १५० च्या गतीने धावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण शून्य राहील. महामार्गावर तत्काळ प्रतिसाद पथके राहतील. मार्गाच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा इकोफ्रेंडली रस्ता असून मार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३० हजार झाडे लावून ग्रीन कव्हर तयार करण्यात आले आहे. महामार्गावर आपण २५० मेगावॉट सौरऊर्जा तयार करतो आहोत. महामार्गाशेजारी एक हजार शेततळी तयार करण्यात आली असून या तळ्यातून दोन हजार ५०० कोटी लिटर पाण्याचा साठा झाला. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

या संपूर्ण महामार्गावर वन्यप्राण्यांना आवागमनासाठी ७६ अंडरपास तर ८ ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत. यावर ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना महामार्गावर ये-जा करता यावी, यासाठी २४ इंटरचेंजेस देण्यात आले आहेत. महामार्ग तयार करताना वृक्षारोपण, सौरऊर्जा, शेततळे, पर्यावरण, वन्यप्राणी, उद्योग, शेतकरी आदींचा विचार करण्यात आल्याने हा केवळ महामार्ग नाही तर लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणणारा महामार्ग ठरणार आहे. विकासाच्या कोणत्याही प्रक्रियेत भूसंपादन अतिशय महत्वाचे असते. या महामार्गाचे महत्व लोकांना समजावून सांगितल्याने आणि पाचपट मोबदला दिल्याने वेळेत भूसंपादन होवू शकले. महामार्गावर नवनगरे उभारण्यात येणार असून त्याचेही काम गतीने होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘महाज्योती’च्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करा – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना, उपक्रमांची ‘महाज्योती’मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वडले, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते.

समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगिण शाश्वत विकासासाठी ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गियांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृध्दी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींचा इतिहास, संस्कृती, चालीरीती, रुढी-परंपरा, पारंपारिक व्यवसाय आदींची माहिती तसेच समग्र वाङमयाची निर्मिती महाज्योतीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच खंडांचा समावेश असून या खंडांची छपाई शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथून करण्यात येईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे आदेश महाज्योती प्रशासनास त्यांनी दिले.

महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेसंदर्भात दिल्ली येथील नामांकीत संस्थेत प्रशिक्षण व पंधराशे रुपये प्रतीमाह छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिल्या जाते. डॉक्टरेट (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जेईई, नीट व एमएचसीइटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा केला जाणार असून प्रशिक्षण सुविधाही त्यांना पुरविल्या जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरीसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य संस्थेव्दारे देण्यात येणार आहे. संस्थेव्दारे वैमानिक प्रशिक्षणाकरिता वीस विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी करडई तेलबिया उत्पादन प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य योजनेतून विदर्भातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी खते, किटकनाशक व पिक संवर्धक औषधीसाठी 2 हजार 200 रुपये अनुदान दिल्या जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “तृतीय गुणरत्न” या उत्कृष्ठ नाटकाच्या प्रयोग सादरीकरणासाठी निर्मात्यांना व त्यांच्या चमूला अनुदान दिल्या जाईल. येत्या काळात मुंबई, रत्नागिरी व नांदेडे येथेही महाज्योतीचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत तेथील क्षेत्रातील मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

नागरी सुविधांची कामे गतीने पूर्ण करा

गावांचा व शहरांचा विकास तेथील मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र तसेच स्वच्छता आदी घटकांवर अवलंबुन असतो. गावांचा कायापालट होऊन सुंदर शहर म्हणून लौकीक मिळविण्यासाठी नगर परिषद असलेल्या शहरात नागरी सुविधांची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा मंत्री महोदयांनी घेतला. ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली नगरपरिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदांना नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून नाविण्यपूर्ण योजनेतील कामे, चौक सौंदर्यीकरण, पुतळा उभारणे, डिपी रस्त्यांचे बांधकाम, इमारत बांधकाम, तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण, जलतरण तलाव आदी कामे नियोजनपूर्वक व गतीने पूर्ण करावी. नगरोत्थान योजनेंतर्गत नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावे. दलीतवस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दोन डिजीटल शाळा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये डिजीटल क्लासरुमसह पिण्याच्या पाणी, स्वच्छता गृह, विविध शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करुन शैक्षणिक आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.