कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना, उपक्रमांची ‘महाज्योती’मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वडले, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते.
समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगिण शाश्वत विकासासाठी ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गियांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृध्दी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींचा इतिहास, संस्कृती, चालीरीती, रुढी-परंपरा, पारंपारिक व्यवसाय आदींची माहिती तसेच समग्र वाङमयाची निर्मिती महाज्योतीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच खंडांचा समावेश असून या खंडांची छपाई शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथून करण्यात येईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे आदेश महाज्योती प्रशासनास त्यांनी दिले.
महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेसंदर्भात दिल्ली येथील नामांकीत संस्थेत प्रशिक्षण व पंधराशे रुपये प्रतीमाह छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिल्या जाते. डॉक्टरेट (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जेईई, नीट व एमएचसीइटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा केला जाणार असून प्रशिक्षण सुविधाही त्यांना पुरविल्या जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरीसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य संस्थेव्दारे देण्यात येणार आहे. संस्थेव्दारे वैमानिक प्रशिक्षणाकरिता वीस विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी करडई तेलबिया उत्पादन प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य योजनेतून विदर्भातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी खते, किटकनाशक व पिक संवर्धक औषधीसाठी 2 हजार 200 रुपये अनुदान दिल्या जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “तृतीय गुणरत्न” या उत्कृष्ठ नाटकाच्या प्रयोग सादरीकरणासाठी निर्मात्यांना व त्यांच्या चमूला अनुदान दिल्या जाईल. येत्या काळात मुंबई, रत्नागिरी व नांदेडे येथेही महाज्योतीचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत तेथील क्षेत्रातील मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
नागरी सुविधांची कामे गतीने पूर्ण करा
गावांचा व शहरांचा विकास तेथील मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र तसेच स्वच्छता आदी घटकांवर अवलंबुन असतो. गावांचा कायापालट होऊन सुंदर शहर म्हणून लौकीक मिळविण्यासाठी नगर परिषद असलेल्या शहरात नागरी सुविधांची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
सामाजिक न्याय भवन येथे ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा मंत्री महोदयांनी घेतला. ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली नगरपरिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदांना नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून नाविण्यपूर्ण योजनेतील कामे, चौक सौंदर्यीकरण, पुतळा उभारणे, डिपी रस्त्यांचे बांधकाम, इमारत बांधकाम, तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण, जलतरण तलाव आदी कामे नियोजनपूर्वक व गतीने पूर्ण करावी. नगरोत्थान योजनेंतर्गत नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावे. दलीतवस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दोन डिजीटल शाळा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये डिजीटल क्लासरुमसह पिण्याच्या पाणी, स्वच्छता गृह, विविध शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करुन शैक्षणिक आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
