मुख्य निवडणूक अधिकारी भेटीला आले आमच्यासाठी उत्सवाचा दिवस – तृतीयपंथीयांची भावना

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

ठाणे : मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय असा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे..हे ओळखपत्र आमच्या जगण्याला बळ देणारं आहे..आमच्या वस्तीत पहिल्यांदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी आले आमच्यासाठी हा उत्सवाचा दिवस असल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथी भगिनींनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याजवळ केली. निमित्त होते भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेले तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराचे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील भिवंडी येथे तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या विशेष शिबिरांना श्री. देशपांडे यांनी भेट दिली आणि तृतीयपंथी मतदारांना ओळ्खपत्राचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विशेष कार्य अधिकारी दीपक पवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील, किन्नर अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणे आदी यावेळी उपस्थित होते.

दि. ३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट ठेवून मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार भिवंडी येथील भंडारी कम्पाऊंड आणि गायत्री नगर येथे तृतीयपंथीय मतदार विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आज राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित तृतीयपंथी भगिनींनी आज पहिल्यांदा राज्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी आमच्या वस्तीत आले आमच्याशी संवाद साधला म्हणून भावनिक झाल्या होत्या.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात यावे त्यांनाही लोकशाही प्रकियेत सहभागी होता यावं यासाठी त्यांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे.मतदानाचा अधिकार हा तुम्हाला सक्षम करताना लोकशाहीमधील तुमचं महत्व अबाधित राखेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथी घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक तृतीयपंथी भगिनींना शुभेच्छांचे पोस्टकार्ड पाठवावे जेणेकरून मतदार नोंदणी करताना त्या कार्डचा उपयोग हा रहिवासी पुरावा म्हणून करता येऊ शकेल. तृतीयपंथी भगिनींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज आल्यावर त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्या मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना श्री. देशपांडे यांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, तृतीय पंथीय मतदार नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल असून ठाणे जिल्ह्यामध्ये त्यादृष्टीने चांगले काम केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे सहा हजार तृतीय पंथीय असून त्यांपैकी पात्र सर्वांची मतदार नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल यादृष्टीने कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. कोविड काळात समाजातील वंचित घटकांना जावणाऱ्या समस्यांमुळे प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष देता आलं त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी आमच्याकडे येऊन संवाद साधतात यापेक्षा भाग्याचा दिवस असू शकत नाही, अशी भावना अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी श्री. देशपांडे, श्री. नार्वेकर यांच्या हस्ते तृतीयपंथी नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तहसीलदार अधिक पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्याचे सादरीकरण केले. मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधून नाव वगळणी, तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आदी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


एस.पी.एम विद्यालयात बारा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न


शंकर घुगरे | सह्याद्री चौफेर 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात वर्ग 5 ते 8 वीच्या वयोगट बारा ते चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

यावेळी एकंदरीत मुलं मुली मिळून 331 विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला यावेळी शाळेचे मुख्यध्यापक श्री क्षीरसागर सर उपमुख्याध्यापक श्री. तामगाडगे सर उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

लक्कडकोट येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
                
राजुरा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ , चंद्रपूर स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्व तयारी अभियान केंद्रस्तर प्रशिक्षण पंचायत समिती राजुरा अंतर्गत जि प उ प्राथ शाळा लक्कडकोट, येथे केंद्र देवाडाचे प्रशिक्षण श्री शेषराव वानखेडे, केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. 
       
प्रशिक्षणाची सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा सौ कल्पना श्रीकुंडावार व श्री राजकर शेडमाके सर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. सदर प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी कशी करावी शाळापूर्व तयारी कशासाठी, नवीन शैक्षणिक धोरण यामध्येपालकांची भूमिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील शिक्षण प्रेमी यांची भूमिका समजावून या सर्वांच्या मदतीने दाखलपात्र विद्यार्थी यांची शाळा पूर्व तयारी कशी करावी या बाबत सखोल माहीती मार्गदर्शक श्री दिलीप पाटील सर यांनी दिली.
               
तसेच शाळा पूर्व तयारी अभियानाच्या यशस्वीकरिता मेळावा कसा घ्यावा, मेळाव्यामध्ये ७ स्टॉल कसे लावावे, प्रत्येक स्टॉलवर कोणकोणत्या कृती घ्याव्या, कृती कार्ड कसे वापरावे व पालकांच्या मदतीने १० ते १२ आठवडे बालकांचा अभ्यास कसा घ्यावा याबाबाबत श्री प्रकाश रोकमवार सर व श्री देवेंद्र रहांगडले विषयतज्ञ गट साधन केंद्र राजुरा यांनी माहिती देऊन प्रत्यक्ष पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
             
सदर प्रशिक्षणाला देवाडा केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, १ ते ५ विला शिकविणारे सर्व शिक्षक व जिल्हा परिषद शाळा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी शिक्षिका असे एकूण ५५ प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी यांना स्वादिष्ट अल्पोआहार, चाय व थंड पाण्याची उत्तम सोय करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषराव वानखेडे केंद्रप्रमुख देवाडा यांनी तर संचालन श्री संतोष उईके सर व आभार प्रदर्शन श्री मधुकर गोरे सर यांनी केले.

पथनाट्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही ते निर्हेतुक नसते. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यामार्फत सामान्यांच्या जीवनात बदल घडून यावा यासाठी स्थानिक भाषेत व स्थानिक कलाकारांच्या सहभागात राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना व गेल्या दोन वर्षातील  उपलब्धीचे सादरीकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा, तसेच अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक व सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या प्राथमिक योजनांची माहिती यामार्फत दिली जाते. सदर पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेच्या पारंपारिक कलांची ही मेजवानी मनाला भावत आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, गण, गवळण,कव्वाली, भारूड, बतावणी अशा विविध कला व त्यातून होणारे लोकप्रबोधन याला खीळ बसली होती. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्थानिक जिल्ह्याच्या विविध योजनांमधून हे कार्यक्रम राबविण्यासोबतच आपल्या नव्या मोहिमेत दमदार कला पथकांच्या गटामार्फत राज्य शासनाच्या दोन वर्षातील उपलब्धी संदर्भात मांडणी सुरू केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हे पथनाट्य ग्रामीण भागात होत आहे. शहराच्या काही भागातही पथनाट्य होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात विविध तालुक्यात पथकाने आपल्या स्थानिक भाषेतून लोकांसमोर योजनांची मांडणी केली. याला शहरी व ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

आकापूर येथील युवकांची गळफास घेऊन आत्महत्या

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील आकापुर (लाखापूर) येथील २७ वर्षीय युवकाने स्वतः च्या शेतामध्ये पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ७:१५ वाजताच्या दरम्यान घटना उघडकीस आली.
 
प्रवीण भानुदास जांभुळकर (२७) रा. आकापूर (लाखापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
     (मृतक प्रवीण भानुदास जांभुळकर वय २७ रा. आकापूर)

घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून,घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृत्यूदेह पोस्टमार्टम साठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहे.