वाघाने पाडला गायी चा फडशा, फिस्की जंगल परिसरातील घटना


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्‍यातील सालेभट्टी शिवाराला लागुन असलेले फिस्की च्या जंगल परिसरात वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले.

सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांचे पशुधन बुधवारी चराई ला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्रीच खूप शोध घेतला. परंतु तीचा शोध लागला नाही. गुरुवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास सालेभट्टी शिवारात फिस्कीच्या जंगलात पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय आढळून आली.

वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला. दिवस उजाडला असल्यामुळे वाघ तेथून पसार झाला होता.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

दिग्रस येथे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जामणी : असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी झरी जामणी तालुक्यातील दिग्रस ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार यांनी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी निःशुल्क करून दिली.

लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन व ईतर श्रमजीवी काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी व विमा योजनांचा लाभ मिळावा याकरीता सरपंच निलेश येल्टीवार यांनी त्यांच्या दिग्रस गावात ई-श्रम कार्ड नोंदणीच्या माध्यमातून असंघटित कामगारांना संघटीत केले.

राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशाने आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण करण्यात आले असल्यासंदर्भातील शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

नव कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

केशवराव भोसले यांनी संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक, संगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

इरई नदीच्या खोलीकरणाचे काम त्वरित सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील इरई नदी व वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुंबई येथे आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, इरई नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामाकरिता विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा नियोजन समितीमधून डीझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून सदर मशीनद्वारे कामाला तात्काळ सुरवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी

इरई नदी ही शहरातून वाहत असून नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीच्या पात्रातील झाडे-झुडपे, अतिक्रमण, गाळ काढणे आणि खोलीकरणासाठी तर दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे आणि विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुराच्या प्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे पैसे देण्याची तरतूद आहे. ते त्वरित दिले जाईल. तर गॅबियन बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत पालकमंत्री म्हणाले, वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर असलेले वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर आधारीत या तीर्थक्षेत्राचा विकास होणार असून त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल. वढा तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाच्या याप्रकल्पासाठी 44 कोटी रुपये प्रस्तावित आहे. दोन वर्षात 25 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यास उर्वरीत निधी खनीज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल. वढा येथे साक्षात ‘प्रति पंढरी’ साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

नदीच्या संपूर्ण लांबीमधील स्वच्छता व खोलीकरणासाठी (17 किमी.) अंदाजित 25 कोटी, नदीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमीपर्यंत नदीतट विकास व सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे अंदाजित किंमत 200 कोटी, दाताळा पुलाखालील भागात 228 मीटर लांबीच्या बंधा-याचे बांधकाम अंदाजित किंमत 20 कोटी, नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील सहा किलोमीटर संरक्षक आधार भिंत व माती भिंतीच्या बांधकामाकरीता अंदाजित 320 कोटी व इतर करावयाची कामे 7 कोटी असे एकूण अंदाजित 572 कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती अधिक्षक अभियंता (पाटबंधारे) पद्माकर पाटील यांनी दिली.

बैठकीला व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे (सा.बा.विभाग), पद्माकर पाटील (पाटबंधारे विभाग), जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, श्री. कुंभे, उपविभागीय अभियंता दि.ना. मदनकर आदी उपस्थित होते.

राज्य उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संघटनेचा संप मागे !

 सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
             
चंद्रपूर : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता दि. 23 व 24 फेब्रुवारीला राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी राज्यव्यापी लाक्षणिक संपावर जाणार होते परंतु राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री यांनी संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले व त्यांचेशी मागण्यासंदर्भात 2 तास सविस्तर चर्चा झाली. 
      
त्या चर्चेच्या अनुषंगाने जुनी पेंशन योजना देऊ शकणार नाही अशी भुमिका घेणाऱ्या राज्य सरकारने पहिल्यांदाच NPS योजनेमध्ये राज्य सरकार देत असलेल्या 14 टक्के अनुदानाची एकूण रक्कम किती होती हे पाहून याबाबत राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना देण्यासंदर्भात निर्णय घेऊ व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे लागू आहे ते लागू करु असे आश्वासन या चर्चे दरम्यान दिले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारलाही काही वेळ लागणार आहे तसेच राज्य शासनाचे या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एप्रिल पासून बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे तसेच इतरही मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मकरीत्या निर्णय माहे एप्रिल पासून घेण्यासंदर्भात शब्द उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे .या सर्व बाबींचा आज मध्यरात्री पासून सुरू झालेल्या राज्यभरातील 17 लाख कर्मचार्यांचे नेतृत्व करणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते राज्य सरकारला जुन्या पेन्शनसह इतर सर्व मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. त्याअनुषंगाने आजचा आणि उद्याचा संप आज स्थगित करण्यात आला.
    
तदवतचं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दु.12.00 वाजता सभा घेण्यात आली त्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर व कार्याध्यक्ष राजु धांडे यांनी सभेला मार्गदर्शन करताना प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या सकारात्मक आश्वासनाबाबत चर्चा करण्यात आली. या संपामध्ये स्थगितीचा निर्णय झाल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच माहे एप्रिल पर्यंत राज्य सरकारने जुन्या पेन्शन इतर सर्व मागण्यांबाबत जो शब्द दिला.त्या शब्दावर निर्णय घेतला नाही तर 17 लाख कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारी ही समन्वय समिती मे २०२२ पासून बेमुदत संपावर जाईल असे सांगण्यात आले.

या सभेचे संचालन शैलेश धात्रक यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार अनंत गहुकर यांनी मानले.
आयाेजित सभेला राजेश पिंपळकर, राजेश लक्कावार, सिमा पॉल, रजनी आनंदे, सतीश असरेट, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, समर्थ, मानकर, अतुल भिसे, प्रितम शुक्ला, अतुल किनेकर, लीना जांभुळकर, चंदू ठाकरे, श्रीकांत येवले, संजय बिस्वास, नितीन पाटील, एस.आर. माणुसमारे, अनंत गहुकर, महेश पानसे, अशोक वैद्य, राज्याध्यक्ष मुख्याध्यापक सेवा मंडळ, उमाजी कोडपे, जिल्हा सचिव प्राथमिक शिक्षक समिती तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.