आरोग्य व्यवस्था व डेरा आंदाेलनातील कर्मचा-यांच्या वेतना बाबत आ.किशोर जोरगेवारांनी हिवाळी अधिवेशनात केले अनेक प्रश्न उपस्थित

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : आज साेमवारी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. तदवतचं यावेळी आमदार जोरगेवार यांनी शहरात गेल्या ब-याच दिवसांपासून सुरु असलेल्या डेरा आंदोलनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथाही सभागृहा समोर मांडत त्यांचे वेतन कधी देणार असा प्रश्न देखिल उपस्थित केला.मुंबई येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनचा चौथा दिवस आहे. प्रश्न उत्तरांच्या तासाला बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आ.जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात वांरवार होत असलेल्या औषधसाठाच्या तुटवड्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मेडिकल कॉलेजच्या बांधकामास विलंब होत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. 300 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि 100 खाटांचे महिला रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये संलग्न करण्यात आले आहे. त्यामूळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हे मेडिकल कॉलेज कधी सुरु होणार आहे. असा प्रश्नही सुध्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला, कोविड काळात रुग्ण सेवा देणा-या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही देखिल मांडला .येथील कंत्राटी कामगार वेतन न मिळाल्यामूळे मागील अनेक महिण्यांपासून आंदोलन करीत आहे. मात्र,अद्यापही त्यांच्या आदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. कोरोनाच्या महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणा-या कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनासाठी आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे आ.जोरगेवार यांनी म्हटले असून या कर्मचा-र्यांचे वेतन कधी देता असा प्रश्न अधिवेशनात बोलतांना उपस्थित केला आहे. यावर आरोग्यमंत्री यांनी उत्तर देत याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वस्त केले आहे. 
   मागणीची दखल घेत प्रेक्षक गॅलरीतील आमदारांची व्यवस्था फ्लोरवर केल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी सभागृह अध्यक्षांचे या वेळी आभार मानले.

बल्लारपूर शहरात वंचितने केले रस्त्यावरील खड्याचे लोकार्पण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात करोडो रुपयांची लागत लावून रस्ते, नाल्या व गल्लीतले रोड बांधण्यात आले होते. परंतु जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेमुळे शहरातील संपूर्ण रस्ते नाल्या व गल्लीतील रोड फोडण्यात आले. नगराध्यक्षांच्या व काँग्रेस,भाजपा व इतर पक्ष नगरसेवकांच्या चुकीच्या नियोजनामुळे नगरपरिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीने नगर परिषदेसमोर आज साेमवारी खड्ड्यांचे लोकार्पण करून तिव्र आक्रोश आंदोलन केले.
  
बल्लारपूर नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून भाजपा प्रणित नगराध्यक्ष यांच्या गलथान व नियोजशुन्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. सुधीर मुनगंटीवारजी मंत्री असताना त्यांनी विकासाच्या नावाने वारेमाप निधीचे वाटप केले. परंतु त्यांनी व त्यांची सत्ता असणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे व भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याची ओढ लागल्याने करोडो रुपयांचे रस्ते नाल्या बांधण्यात आले. आणि तेच रस्ते फोडून त्यामध्ये पाईपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. यामुळे रस्ते बांधण्याकरिता करोडो रुपये वाया गेलेच परंतु रस्ते फोडण्याकरिता सुद्धा आर्थिक निधीचा वापर करण्यात आला.

रस्ते फोडल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून नगरपालिका प्रशासन आर्थिक निधीचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करीत आहे. वारंवार या संबंधात निवेदन देऊनही प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने राजु झोडे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आक्रोश आंदोलनात राजु झोडे यांनी भाऊंनी खड्ड्यांच्या लोकार्पणाला यावे असे आवाहन केले होते.

विकासाच्या नावाने लूटमार करून नगरपालिकेच्या व शासनाच्या तिजोरीची लुट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राजू झोडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश आंदोलनातुन केली. नगराध्यक्षांचा गलथान कारभार व त्याला साथ देणार्‍या काँग्रेस, भाजपाच्य नगरसेवकांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता आंदोलनकारी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली.

सदरहु आंदोलनात राजू झोडे, सचिन पावडे, नविन डेविड, धिरज बांबोडे,प्रदिप झामरे, जाकिर खान, सचिन थिपे,गौतम रामटेके,सुरेश डेगरे,स्वप्निल सोनटके,छोटूभाई अली, परमानंद भड़के आदींनी आंदोलनात सहभाग घेतला या शिवाय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

रा.से.यो विभागातर्फे संत गाडगे बाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियान राबवून साजरी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संत गाडगे बाबा ची पुण्यतिथी महाविद्यालय परिसर स्वच्छता करून राबविण्यात आली.

 याप्रसंगी महाविद्यालयाचे अधीक्षक रवींद्र धानोरकर यांनी संत गाडगे बाबाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच डॉ. गजानन सोडणर यांनी संत गाडगे बाबाच्या गावोगावी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेवर प्रकाश टाकण्यात आला.

सदर उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. यावेळेस बहुतांश विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून तालुक्यात संदेश पोहचवून आपला सहभाग नोंदविला.

शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रयत्नशील - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुबंई : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये काही कागदपत्राअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये आलेल्या आहेत अशा शाळा तसेच वर्ग तुकड्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३० दिवसाच्या आत प्रस्ताव दाखल करूनही सहा ते सात महिने उलटले तरी शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळालेले नाही यासंदर्भात लक्षवेधी सभागृहात मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शासनाकडून पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून अनुदानासाठी प्राप्त असल्याबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. ज्या शाळा त्रुटी असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या आहेत त्या शाळांना तीस दिवसात त्रुटी पूर्तता प्रस्ताव शासनास सादर करण्यास कळविले होते. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यापुढे कोणत्याही शाळा अथवा तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यापूर्वी वित्त विभागाची मान्यता आवश्यक राहील असे कळविले होते त्यानुसार वित्त विभागाकडे याबाबतीत काढण्यात आलेल्या त्रुटीं दूर करण्याबाबत स्वत: पाठपुरावा करू, सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून हा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपूर : रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र, हा तलाव अनेक पर्यावरणीय व जलप्रदूषणासारख्या समस्येच्या विळख्यात अडकलेला आहे. या तलावाचे खोलीकरण केले तर एकप्रकारची नवसंजीवनी तलावाला मिळेल. त्यामुळे तलावाच्या सौंदर्यीकरणावर आपला भर असून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

शहरातील इतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, डॉ.सुरेश महाकुलकर, अधीक्षक अभियंता श्री.पाटील, कार्यकारी अभियंता श्री.काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रपूरच्या ऐतिहासिक तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, उन्हाळ्यात या तलावाची पाहणी केली त्यावेळी असह्य दुर्गंधी या तलावाच्या परिसरात पसरली होती. शहरातील सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले होते. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता अत्यंत वाईट अशी अवस्था या तलावाची झाली होती. यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सतत पाठपुरावा केला. गोंडराजाचा व भोसल्यांचा इतिहास या शहराशी जोडलेला आहे. या शहराच्या ऐतिहासिक वैभवाला जपण्याचे काम करण्यात येणार असून तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या तीन वर्षात किमान 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पर्यटनाला येणारा प्रत्येक व्यक्ती रामाळा तलावाला भेट देईल, असे काम या तलावाचे होणार आहे. या तलावाचे एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंगवॉल ही तिन मुख्य कामे असून यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात केवळ रामाळा तलावच नाही तर इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी मार्चच्या बजेटमध्ये 25 कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.

कोविड काळात काही प्रमाणात विकासकामांना ब्रेक लागला पण आता विकासकामांना गती मिळाली आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे लोकांच्या सेवेचे स्थान आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये प्राप्त झाले असून साजेशी ऐतिहासिक इमारत उभी राहील, या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात गोंडराजाच्या वाड्यासारखे स्वरूप देऊन येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात येणार आहे, यासाठी 23 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. ताडोबा प्रवेशाच्या तीन ते चार गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे,यामध्ये सर्व गेट भव्य करण्यात येणार असून पर्यटकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा, विरंगुळा, करमणूक होईल अशा सुविधा तर जिल्ह्यात तयार होणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा ओढा जिल्ह्याकडे यावा अशी विकासात्मक कामे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी चंद्रपूरकरांच्या स्वप्नातील शहर उभे करण्याचे काम करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील एक ते दीड वर्षापासून रामाळा तलावाच्या खोलीकरणाचा प्रश्न सुरू होता. इको-प्रोचे बंडू धोत्रे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने रामाळा तलावाच्या माध्यमातून जिल्ह्याला चांगले पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे. तलावाची एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंग वॉल ही तिन महत्त्वपूर्ण कामे येत्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. रामाळा तलाव सौंदर्यीकरण करीता उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार बैठका घेण्यात येत होत्या.