सह्याद्री न्यूज नेटवर्क |
शहरातील इतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, डॉ.सुरेश महाकुलकर, अधीक्षक अभियंता श्री.पाटील, कार्यकारी अभियंता श्री.काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूरच्या ऐतिहासिक तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, उन्हाळ्यात या तलावाची पाहणी केली त्यावेळी असह्य दुर्गंधी या तलावाच्या परिसरात पसरली होती. शहरातील सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले होते. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता अत्यंत वाईट अशी अवस्था या तलावाची झाली होती. यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सतत पाठपुरावा केला. गोंडराजाचा व भोसल्यांचा इतिहास या शहराशी जोडलेला आहे. या शहराच्या ऐतिहासिक वैभवाला जपण्याचे काम करण्यात येणार असून तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या तीन वर्षात किमान 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पर्यटनाला येणारा प्रत्येक व्यक्ती रामाळा तलावाला भेट देईल, असे काम या तलावाचे होणार आहे. या तलावाचे एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंगवॉल ही तिन मुख्य कामे असून यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात केवळ रामाळा तलावच नाही तर इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी मार्चच्या बजेटमध्ये 25 कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.
कोविड काळात काही प्रमाणात विकासकामांना ब्रेक लागला पण आता विकासकामांना गती मिळाली आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे लोकांच्या सेवेचे स्थान आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये प्राप्त झाले असून साजेशी ऐतिहासिक इमारत उभी राहील, या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात गोंडराजाच्या वाड्यासारखे स्वरूप देऊन येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात येणार आहे, यासाठी 23 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. ताडोबा प्रवेशाच्या तीन ते चार गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे,यामध्ये सर्व गेट भव्य करण्यात येणार असून पर्यटकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा, विरंगुळा, करमणूक होईल अशा सुविधा तर जिल्ह्यात तयार होणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा ओढा जिल्ह्याकडे यावा अशी विकासात्मक कामे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी चंद्रपूरकरांच्या स्वप्नातील शहर उभे करण्याचे काम करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील एक ते दीड वर्षापासून रामाळा तलावाच्या खोलीकरणाचा प्रश्न सुरू होता. इको-प्रोचे बंडू धोत्रे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने रामाळा तलावाच्या माध्यमातून जिल्ह्याला चांगले पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे. तलावाची एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंग वॉल ही तिन महत्त्वपूर्ण कामे येत्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. रामाळा तलाव सौंदर्यीकरण करीता उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार बैठका घेण्यात येत होत्या.