वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चंद्रपूर : पीडित व संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर हे महत्त्वाचे केंद्र असून खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित सर्व मदत मिळण्यास सोईचे होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

पीडित व संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी कविता राठोड, श्याम मोदेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,पीडित महिलांसाठी एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने महिलांना भटकंती करावी लागणार नाही. महिलांशी निगडीत सर्व तक्रारींचे निवारण एकाच केंद्रातून केले जाणार आहे.

पीडित व संकटग्रस्त महिला तसेच मुलींसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली तात्पुरत्या निवासाची सोय, आरोग्यविषयक, कायदेविषयक, मानसशास्त्रीय, समुपदेशन, वैद्यकीय,संकटकाळात प्रतिसाद आणि संकटमुक्तीची सेवा यासारख्या सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यभरात सुरू आहे. संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.

प्रणालीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य स्वागत

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : पर्यावरण प्रेमी कु.प्रणाली चिकटे ही महाराष्ट्र भ्रमती करून तब्बल चौदा महिन्याच्या १४ हजार किलोमीटर चा प्रवास करून स्वगृही तालुक्यात प्रवेश करत आहेत.

वेळी तिचे मारेगांवच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तिचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी कु.प्रणाली चिकटे यांनी जागतिक पर्यावरण समस्येवर प्रकाश टाकला आणि पर्यावरण वाचवने किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी तसेच सर्व महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वणीतील स्माईल फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.

परमेश्वर सूर्यवंशी यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राज्य प्रदेश उपकार्यध्यक्ष अमोल दिलीपराव सोळंके यांनी दिले आहे.

या नियुक्ती बद्दल जिल्हा सचिव प्रदीप वानखेडे, मराठवाडा उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, महिला जिल्हा सचिव कविता डोनेकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद सोनटक्के, सदानंद गजभारे सर, अर्चना शर्मा, संगीता झिंजाडे, प्रणिता जोशी, प्रणिता देशमुख, रंजनी मडपल्लेवार यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याच्या वतीने श्री सूर्यवंशी यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचा कामगारांनी घेतला लाभ


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने मुकुटबंन येथे ई-श्रम कार्ड शीबिराचे आयोजन केले होते. असंघटित श्रेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचललेली जात आहे. अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी योजने पासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी संभाजी ब्रिगेडने या शिबिराचे आयोजन केले होते. 
      
सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशातील कोनात्याची काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजणांचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफलाईन करता येणार आहे. अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प मुकुटबंन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करून नोंदणी ची सुविधा उपलबध करून दिली होती.
      
शिबिराचा कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे, उद्घाटक पी एस आई राजेश मदेवार (धंतोली नागपूर पोलीस स्टेशन), प्रमूख पाहुणे राजू लोडे, उपस्थिती समीर लेनगुडे (संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष यवतमाळ), देव येवले (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष), केतन ठाकरे (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ), शंकर झाडे (शाळा सुधार समिती अध्यक्ष) अशोक पणघाटे (माजी ग्राम पंचायत सदस्य), प्रफुल भोयर (रक्तविर बहुउद्देशीय संस्था) आशिष झाडे अध्यक्ष (शिवाक्रांती कामगार संघटना ), सुरज सुरपाम यांचा उपस्थिती त पार पडला. 
  
कार्यक्रमाचे संचालन शुभम राऊत यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, संदीप आसुटकार, लखन कांबळे, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, प्रशांत बोबडे, दिलीप पाचभाई, आकाश पारखी, संदीप येवले, गौरव धोटे, गणपत गेडाम, प्रणय काळे, आदींचे सहकार्य लाभले.

लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, नंतर झाली गर्भधारणा; मुलगी सात वर्षाची झाली तरी आरोपी पोलिसांना मिळेना !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अनुसूचित जमातीतील महिलेचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या तेथीलच युवकाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश न आल्याने पीडित महिला ही मागील सात वर्षांपासून पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. सदर युवकाने लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधामुळे झालेल्या गर्भधारणेतून महिलेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी आज सात वर्षाची झाली आहे. पण तिच्या कायदेशीर लढ्याला मात्र,अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांनी आता तिच्या तक्रारीची दखलही घेणे बंद केल्याचे तिने आज २६ डिसेंबरला विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. शारीरिक शोषणकर्त्या युवकाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच पोलिसांच्या कार्यवाहीला ब्रेक लावला असल्याची पीडितेची खंत आहे. युवकाकडून शारीरिक शोषण झाल्यानंतर गर्भधारणा होऊनही पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याऐवजी पीडितेवरच दबाव आणल्याची कर्मकहाणी तिने पत्रकार परिषदेत कथन केली. शारीरिक उपभोग घेऊन युवकाने तर पळ काढला पण त्याच्या पासून झालेल्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी मात्र पीडिता एकाकी पार पाडत आहे. मुलीला वडिलांचे नावही न मिळाल्याने तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लग्न करण्याची ग्वाही देऊन शरीर संबंध ठेवले, व मातृत्व लादून तो फरार झाला. त्याच्या शारीरिक सुखाची ती बळी ठरली. तिच्यावर झालेल्या अन्यायाची ती स्वतःच शिक्षा भोगत असून त्यालाही त्याच्या चुकीची शिक्षा मिळावी या अपेक्षेने मागील सात वर्षांपासून न्यायासाठी ती पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. पण तो सापडतच नसल्याचे कारण सांगून तिला आल्यापावली परत पाठविले जात आहे. कधी तरी पोलिस आरोपीचा शोध लावतील, व आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळेल, हा विश्वास घेऊन ती सतत पोलिस स्टेशनला येत असते. 

तिने आपल्या दुर्दैवी जीवनाची कहाणी कथन करतांना सांगितले की, २००६ मध्ये तिचे लग्न झाले. मुलगा एसटीमध्ये नोकरीला आहे, असे सांगून या सामान्य कुटुंबाची फसवणूक करण्यात आली. नंतर दहा दिवसांतच तिचा घटस्पोट झाला. पच्छात ती रोजमजुरी करून आईवडिलांकडे राहू लागली. अशातच तिच्या भावाचा मित्र असलेला राकेश शंकर उईके रा. विरकुंड याचे त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले. तो तिच्याशी निमित्त साधून बोलत असायचा. घराशेजारीच राहणारा व भावासोबतच इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करणारा राकेश उईके हा नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार महिलेसोबत बोलू लागला. सतच्या होणाऱ्या संवादातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. नंतर एकमेकांत भावना गुंतत गेल्या. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिनेही आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. २००९ पासून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. २०१३ मध्ये तिला त्याच्या पासून दिवस गेल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नासाठीचा आग्रह धरला. पण त्याच्या कुटुंबाला हे प्रकरण माहिती होताच त्यांनी साफ नकार दिला. व मुलाला मार्डी येथे लपवून ठेवले. पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे कळातच तिने पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची तयारी दर्शविली. पण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी गावातच न्यायनिवाडा लावून देतो, असे सांगत सभा घेण्याच्या बहाण्याने त्यांना समिती कार्यालयातच डांबून ठेवले. पण समितीच्याच एका पदाधिकाऱ्याने त्यांची तेथून कशीबशी सुटका केली. नंतर पिडीतेने फेब्रुवारी २०१४ मध्ये सरळ वणी पोलिस स्टेशन गाठून राकेश उईके याच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६, ४१७ नुसार गुन्हाही नोंदविण्यात आला. पण राकेश उईके याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असल्याने व त्याचा काका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याला अटक मात्र झाली नाही. त्याला त्याचा काका, कुटुंबातील अन्य सदस्य व त्याच्या एका मित्राने ऐन पाळण्याच्या दिवशी वणी तालुक्यातूनच फरार केले. त्यानंतर कार्यवाहीही थंडस्त्यातच चालली. त्यावेळी काकाने पोलिसांची बाजू धरून ठेवली. कार्यवाहीला वेग येण्याआधीच आर्थिक अडथळे निर्माण केले. त्यामुळे पोलिसांनीही महिलेलाच धाकदपट करणे सुरु केले. तिलाच आरोपी शोधण्याचं आव्हान दिल्या गेलं. सामान्य कुटुंबातील या महिलेला न्याय देण्याऐवजी अन्यायकारक वागणूक दिल्या गेली. तरीही पोलिसांवर व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेऊन ती सात वर्षांपासून सतत पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. कधी तरी आरोपीला अटक होईल व आपल्याला न्याय मिळेल हा तिचा विश्वास आजही जिवंत आहे. आता तिला खरोखरच न्याय मिळेल की, अन्यायकारकच जीवन तिला जगावं लागेल, हे आता येणारा काळच सांगेल. पण न्यायासाठी धडपडत असलेल्या पीडित महिलेने पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.