मालवाहू वाहन चालकाशी वाद घालून केली मारहाण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : विनाकारण वाद घालून एका मालवाहू वाहन चालकाला एका जनाने आपल्या मित्रासह लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना २७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर येथे घडली. याबाबत वाहन चालकाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या रसीद खान पीर खान पठाण (२९) याचे स्वतःचेच मालवाहू पिकअप वाहन असून तो स्वमालकीचे वाहन चालवितो. २७ नोव्हेंबरला तो पांढरकवडा येथे मालवाहतूक करून रात्री ९ वाजता वणीला पोहचला. शास्त्री नगर येथील वाचनालयाजवळ अमित चांदेकर (२९) रा. नारायण निवासच्या मागे, सतीघाट रोड हा दुचाकीने रसीद खान याच्या वाहनाजवळ आला. समोर वाहने असल्याने रसीद खान थांबला असतांना आरोपीने विनाकारण त्याच्या गाडीचा साईडग्लास फिरवला. रसीद खान याने साईडग्लास का फिरविला असे विचारताच अमित चांदेकर याने रसीद खानला शिवीगाळ करित मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी रसीद खानला वाहनाच्या खाली ओढत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे रसीद खान मदतीकरिता ओरडू लागला. त्याचं ओरडणं ऐकून आसपासचे लोकं मदतीला धावून आल्याने अमित व त्याच्या मित्रांनी पळ काढला. रसीद खान याच्या नाका तोंडाला जबर मार लागल्याने नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर रसीद खान याने वणी पोलिस स्टेशनला येऊन अमित चांदेकर याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमित चांदेकर व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भादंवि च्या कलम ३२५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे आमदारांच्या हस्ते अनावरण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील निंबाळा रोड येथे लोक सहभागातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे अनावरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. २७ नोव्हेंबरला हा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जी.प. सदस्य संघदीप भगत, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंचा सुनिता ढेंगळे, शिवसैनिक प्रविण खानझोडे, विद्याताई जुनगरी, पोलिस पाटील प्रविण राऊत, सेवा मंडळाचे पदाधिकारी अरविंद महातळे, मनोज दुधकोहळे, राजू आसेकर, सुभाष लसंते, मनोज ढेंगळे यांची उपस्थिती लाभली. 

संतांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण नेहमी स्मरणात रहावी, व लोकांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचा आदर्श उभा रहावा म्हणून गाव शहरात राष्ट्रसंतांचे पुतळे उभारले जात आहे. तुकडोजी महाराज व गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लोकांनी मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा, तसेच त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी डोळ्यासमोर उभं रहावं हा या राष्ट्रसंतांच्या पुतळे उभारण्यामागचा उद्देश असल्याचे सेवा मंडळाने यावेळी सांगितले. 
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांची माहिती सांगितली. तसेच संजय पिंपळशेंडे व प्रविण खानझोडे यांनीही राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन गजानन येलपुलवार केले. गावात पुतळे उभारणीपासून तर पुतळ्यांचा अनावरण सोहळा यशस्वी करण्यापर्यंत मोलाचे सहकार्य समस्त गावकऱ्यांनी केले.

नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा चंपरतराव डाकोरे पाटिल यांच्या आदेशानंतर बिलोली देगलुर चे नुतन आमदार मा अंतापुरकर यांची दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता देगलुर चे ता अध्यक्ष अनिल रामशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवांसाठी राखीव आमदार निधी आपल्या मतदारसंघात 3 डिसेबर दिव्यांग जागतिक दिनी वाटप करावा म्हणून निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
    
१) शासन निर्णय नियोजन विभाग मंञालय मुंबई क्र स्थाविका - 0616/प्र क्र.96/1482 दि.12/7/2016

२) जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी नांदेड जा व क्र.नियो/अस्थाविका/का-6/21/22/1461 दि.24/11/21

वरिल शासन निर्णय व जिल्हा नियोजन समिती यांच्या पञानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 दिव्यांगासाठी अनुज्ञेय कामे आपल्या मतदारसंघात दहा लक्ष निधी दिव्यांगासाठी शासन निर्णय 1 प्रमाणे खर्च करू शकतात तरी दिव्यांगासाठी असलेला निधी खर्च करून दिव्यांगाना आधार द्यावा.     
महाराष्ट्र शासन दिव्यांग हा सर्व सामान्य जनतेसाठी जीवन जगता यावे म्हणून शासन 2016 ला दिव्यांग कायदा करुन अनेक शासन निर्णय वरिष्ठ आदेश असुन संसदेत कायदा करणारे खासदार, आमदार यांनीच अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाचे लक्ष व अनेक आमदार यांना निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू असुन, देगलुर मतदार संघाचे नुतन आमदार अंतापुरकर यांना ता अध्यक्ष अनिल रामदिनवार यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिव्यांग आमदार निधीची  मागणी केली.
     

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हिडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.

स्पर्धेचे नियोजन:

जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल

राज्यपातळीवर:- परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.

बक्षिसे:- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.

स्पर्धेचा अभ्यासक्रम :

बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100

दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढे

चौथी पाचवी साठी पावकी, निमकी

सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,

आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मुंबई : “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेनं काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचं मी मन:पूर्वक आभार मानतो. सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले असून राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आलं. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटं आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटं किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर... हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारनं ती परंपरा कायम राखली. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, एकजुटीनं राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे.

राज्यावरचं कोरोना संकट अभूतपूर्व असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिलं आहे. या कोरोनायोद्ध्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोनायोद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना संकटांच्या बरोबरीनं राज्यासमोर आर्थिक आव्हानंही उभं राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरंच नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणं आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी बांधिल असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, आमदार स्थानिक निधीत वाढ, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत, आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, शिवभोजन थाळी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी भरीव निधी अशा अनेक निर्णयांची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.