मारेगांव येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी नेहरू कला केंद्र यवतमाळ च्या वतीने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच या संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य हेमंत चौधरी म्हणाले ज्या संविधानाने भारतातल्या विविधतेला एकतेत बांधून ठेवले आहे त्या संविधानाचा आदर करा, संविधानाची नैतिकता टिकवा हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

घोडमारे सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, बुजोने सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्यापक यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्याचे निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावी पणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

अन्न व औषधं प्रशासन मंत्री डॉ शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत करावे, तसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारीवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल असे सांगितले.

वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेला वजन काटा ठरत आहे अपघात प्रवणस्थळ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी वरोरा मार्गावरील टी-पॉईंट जवळ अगदी रस्त्यालगत वाहनांचा वजन काटा असल्याने खाजगी कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या वजन काट्यावर वजन करण्याकरिता नेहमी मोठी रांग लागलेली असते. वाहने अगदी रस्त्यावर रांग लाऊन उभी रहात असल्याने वाहतुकीला तर अडथळे निर्माण होतच आहे, पण वजन करणाऱ्या वाहनांच्या अवागमनामुळे काट्याजवळील मुख्य मार्गाची अवस्था कोळसा खदाणीतील रोड पेक्षाही निपटार झाली आहे. मुख्य रस्त्यावर धूळ मातीचे थर जमा होऊन छोटी छोटी ढिगारं तयार झाली असून त्यावरच दिवसातून एखाद वेळा पाणी मारले जात असल्याने दुचाकी वाहने स्लिप होऊन कित्येक दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाले आहेत. अगदीच रोडला लागून काटा असल्याने काटा केल्यानंतर वाहने कोळसा सायडींगकडे वळवतांना तीन चार वेळा मागे पुढे घ्यावी लागतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी कोंडी होतांना दिसते. काट्यापासून काही अंतरापर्यंत नेहमी धूळच धूळ पसरलेली असते. काट्यापासून समोर काळं धुकं पाहायला मिळतं. या मार्गाने जातांना नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसतो. या मार्गाने दुचाकीने जाणारा प्रत्येक जण या काळ्या धुक्यात काळाभोर होऊन निघतो. या काट्यावर वजन करण्याकरिता वाहनांची असणारी रेलचेल मोठ्या अपघाताची चाहूल देत आहे. वजन करण्याकरिता मुख्य रस्त्यावरच वाहनांची रांग लागून राहत असल्याने नेहमी याठिकाणी वाहनांचा जाम लागताना दिसतो. कोळसाखाणीतील रस्त्यासमान झालेल्या या मुख्य रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने लगतच्या गावचे सरपंच देखील जखमी झाले आहेत. या रस्त्याने दुचाकीने जाणारं एक कुटुंबही चार पाच दिवसांपूर्वी काट्याजवळ दुचाकी घसरून पडलं. दुचाकीवरील महिला चांगलीच जखमी झाली. त्यामुळे या काट्याविषयी नागरिकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. निळापूर येथील कोल वॉशरी मधून खाजगी रेल्वे कोळसा सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. कोल वॉशरी मधून कोळसा भरून येणारी वाहने रस्त्यालगत असलेल्या या काट्यावरच वजन करतात. त्यामुळे हा काटा आता अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. या काट्यावर काटा करण्याकरिता सदैव वाहनांचा जमावडा रहात असल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे धुळीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या काट्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. काळ्या कोळशात सर्वांचेच हात काळे होत असल्याने कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर अनियंत्रित कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. वाहनांचा हा वजन काटा त्याच धोक्याची घंटा असून रस्त्यालगत असलेल्या या वजन काट्याची संबंधितांनी वेळीच दखल न घेतल्यास सर्वांनाच त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

संविधान दिनी ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ माहितीपटाचे आज समाज माध्यमांवर प्रसारण


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : संविधान दिनानिमित्त 'महापुरुष डॉ.आंबेडकर' या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर आज २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी प्रसारण करण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १६ मिनीटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केला आहे.

या चित्रपटात डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

महापुरुष डॉ.आंबेडकर यांची जीवनागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तसेच या दुर्मिळ माहितीपटास पाहता यावे यासाठी याचे प्रसारण करण्यात येत असल्याचेही महासंचालनालयामार्फत कळविले आहे.

मुंबई विभागाअंतर्गत महासंचालनालयाच्या

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR या लिंकवर हा माहितीपट पाहता येईल.