झरी व खडकडोह मंडळाला अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या - शेतकऱ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : यंदा अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, तूर या मुख्य पिकांबरोबर इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरसकट मदतीची आवश्यकता असतांना ही ५ पैकी मार्थाजुन, शिबला, मुकुटबन हे ३ मंडळ अतिवृष्टीच्या मदतीस पात्र ठरवून खडकडोह आणि झरी हे मंडळातील ३५ गावातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तेरा ग्रामपंचायतीत ग्रामसभेत ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे नुकसान ची मदत मागितली आहे.

यावर्षी सतत चा पाऊस पडल्यामुळे आमच्या मंडळात प्रमाणात पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या शेतातील पिकांची भरपूर नासाडी नुकसान झालेली आहे. तरी पण, अतिवृष्टी मधून आमचे झरी व खडकडोह वगळण्यात आले. हा आमच्यावर होत असलेला  मोठा अन्याय आहे. परिणामी आम्ही सर्व शेतकरी बांधव तुम्हाला विनती करतो की, झरी आणि खडकडोह मंडळ अतिवृष्टी च्या यादी मध्ये आमच्या मंडळाला समाविष्ट करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सहकुटुंब उपोषणाला बसावे लागेल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांना (ता.१ नोव्हें.) ला देण्यात आले.
यावेळी निलेश येल्टीवार, सतिश नाकले, मारोती येडमे जिवन उलेमाले, सचिन डहाके, हरिदास गुर्जवार, व्यंकटेश कोडापे, राकेश गालेवार, प्रकाश राजकडकर, जिवन काळे, विकास मानकर, विनोद भोंग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

नागपूरच्या याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूर जिल्ह्याच्या पदाधिका-यांची सदिच्छा भेट !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : उपराजधानी नागपूर स्थित "प्रभात याेग प्राणायाम शिबीर"गोरखेडे काॅमप्लेक्स सीमीनरी हिल नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे भारत स्वाभिमानचे अध्यक्ष विजय चंदावार, पतंजली योग समितीचे संघटन मंत्री शरदजी व्यास , पतंजली योग समितीचे उपप्रभारी रमेशजी ददगल तथा भारत स्वाभिमान चंद्रपूरचे कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभय्ये यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

या वेळी नित्य योग वर्ग मार्गदर्शिका, योग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांनी त्यांचे या नित्य चालणां-या निःशुल्क प्राणायाम वर्गाचे मुक्तकंठाने काैतुक करीत त्यांचे पुढील कार्याला शुभेच्छा प्रदान केल्या. या वेळी विनोद झुंगरे याेग साधिका पूनम काेसरे, स्मिता झुंगरे, सुशिलाताई झुंगरे, साधना गर्ग, सोनु भुक्ते उपस्थित होत्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती येथे या पुर्वी मायाताई काेसरे यांनी नित्य याेगा प्राणायाम वर्ग चालविले आहे. विशेषत: त्यांचे या वर्गाला महिला व तरुणींचा उत्तम प्रतिसाद मिळताेयं! सहजं सुचलंच्या वाटचालीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

१७ नंबर फॉर्म भरून दहावी-बारावीची परीक्षा द्यायची? या आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या तारखा

                      (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नंबर १७ भरून) प्रविष्ट होण्यासाठी २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरया कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

या सुविधेनुसार विद्यार्थी २२ नोव्हेंबरपासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील.


इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर इ. बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर ११ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत.

खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी ५०० रूपये नोंदणी शुल्क तर १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी.

विद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.

 विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

उपसरपंचाने केले स्वखर्चाने रस्त्यावरील पाण्याचे व्यवस्थापन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागाव : तिवरंग येथे वार्ड क्र.२ मधील मस्जिद व पोचमाय मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साचुन चिखलाचे साम्राज्य पसरले होते .कार्तिक महिन्यात काकडा निघत असुन दिंडीच्या मार्गामध्ये व मस्जिदमध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने रहिवाशांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली परंतु सामान्य फंडात पैसे नसल्याने व १५ व्या वित्त आयोगात सचिव साहेबांनी कसलेही आराखडा (इस्टीमेट) बनवण्यात न आल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, उपसरपंच गुणवंत राठोड यांनी स्वखर्चाने मजुर लावुन या सांडपाण्याची विल्हेवाट लावली.

यावेळी ग्रा.प.सदस्य इरफान चव्हाण, संदिप मदने, संजय नांनोर, सुनिल तायडे, अजय आडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. उपसरपंच गुणवंत राठोड यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे गावकरी कौतुक करीत असून, त्यांचे आभार मानत आहेत.

बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणांऱ्या कृषी केंद्र संचालकाने नुकसान भरपाई द्यावी!



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर येथील बहुचर्चित दत्त कृषी केन्द्राचे संचालक राजू उर्फ प्रदिप मनिराम वैद्य यांनी शेतक-यांना शेती हंगामात बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शुध्द फसवणूक केली असल्याचे प्रकरण काही दिवसांपुर्वी उघडकीस आले असुन, या संदर्भात कृषी केन्द्र संचालकाविरुध्द विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. तदवतचं कृषी विभाग चिमूर तथा चंद्रपूर विभागाच्या अधिका-यांनी रितसर चाैकशी करुन या बाबतीत पाेलिस विभागास काही पुरावे देखिल सादर केल्याचे वृत्त ऐकीवात आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील प्रहारचे युवा नेता महेश हजारे यांचे नेत्रूत्वाखाली शंकरपूर परिसरातील काही शेतक-यांनी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची काल साेमवार दि.१ नाेव्हेंबरला भेट घेतली व चर्चा करुन हतबल झालेल्या शेतक-यांना संबंधित कृषी केन्द्र संचालका कडुन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. या दुकानातुन ब-याच शेतक-यांनी रासायनिक खते खरेदी केले असुन, त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. फसवणूक झालेल्या शेतक-यांची परिस्थिती फार बिकट झाली असुन शेतक-यांचे अंदाजे पाच ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. अशा आशयाचे एक निवेदन चंद्रपूर प्रहारच्या माध्यमातुन कालच सायंकाळी पाेलिस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिका-यांना सादर करुन फसवणूक झालेल्या शेतक-यांना याेग्य न्याय देण्यांची मागणी या निवेदनातुन करण्यात आली.
निवेदन सादर करतांना महेश हजारे, अशिद अमरदिप मेश्राम, कमलाकर दादाजी ठाकरे, किशाेर सर्जेराव चौधरी, पवन सजन गजघाटे, आशिष अशाेक ठाकरेंसह अन्य कास्तकारांचा समावेश हाेता. याच शिष्ट मंडळाने काल चंद्रपूर येथील क्रूषी विभागाच्या एका अधिका-यांची भेट घेवून या प्रकरणा बाबत सविस्तर चर्चा केली असल्याचे महेश हजारे यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.