जड वाहतूक शहरातून बंद करून घुग्घुस नगरी प्रदुषण मुक्त करा - यासाठी आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण आरंभ !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : घुग्घूस शहरातून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. तदवतचं प्रदूषणात वाढ होत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गप्प बसले आहे.

घुग्घूस शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शहरात प्रदूषण अत्यंत झपाट्याने वाढत असुन नागरिकांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुलांना दमा, शुगर, लकवा, सदृश्य आजार होत असुन शहरांमध्ये दररोज वाहतुकीची काेंडी हाेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नित्य दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात घडत आहे. प्रत्यक्ष पाहता जड वाहतूक WCL च्या मार्गाचा पर्याय उपलब्धआहे पण, WCL चे अधिकारी व ट्रांसपोर्ट कंपनी चे मधुर संबध असल्यामुळे हा प्रकार सातत्याने सुरु आहे.

प्रदूषण करणारे ट्रकवर शहरातून सरार्सपणे नियम मोडून ट्रकला ताडपत्री न टाकता ओवरलोड वाहतूक करण्यात येते. पण RTO विभाग सुध्दा डोळे बन्द करुन कुंभकर्णी झोपेत गेला आहे. ह्या सर्व समस्या लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा ३० ऑक्टाेंबरला साखळी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, तहसिलदार, पोलिस स्टेशन घुग्घुस यांना देण्यात आले. परंतु याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी आज रोजी पासून आप तर्फे स्थानिक छत्रपति चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. घुग्घुसचे शहर अध्यक्ष अमित बोरकर हे उपोषणाला बसले असून बहुजन समाज पार्टीने देखिल या आंदोलनाला आपले समर्थन जाहिर करत BSP चे अध्यक्ष मोहन येमुर्ले उपोषणात सहगागी झाले आहे.
उपाेषण मंडपस्थळी प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, अभिषेक सपडी, सागर बिऱ्हाडे, राजेश चेडगुलवार, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश, निखिल बारसागडे, संदीप पथाडे, रवी शंतलावार, अभिषेक तालपेल्ली, भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, भद्रावती ता. सचिव सुमित हस्तक, रजत जुमडे, सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर, आदी उपस्थित होते.

दालमिया सिमेंट कंपनीने कामगारांचा अंत बघू नये - ॲड.संजय धोटे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनी सुरु होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे,परंतु त्या ठिकाणी कामगारांना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. त्याकडे वारंवार कामगार संघटना व कामगारांनी कंपनी प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली परंतु त्याकडे कंपनी प्रशासनाने पुर्णता दुर्लक्ष केले. दरम्यान, भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे दालमिया सिमेंट कंपनी येथे गेट मिटिंगचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कंपनी प्रशासनानी कामगारांना स्थानिक कामगारांना प्रामुख्याने कामावर घ्यावे व कामगारांचा अधिक अंत बघू नये. नारंडा परीसरातील सर्व कामगारांना कामावर न घेतल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी दिला आहे यावेळी ते अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते. मंचावर भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते ॲड.शैलेश मुंजे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, सिमेंट संघाचे उपाध्यक्ष किशोर राहुल, वनोजा सरपंच दिलीप पाचभाई, कढोली खुर्द उपसरपंच विनायक डोहे, पिपरी येथील माजी सरपंच कवडू कुंभारे, नारंडा उपसरपंच बाळा पावडे, अनिल मालेकर,अजय तिखट आदीं उपस्थित होते.

        
दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनाने वारंवार भारतीय सिमेंट मजदूर संघासोबत बैठक आयोजित केल्या कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार कंपनीतर्फे वेळ मागण्यात आला, परंतु १ वर्ष उलटूनही त्यांच्यातर्फे फक्त वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असून, कामगारांची दिशाभुल करण्याचा प्रकार कंपनी प्रशासनातर्फे होत आहे यासमोर असा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही अन्यथा कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते शैलेश मुंजे यांनी दिला आहे.         
कंपनी प्रशासनाने नारंडा परिसरातील कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात यावे, O&M कामावर घेत असताना त्यांच्या जुन्या पदस्थापनेनुसारच कामावर घेण्यात यावे, पॅकिंग प्लांट मध्ये सर्व जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे, तसेच कामगारांना पगार वाढ देण्यात यावी अश्या प्रमुख मागण्या यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी कामगारांसोबत चर्चा करताना सांगितल्या.
     
यावेळी कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामरूप कश्यप, राजू गोहणे, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, वैभव गाडगे, अक्षय भोसकर, वैभव तिखट यांनी परिश्रम घेतले.

वणी : रसायनशास्त्राची विद्यापीठ स्तरीय सेमिनार स्पर्धा संपन्न



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (३० ऑक्टो.) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत समस्त विज्ञान महाविद्यालयां मधील विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित रसायनशास्त्र विषयाची सेमीनार स्पर्धा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्यासपीठावर संपन्न झाली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उद्घाटक आणि बीजभाषक डॉ एस पी देशमुख यांच्यासह डॉ पी आर राजपूत, डॉ. के.एन. पुरी, डॉ. पी. जे गांजरे, डॉ. एस एस कांबळे, डॉ सुमेर ठाकूर तथा डॉ. प्रवीण रघुवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रसायन शास्त्र विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयातील विविध प्राध्यापकासह सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन सेमिनार स्पर्धेत सहभाग घेतला.
प्रास्ताविकात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांनी अशा स्वरूपातील स्पर्धा 15 वर्षापूर्वी देखील आयोजित केली होती हे सांगत इतिहासाला उजाळा दिला आणि रसायन शास्त्र विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.
बीजभाषणामध्ये डॉ. देशमुख यांनी आयुक्टा चे कार्य विशद करून सध्या सुरू असते या रजत महोत्सवाबद्दल उपस्थितांना उद्बोधन केले.
डॉ. राजपूत यांनी आशा सेमिनार चे महत्व स्पष्ट केले तर डॉ. पुरी यांनी विद्यार्थी जीवनातील परीश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या विविध कार्याचे कौतुक केले.
या वेळी घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सेमीनार स्पर्धेत श्रद्धा गणेश मेहरे, सुरभी अतुल अटारा आणि समन शेख यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके आयुक्टा च्या वतीने तर श्रावणी नंदकिशोर बावणेर हिला लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रविण गांजरे आणि डॉ. शैलेश कांबळे यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. श्रद्धा मेहरे हिने विजेत्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित काळे यांनी तर आभार प्रदर्शन श्वेता राऊत यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोध पत्रांचा संग्रह लवकरच ई-बुक स्वरूपात किंवा युट्युब लिंक च्या माध्यमातून सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा श्रोत्यांमधून व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (३० ऑक्टो.) : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका सचिव व काळी दौ च्या माजी सरपंच सौ साधनाताई आळणे यांची भाची कु. दिक्षा अरुण भवरे (मोहदी) हिने युपीएससी (UPSC) परीक्षेत राज्यात (STATE) दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आझाद पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वहाब भाई, अनिल चवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हंसराज मोरे, सामाजिक न्याय विभाग सेल चे तालुकाध्यक्ष उज्वल रणविर, शरद काळे, राजू राठोड, विश्वपाल ढोबळे, आदिंची प्रमुख्याने उपस्थित होते. सदर छोटेखानी कार्यक्रम अशोक आळणे यांच्या निवास्थानी कार्यक्रम संपन्न झाला.

मुकुटबन : क्रेशरने घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील मजुराचा बळी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो ) : तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडकी (गणेशपूर) शेत शिवारात एका मजुराचा सोयाबीन काढत असतांना क्रेशर मध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 च्या दरम्यान घटना घडली.

मृतक विलास भूदाजी तोडासे (अंदाजे वय ५५) रा. भाटाडी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. 
सध्या जिल्ह्यात मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील जिल्ह्यातील मजूर कामाला येत आहे. कापूस वेचणी ला वेग आला असून समोर दिवाळी असल्याने शेतातील शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठया क्रेशरने (हडंबा) काढून देण्याचे काम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गँग मजुरीसाठी या परिसरात येऊन असून, त्या गँग मधील काही लोक खडकी येथील विठ्ठल ठावरी यांच्या शेतात क्रेशरने सोयाबीन काढण्याचे काम करीत होते. पुढे दीपावली असल्याने हे मजूर आज सर्व कामे आटोपून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतांना दि.३० ऑक्टोबर रोजी विलास तोडासे नामक व्यक्तीचा  सोयाबीन काढतांना अचानक तोल जाऊन क्रेशेरच्या पट्ट्यावर मजूर पडल्याने तो सरळ क्रेशेरच्या आतपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताची माहिती खडकी,मुकुटबन,गणेशपूर व अडेगाव पर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांची गर्दी पाहण्याकरिता उसळली.
सदर घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू लोंढे व पोलीस पाटील मंगेश बरडे हजर होते त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजू नेवारे व पोलीस नाईक संतोष मडावी घटनास्थळी पोहचले. पंचनामा सुरू होता. पंचनामा करून शव शविच्छेदन करिता झरी येथे पाठविण्यात येणार आहे. मात्र येत्या सणासुदीच्या पर्वावर तोडासे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.