तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३१ ऑगस्ट) : तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचा कारभार मागील अनेक वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही अर्जाकडे ढुंकूनही बघायचे नाही. असा अलिखित कायदाच येथे तयार केल्याचे दिसत आहे.
    
२०२१-२२ आर्थिक वर्षापासून फेरफार आभासी पद्धतीने सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून शेकडो फेरफार प्रकरणे प्रलंबित असून आभासी पद्धत असल्याने दिरंगाई होत असल्याचे चे उत्तर सर्वांना देण्यात येत आहे. शिवाय मार्च, एप्रिलमधील काहींचे अर्ज गहाळ झाले असून, कोणीही याकडे लक्ष द्यायला देण्यास तयार नाही. कार्यालयात अधिकारी कधी येतात कधी जातात हा मोठा संशोधनाचा विषय असून,कनिष्ठ कर्मचारी सुद्धा अधिकारी नसल्याने बराच काळ बाहेर घालवीत असतात चौकशी केली तर साहेब मिटींगला गेले. मोजणीसाठी गेले असे उत्तर मिळते.
    
शेतकरी बांधवांना कृषी कर्जासाठी नकाशा सक्तीचा केला असून, त्यांचे अत्यल्प शुल्क असूनही १०० रुपये घेतल्याशिवाय नकाशा दिला जात नाही. कुणी नियमाप्रमाणे शुल्क दिले तर आठ दिवस नकाशाच दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना नाहक तुटल्या जात आहे.
        
अशातच एका विधवा महिलेस घरकुल मंजूर झाले. त्यासाठी तिने ५ महिन्यापूर्वी फेरफारचा अर्ज दाखल केला होता. त्यात ५ रुपयाची टिकीट नसल्याने अर्ज हेतूपरस्पर प्रलंबित ठेवण्यात आला. विधवा महिलेने पोचपावती वर तिकीट असल्याचे दाखवून दिल्याने तो अर्ज पुन्हा घेतला. या विधवा महिलेस ५ महिन्यापासून चकरा मारावयास लावूनही तिथे फेरफार न झाल्याने तिचे घरकुल वापस गेले. त्यामुळे ही महिला हक्काच्या घरापासून वंचित झाल्याने येथील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर लगाम कोणी लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेरणा हायस्कूल एन-6 सिडको औरंगाबाद येथील कार्यरत क्रीडा शिक्षक रमेश प्रधान यांना आदर्श क्रिडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार !


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (३१ ऑगस्ट) : राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रमेश प्रधान यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आज पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भारत सरकार मा.ना.डाॅ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.राजेंद्र दर्डा हे होते. क्रीडा महर्षी डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर तसेच संस्थापक अध्यक्ष मा.सचिन मुळे यांच्या हस्ते आदर्श क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार गौरव प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम भानुदास चव्हाण हाॅल येथे संपन्न झाला.

लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारी भाजपा महापौर व आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करा - नगरसेवक देवेंद्र बेलेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज चंद्रपूर शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली, ही सभा ऑनलाइन असल्याने नगरसेवकांना सभागृहात येणे बंधनकारक होते, परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये कुठे ही येण्यास बंदीचे आदेश नसतांना मनपातील महापौर व आयुक्तांनी नगरसेवकांना महानगरपालिका गेट वर आत येणाऱ्या नगरसेवकांना पोलीस बंदोबस्त ठेवून आत येऊ दिले नाही.

आज जी घटना घडली ती महानगरपालिका इतिहासात पहिल्यांदाच घडली की, लोकशाही मध्ये महानगरपालिका सदस्यांनाच पालिका मध्ये येऊ न देणे म्हणजेच लोकशाही ला काळिमा फासण्याचे काम या भ्रष्ट्राचारी भाजपा महापौर यांनी केले व याला दुसरे भ्रष्ट्राचारी आयुक्त यांनी साथ दिली.
नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये आत येऊ न दिल्याने महानगरपालिका गेट जवळच गट नेते पप्पू देशमुख, काँग्रेसचे देवेंद्र बेले, नंदू नागरकर, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, या नगरसेवकानी स्वतः चे शर्ट काढून महापौर व आयुक्ताचा निषेध करून यांच्यावर सिटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार आंबोरे यांना पत्र देऊन फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.

तसेच या भ्रष्टाचारी महापौर व आयुक्तांना सद्बुद्धी देवो म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सदरहु आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, आदिसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३१ ऑगस्ट) : म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सुरेश विठ्ठल घागी (२८) रा. म्हैसदोडका असे विष प्राशन करून आपले जीवन संपवलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

आज ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता च्या दरम्यान स्वतः च्या शेतामध्ये विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्याला मारेगांव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सुरज हा अविवाहित असून, त्याच्याकडे सुमारे सहा एकर शेती आहे. मात्र,त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

विशेष उल्लेखनीय की, मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे एक दोन आत्महत्या होत आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. 

एकाच दिवशी दोघांच्या मृत्यूने गावात पसरली शोककळा


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३१ ऑगस्ट) : मुसळधार पाऊस झाला आणि वणी तालुक्यातील सोनापूर येथील दोन इसम पुरात वाहून गेले. त्यात सतीश मधुकर देठे (४०) तर राजेंद्र नामदेव उईके (४१) असे वाहून गेलेल्या इसमांची नाव आहेत. ही घटना ३० ऑगस्टला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडीस आली, त्या रोजी वणीसह सोनापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला, बघता बघता नाले ओढे भरून वाहू लागले होते. मात्र, पाऊस कमी झाला समजून दोघेही राजूर येथे काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले असता, ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील सतीश देठे यांचा मृत्यूदेह सकाळी सापडला होता. परंतु राजेंद्र उईके हा बेपत्ता होता. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरु होता, दुपारी राजेंद्र चा ही मृत्यूदेह काही अंतरावर आढळून आला. राजेंद्र यांचा मृत्यूदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. या घटनेने सोनापूरात शोककळा पसरली.