राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णतः उठवणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (२९ जुलै) : राज्यातील कोरोना रूग्णांची घटत चाललेली संख्या लक्षात घेता राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 ज्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहेत, तेथील रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली तर स्थानिक प्रशासन तेथील निर्बंध वाढवेल,असेही राजेश टोपे म्हणाले. निर्बंध शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर येत्या एक दोन दिवसांत शासन आदेश जारी करण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

 निर्बंध शिथील होणारे २५ जिल्हे कोणते?: कोरोना रुग्णसंख्या घटत असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २५ जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून या २५ जिल्ह्यांना सूट दिली जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

 या ११ जिल्ह्यांत निर्बंध कायमः पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत. परिस्थिती पाहून या जिल्ह्यांमधील निर्बंध वाढवले जाऊ शकतात, असेही टोपे म्हणाले. हे ११ जिल्हे वगळता उर्वरित २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत.


नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक! तसे नियुक्तीपत्र ही दिले


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२९ जुलै) : नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना फसविले आहे. एका युवकांकडून ३० हजार रुपये घेऊन त्याला कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून बनावट नियुक्तीपत्र ही दिले. मात्र, तिथे कामावर गेलेल्या युवकयुवतीना, अशी कुठलीही भरती केली नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
सोमवारी या युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. सुशिक्षित बेरोजगारांच्या अगतिकतेचा फायदा घेणारे भामटे तयार झाले आहेत. प्रकाश उर्फ जगदीश राठोड रा. घुई, ता. नेर व त्याचा यवतमाळातील एक साथीदाराने याच पद्धतीने युवकांना भुरळ घातली. त्यांच्याकडून प्रत्येकी ३० हजार वसुल केले. नंतर त्यांना नियुक्ती पत्र देत त्यांना कामावरही रुजू होण्याचा आदेश ही दिला. आठ जणांना आर्णी तहसील कार्यालय व न्यायालय परिसरात सिक्युरिटी गार्ड म्हणून रुजू होण्यास सांगितले. नौकरी मिळाली या आनंदात ते आठ युवक युवती तेथे गेले. परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही नियुक्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले. या बाबत जगदीश राठोड याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आर्णी उमरखेड यवतमाळ महागांव तालुक्यातील युवक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. त्यांनी नगरसेवक नितीन मिझापुरे यांना सोबत घेऊन आपली समस्या मांडली. युवकांना फसवणाऱ्यावर प्रत्येक तालुक्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी वैशाली मस्के, राजरत्न हनवते, बालाजी तुमवार, अजय ठाकरे, प्रशांत बारडे, परमेश्वर पाटे, नितीन चौधरी, प्रतिभा बारडे आदी उपस्थित होते.

आर्णी तालुक्यातील २० जणांना गंडविले

"प्रकाशने केवळ एकाच गावातील तर जिल्ह्यातील विविध बेरोजगार युवकांना सिक्युरिटी कंपनीत लावून देण्याचे आमिष दाखवून गंडविले आहे. त्याने आर्णी  तालुक्यातील २० लोकांकडून ५.५० लाखांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आर्णी येथील फसवणूक झालेल्या एका युवकाने पोलिसात तक्रार नोंदविली. आर्णी पोलिसांनी प्रकाश राठोड विरुद्ध कलम ४२०,५०६,५०४ नुसार गुन्हे दाखल केले आहे."

नोकरीचे आमिष देणारी टोळी लाखोंच्या घरात

या टोळीने सुपरवायजर पदासाठी काही तालुक्यातून साठ ते सत्तर हजार रुपये घेतले. जिल्ह्यातील २०० ते २५० युवक युवातींना चांगला गंडा घालण्यात आल्याची माहिती मिळाली. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा येथील फसगत युवक तक्रारी देण्याच्या तयारीत असल्याचे माहिती मिळाली आहे. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील युवकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या, त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. तरी जिल्हा अधीक्षक भुजबळ पाटील साहेब हे काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

समाजकार्य व जनहितासाठी योद्धा सेना ग्रुपचे युवा रनांगणात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नायगाव, (२९ जुलै) : तालुक्यातील जयराज पॅलेस येथे योद्धा सेना ग्रुपची पहिली बैठक संपन्न झाली. समाजात आपले दैनंदिन जिवन जगत असताना सर्वांना अडचणी येत असतात, काही अडचणी, समस्या ह्या सुटतात व काही समस्यांचा निराकरण कधीच होत नाही. अशा लहान मोठ्या समस्या लक्षात घेऊन नायगाव तालुक्यातील युवा समाजकार्य तसेच जनहीतासाठी मैदानात उतरली. योद्धा सेना ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असुन त्यामध्ये तब्बल दिडशे ते दोन युवा नेतृत्वांचा समावेश आहे. योद्धा सेना ग्रुप मध्ये सर्व जाती धर्माचा समावेश आहे.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी जयराज पॅलेस नायगाव येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजकार्याची जिद्द पाहता, योद्धा सैनिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. योद्धा सेनेचे धैय व उद्देश सर्वांपुढे मांडल्यानंतर सर्व योद्धांनी जयघोष करत या बैठकीस पुर्णविराम दिला आहे.

या बैठकीत योद्धा सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गायकवाड, नायगाव तालुका अध्यक्ष दाऊद शेख अंजनीकर, आझाद समाज पार्टीचे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे, रिपाई चे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव ता. अध्यक्ष आमिर पठाण, पत्रकार मंगेश झगडे, पत्रकार धमानंद गायकवाड, सुर्या भाऊ गायकवाड, बाळासाहेब घंटेवाड, महेश पवार, गायकवाड, विकास सोनटक्के, प्रदिप मगरे, रऊफ पठाण, नितीन वने, राजेश गायकवाड, रुषिकेश रोडे, विषाल कागदेवाड, रोहीत सुर्यवंशी, रोहन वाघमारे, सुमेध झगडे, राजेंद्र वाघमारे, सिद्ध वाघमारे, प्रकाश वाघमारे, नागोराव बोयाळ, गोतम वाघमारे, आमोल आयलवार, पुनम धमनवाडे आदीसह तब्बल तीस ते चाळीस योद्धा सैनिक उपस्थित होते.

नांदेड : गौतम गावंडे

कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्याचा सत्कार

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजूरा, (२९ जुलै) : श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय राजूरा, क्रिडा विभाग, तथा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती युवा, युवती संघटन, राजूरा च्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला.
   
कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सफाई कामगार ह्यांनी जीवाचि बाजी लावून कामे केली. त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळेल ह्या उद्देशाने आज सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

माजी संसदपटू वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, श्री शिवाजी कॉलेज च्या संचालक मंडळ व राजूरा शहरातील मान्यवर उपस्थित होते.

मनसेचे प्रभाग क्र.१ मध्ये रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : प्रभाग क्र.१ मधील टाळगाव चिखली सोनवणे रस्ता हा खड्डेमय रस्ता म्हणून आता ओळखला जात आहे. ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वारंवार सूचना देऊन ही प्रशासन अधिकारी लक्ष देत नसल्याचा मनसेचे प्रभाग अध्यक्ष क्रं.१२ चे देवेंद्र निकम यांनी आरोप केला आहे.

चिखली - सोनवणे वस्ती रस्ता
मागील वर्षी ऑक्टोबर २०२० रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर २३ जानेवारी २०२१ ला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले परंतु ('फ') क्षेत्रीय कार्यालय येथील - स्थापत्य विभागाच्या मार्फत अत्यंत खालच्या दर्जाचे काम करण्यात आले, 
यात मल - मूत्र व स्टॉर्म वॉटर लाईन विभाचा देखील तेवढाच मोठा कामचुकारिचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. 

फेब्रुवारी २०२१ पासून ते जुलै २०२१ पर्यंत या रस्त्याला ड्रेनेज ची काम झाली, पाण्याची पाईप लाईन आली परंतु रस्त्याचे खोद काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले नाही.
वारंवार सूचना देऊन देखील अधिकारी काम करत नाही म्हणून आज सोनवणे वस्ती रोड वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या वृक्षारोपणाला स्थानिक व वाटसरूनी प्रतिसाद देत या रस्त्यातील खड्डे बुजवून दर्जेदार काम करावे असे मत व्यक्त केले.  

वृक्षारोपण करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग १ टाळगाव चिखली येथील शाखाध्यक्ष प्रतिक बबन शिंदे, देवेंद्र निकम सहकारी, ऋषिकेश दादा पाटील, दत्ता धर्मे, नारायण पठारे, तुषार बनसोडे, मनोज दगडे, सुनी चव्हाण व अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.