महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत मॅरेथॉन दौड स्पर्धा संपन्न


सह्याद्री न्यूज | विवेक आवारी 
वणी, (२८ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज दि. २७ जुलै २०२१ रोज मंगळवारला शिवतीर्थ वणी येथे सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा ओपन गट मुले /मुली व १८ वर्षाआतील मुले/मुली अशा दोन गटात घेण्यात आली. प्रत्येक दोनही गटातील १० मुले/मुली विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनिलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदीरा सुतगिरणी तथा शिवसेना वणी विधानसभा संघटक, प्रमुख पाहुणे म्हणुन संजय देरकर तर कार्यक्रमाचे संयोजक राजू तुराणकर शिवसेना शहर प्रमुख युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पणकरून तथा खेळाडूंना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली .
त्यानंतर लगेचच बक्षिस वितरणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी ललित लांजेवार, मंगल भोंगळे, महेश पहापळे, असलमभाऊ,सचिन पचारे, पचारे,नामदेवराव शेलवडे, काका,राजुभाऊ देवडे, प्रमोद मिलमिले, प्रा.मालेकर सर,संतोष बेलेकर सर,जनार्दन थेटे,हितेश गोडे, राहुल झटे,सौरभ वानखेडे,उपस्थित होते.

संचालन सागर जाधव यांनी केले तर आभार ललित लांजेवार यांनी मानले.

बीड : प्रेमप्रकरणातून नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (२८ जुलै) : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही पालवन चौकात राहत होती. ती दीप हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. सोनाली आणि बीडच्या एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय २७, रा. डोईफोडवाडी) याच्यासोबत प्रेमसंबंध जमले होते.
अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याने सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली. आधी लग्नाची बाब अक्षय याने टाळली. मात्र, सोनाली हिचा लग्नासाठी जास्तच रेटा वाढल्याने अक्षयने लग्नास नकार दिला. अक्षयने लग्नास नकार दिल्याच्या राग मनात धरून सोनाली जाधव हिने मांजरसुंभा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत सोनाजी जाधव हिचा भाऊ अजय जाधव याने अक्षय आव्हाड याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२८ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात अगदीच साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यावर एकामागून एक येणारं संकट व संकटात बळी पडलेल्या जनतेचं दुःख पचवता येण्यासारखं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. राज्यावरील कोरोनाचं संकट टळलं नसतांनाच नैसर्गिक आपत्तीन राज्याला हादरवून सोडलं. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोच निसर्ग कोपला. पावसानं राज्यातील काही भागात थैमान घातलं. दरड कोसळली, आभाळ फाटलं, घरं पडली, घरं दबली. होत्याचं नव्हतं झालं. नद्या नाल्यांना पूर आले. पुराच्या पाण्यानं गावं वेढल्या गेली. माणसे वाहून गेली. कित्येकांना अकाली मरण आलं. कित्येक निष्पाप जीवांना जल समाधी मिळाली. कोरोना महामारीचा मृत्यू तांडव थांबत नाही तोच निसर्गानं उग्र रूप धारण केलं. आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पाल्यापाचोळ्या प्रमाणे माणसे वाहून गेली. अशा या संकटाच्या काळात राज्यावर दुःखाचं सावट असतांना स्वतःचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणं ही अतिशयोक्ती ठरेल, म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना केल्या. राज्यातील तमाम शिवसैनिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, होल्डिंग्ज व जाहिरातींवर पैशाची उधळण न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान केल्याने वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्या टागोर चौक व नारायण निवास परिसरातील शाखा फलकाचे अनावरण केले. 
शहरातील टागोर चौकव नारायण निवास परिसरात शिवसेनेची शाखा तयार करण्यात आली असून मुख्यमंत्रांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांनी शाखा फलकाचे विधिवत पूजन करून अन्य सोपस्कार पार पाडले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना शहर प्रमुख निखिल येरणे, उपशहर प्रमुख महेश चौधरी, अजय चन्ने, धर्मा काकडे, उपशहर प्रमुख निलेश करडभुजे, अनुप चटप, सौरव खडसे, महिला शहर प्रमुख सविता सातपुते, महिला संघटक नंदाताई गुहे, युवासेना जिल्हा समन्वयक संतोष वऱ्हाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

वारंवार होणाऱ्या बळजबरीमुळे अल्पवयीन मुलीला झाली गर्भधारणा


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ जुलै) : तालुक्यातील वल्हासा पोड येथील रहिवासी असलेल्या व जुनोनी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या पंचवीस वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता मुलीने जुनोना येथीलच एका युवकाने ओळख निर्माण करून अनेकदा जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. तसेच शारीरिक संबंधाबद्दल आई वडिलांना सांगितल्यास तुला व तुझ्या आईवडिलांना जीवानिशी ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले. मुलीची आपबिती ऐकल्यानंतर मुलीच्या आईने २६ जुलैला रात्री ८.२३ वाजता मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार मुकुटबन पोलिस स्टेशनला नोंदविली. 
झरी तालुक्यातील वल्हासा पोड येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी जुनोनी येथील आश्रम शाळेत ९ व्या वर्गात शिकत होती. शाळेला सुटी असली की, ती जुनोना गावातील दुकानात आवश्यक वस्तू खरेदीकरिता जायची. अशातच गावातील एका युवकाने तिच्याशी ओळख निर्माण केली. ओळख वाढतच गेली, व तो तिच्याशी जवळीक साधण्याची संधी शोधू लागला. मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी तो वल्हासा पोड येथे आला, व मुलीला भेटला. दरम्यान मुलगी शौचास गेली असता सदर युवक तिच्या मागे गेला, व जबरदस्ती त्याने मुलीला तिच्या आजोबाच्या वावरात नेत तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबाच्याच वावरात परत तिच्यावर त्याने बळजबरी केली. नंतर नेहमी तो तिला भेटायला बोलावून तिच्याशी बळजबरी करू लागला. वारंवार तिचे शारीरिक शोषण करण्यात आल्याने तिला गर्भधारणा झाली. अचानक तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिला वणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच मुलीची आई चांगलीच हादरली. आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता तिने आपल्यावरील आपबिती कथन केली. मुलीच्या आईने जुनोना येथे जाऊन मुलीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला तिच्याशी केलेल्या अपकृत्याबाबत जाब विचारला असता त्याने मुलीच्या आईला पोलिसांत तक्रार केल्यास सरळ जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या आईने मुकुटबन पोलिस गाठून मुलीवर झालेल्या अत्याचाराची रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपी विलास तुकाराम आत्राम (२५) रा. जुनोनी ता. झरी याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ३७६ (A)(१), ५०६ व RW ४,८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास पीएसआय राठोड करीत आहे.

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२६ जुलै) : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यास, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रदान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, अन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह आधी उपस्थित होते.

पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर करा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली की, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून, ४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करा

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, बारामती- सातारा आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होते, त्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे.

पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले की, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर याठिकाणी पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले असून, रत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

साथ रोग पसरू नये म्हणून काळजी

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप, किटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

नुकसान भरपाई, मदतीचे प्रस्ताव तयार करा

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्काळ मदत देऊच, पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांयाबाबत जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोकणात पुराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात

कोकणामधील एकंदर २६ नद्यांची खोरे असून, याठिकाणी पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

एसडीआरएफचे बळकटीकरण करणार

एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन

महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्यां ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.