तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता. ३०) : कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतल्यावर विहित कालावधीनंतर दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप बऱ्याच नागरिकांनी लसचा दुसरा डोज घेतलेला नाही, विशेषत: कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजचा कालावधी केवळ २८ दिवसच असल्याने हा कालावधी पुर्ण करणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवसात दुसरा डोज देण्यात यावा. यासाठी उद्या व परवा दोन दिवस कोव्हॅक्सीन लस देण्यासाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याचे व संबंधीत पात्र नागरिकांना तालुका नियंत्रण कक्षाद्वारे दुरध्वनीद्वारे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तालुका यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी आज राळेगाव तालुक्यात प्रत्यक्ष भेट देवून कोविड प्रतिबंधाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण, कोरोना संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुर्वतयारी, खत व बियाण्यांची उपलब्धता व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप या बाबींचा आढावा घेतला. 
कोरोनाची लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पाड्यावरील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच बियाण्यांची उपलब्धता व खताचा आढावा घेताना युरियाच्या बफर स्टॉकची माहिती घेतली. तर राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावे, त्यांना एनपीए व ओटीएस योजनांची माहिती देवून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात वृक्षारोपण केले तर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार डॉ रविंद्रकुमार कानडजे , पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकुलवार, संबंधीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच महसुल, आरोग्य, पोलीस, कृषी व नगरपरिषद यंत्रणेचे अधिकारी व बँकांची प्रतिनिधी उपस्थित होते.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बल्लारपूर, (ता.२९) : देशात कोरोना महामारी च्या प्रादुर्भाव मागील दीड वर्षापासून आहे.विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्याकरिता जाऊ शकले नाही.संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीत होते. अनेक विद्यार्थी कोरणाग्रस्त होते, विद्यार्थ्यांचे आधार हरपले, विद्यार्थ्यांचे आर्थिक हाल झाले, विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशातच महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठ प्रशासन द्वारे अनेकदा सांगण्यात आले कि, महाविद्यालयीन शुल्क व परीक्षा शुल्क वेळेवर भरा परंतु कोरोना महामारी मुळे विद्यार्थी व पालक वर्ग आर्थिक अडचणीच्या संकटात सापडला त्यामुळे परीक्षा शुल्क व महाविद्यालय शुल्क भरायचे कसे ? असे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात येऊ लागले त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

आद.बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडी प्रणित विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर चे कार्यकर्ते स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, प्रथम दुपारे, गुंजन वानखेडे, फारुक शेख, प्रणय मडावी, भोजेंद्र दुबे, सचिन ठीपे, रुपेश चंदनखेडे यांनी मा.राजू भाऊजी झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात सतत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन शिक्षणमंत्री, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, बल्लारपूर तालुक्याचे तहसीलदार त्यांना अनेकदा निवेदने दिले.
अशातच विद्यार्थी हितकारक असा निर्णय गोंडवाना विद्यापीठ द्वारे घेण्यात आला विद्यापीठाद्वारे येत्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, १०० टक्के माफ करण्यात आले असून, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व पर्यावरण शुल्क यामध्ये ५० टक्के ही सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठ द्वारे घेण्यात आलेला आहे.सोबतच उन्हाळी २०२० परीक्षा करिता सर्व नियमित विद्यार्थ्यांना १० टक्के फी कपात करण्याच्या निर्णय सुद्धा मा.व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे सदर निर्णयाचे सर्व महाविद्यालयाने काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे आव्हान विद्यापीठाचे मा.कुलगुरू, प्रा.श्रीनिवास वरखेडी व मा.प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी केले आहे असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले.

एकता नगर येथील मटक्यावर पोलिसांची धाड, एका आरोपीला घेतले ताब्यात

                         (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२९) : वरली मटक्याचा खेळ चालविणाऱ्या एका आरोपीला डीबी पथकाने अटक केली आहे. मटका जुगारावर पैशाची बाजी लावत असतांना पोलिसांनी या आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषद गाळ्यामध्ये सुरु असलेल्या मटक्यावर आज दुपारच्या सुमारास डीबी पथकाने धाड टाकली. पोलिस आल्याची चाहूल लागताच मटका खेळणारे व मटक्याची पट्टी फाडणारे पळत सुटले. तर मटक्याची पट्टी फाडणारा एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
शहर व तालुक्यात मटका खेळला जाणार नाही, याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असतांना देखील काही अवैध धंद्यांशी जुळलेल्या व्यक्तींकडून चोरून लपून मटका चालविला जात आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळ्यामधे मटका सुरु असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकून मटक्याची पट्टी फाडणाऱ्या एका आरोपीला अटक केली. पोलिस आल्याचे कळताच काही जण सैरावैरा पळाले. तर मटका जुगारावर पैशाची बाजी खेळवणारा एक जण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी मटका पट्टी फडणाऱ्या अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (३६) रा. वार्ड नंबर ४, मस्जिद मागे मुकुटबन याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्या जवळून १०८० रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वान्ड्रूसवार, पंकज उंबरकर, हरिन्द्रकुमार भरती यांनी केली.

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात

                         (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२९) : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.

सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप २०२२ या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्रणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी. प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही श्री.पटेल यांनी सांगितले.

राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे सामने होणार आहेत. ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी सहभागी होणार आहेत. - ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे. याकरिता खेळाचे मैदान सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी



                                             (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (ता.२९) : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील असेही गृहविभागाने स्पष्ट केले आहे.