नांदेडच्या प्रवेशद्वारावरील समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान – पालकमंत्री अशोक चव्हाण  

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या कालखंडात सामाजिक समतेचा दिलेला संदेश हा तेवढाच आद्य मानला पाहिजे. त्या कालखंडातील समाजाच्या ज्या धारणा होत्या त्याला सामाजिक न्यायाच्या तत्वावर आणून परिवर्तनशील विचार त्यांनी दिला. समाजासाठी स्वत:ला वाहून घेत समाजाच्या मनपरिवर्तनाचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले आहे. त्यांचे जीवन कार्य संपूर्ण जगाच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जगाचे सामाजिक नेते असा जर उल्लेख केला तर तो चुकीचा ठरणार नाही. त्यांना मानणारा वर्ग हा व्यापक असण्याचे कारण त्यांनी जपलेले सामाजिक समतेचे तत्व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नांदेड महानगराच्या वैभवात भर टाकणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, हरिहरराव भोसीकर, दत्ता पाटील कोकाटे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्याचा विचार समाजापर्यंत पोहचावा यादृष्टीने नांदेड महानगरात आपण निवडक ठिकाणी त्यांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण केले. महापुरुषांची पुतळे हे समाजाला अव्याहत प्रेरणा देत असतात. त्यांच्या विचाराचा जागर हा सातत्याने समाजापुढे जावा हा उद्देश आपण यापाठीमागे बाळगला आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा साकारून नांदेड मधील सर्व जनतेच्यावतीने अभिवादन करावे हे माझे स्वप्न होते. ते साकारतांना मधल्या काळात काही अडचणी आल्या. या अडचणींवर मात करून नांदेड महानगरात प्रवेश करतांना प्रवेशद्वारावरच महात्मा बसवेश्वरांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादाना समवेत ते समतेच्या विचार जागराचे प्रतिक व प्रेरणास्थळ म्हणून याकडे पाहिले जाईल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

सर्वांच्या प्रयत्नांतून आणि सहकार्यातून आपण हा पुतळा, हे प्रेरणा स्थळ या ठिकाणी आपण उभारू शकलो या धारणेतून मी पाहतो आहे. श्रेयाचा इथे प्रश्न नाही उलट सगळ्याच्या हातभाराचे हे एक प्रतीक आहे. या प्रतिकासाठी माझ्यापरीने जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न केला, या शब्दात त्यांनी महात्मा बसवेश्वरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठबळावरच अधिक खंबीरपणे उभे राहता आले.

लिंगायत समाजाच्या प्रश्नांबद्दल मी दक्ष आहे. समाजापुढे असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. एक पालक या नात्याने मी जबाबदारी स्विकारायला तयार असून हे प्रश्न मार्गी लावील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आपला जिल्हा हा तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या सिमेवरचा आहे. मराठवाडा मुक्तीनंतर आपण विनाअट महाराष्ट्रामध्ये सहभागी झालो. इथल्या सामाजिक प्रश्नांचा पोत हा वेगळा आहे. हा पोत समजून घेतल्या शिवाय त्या-त्या समाजाचे प्रश्न आपल्याला कळणार नाहीत. आपण विनाअट महाराष्ट्रात सामील होऊन येत्या वर्षात ७५ वर्षे होत आहेत. हा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्ती समवेत आपल्या योगदानाचाही आहे, याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत माझे नांदेड मला अधिक सुरक्षित हवे आहे, असे स्पष्ट करून त्यांनी सामाजिक सलोखा व जनतेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व दिले.

महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या लढ्यासह “सदाचार हाच खरा धर्म” ही शिकवणूक दिली आहे. ही शिकवणूक आचारणात आणून त्यांचा विचार समाजातील प्रत्येकाने दृढ केला पाहिजे. त्या काळात जाती-धर्माच्या नावावर असलेली अधिक घट्ट पकड लक्षात घेता महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे जे विचार दिले ते आजही तेवढेच लाख मोलाचे आहेत. सर्वांसोबत व सर्वांना घेऊन चालण्याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. लोकशाही मूल्यांची शिकवण यात असल्याचे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे, ईश्वराराव भोसीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. श्री. श्री. १००८ केदारपीठ जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले आशीर्वाद वचनपर मार्गदर्शन केले.

युवकांनी सोशल मीडियाचा वापर कमी करुन आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात – मंत्री सुनिल केदार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यु. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असतांना आमचे युवक सोशल मिडीयाचा जास्तीतजास्त वापर करीत असून त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात, असे आवाहनात्मक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन दि. २२ एप्रिल ते २५ एप्रिल, २०२२ दरम्यान ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती याठिकाणी करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्रमुख अतिथी म्हणून ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे, नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल गवई, युवा महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. संजीव ई.रकर, माजी संचालक डॉ. दिनेश सातंगे, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष श्री राहुल सोळंके आदी उपस्थित होते.

उद्घाटन झाल्याची घोषणा करुन मार्गदर्शन करतांना श्री.सुनिल केदार म्हणाले, नवीन पिढीचा आय.क्यु. जास्त आहे. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून त्याचा जास्तीतजास्त वापर आपल्या देशात होत आहे. परंतू आमचा युवक वर्ग सहा ते सात तास वेळ फेसबुक व व्हाट्सअॅप वर खर्ची घालतो, त्यातल्या त्यात यामध्ये मध्यम वर्गातील विद्यार्थी बळी पडत असून युवकांनी जागृत होवून सोशल मीडीयाच्या वापरावर मर्यादा ठेवावी आणि आपल्यातील असलेल्या कलाकौशल्यांना वृद्धींगत करण्याकरिता अधिकाधिक वेळ द्यावा.

विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, विदेशात क्रीडा कौशल्याला अधिक महत्व दिले जाते. महाराष्ट्रात देखील स्थापन झालेल्या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून मैदानी खेळांसह इतर कलाप्रकारांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. त्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असण्यावर भर दिला जाईल, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी सर्व कलावंत विद्याथ्र्यांना आपल्या कला उत्कृष्टरितीने सादर करण्याकरिता व विजेता होण्याकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाने युवा महोत्सव आयोजनाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद दिले. ते पुढे म्हणाले, विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अडीच लाख विद्यार्थी असून त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही संख्या जास्तीतजास्त वाढविण्याची गरज असून पुढील वर्षी अधिकाधिक कलावंत विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांपैकी चाळीसहजार विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडतात आणि साठहजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. साठ हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जाणार असून ऑनर्स व मायनर डिग्री देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल. याशिवाय कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश, अभ्यासक्रमांसाठी प्रोजेक्ट व इंटर्नशीपची सक्ती असणार आहे. विद्यापीठात प्लेसमेन्ट सेलची निर्मिती, संशोधनासाठी अनुदान, पूर्णवेळ आचार्य पदवीकरिता संशोधक, मराठीमध्ये बी.एस.सी. आदी सुधारणा करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपल्या स्तरावर गौरवास्पद कामगिरी करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याप्रसंगी सर्व सहभागी कलावंतांना कुलगुरूंनी शुभेच्छा दिल्यात.

संयोजक तथा ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, महाविद्यालयाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. दोन कोटीपेक्षा जास्त रूपयाचे इनडोअर स्टेडियम महाविद्यालयात तयार होणार असून त्याचे भूमीपूजन मंत्री महोदायांच्या हस्ते संपन्न झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा युवा महोत्सवामध्ये जास्तीतजास्त सहभाग होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला एक लक्ष रूपयाचे सानुग्रह अनुदान क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने दिल्या जावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. सांस्कृतिक कार्यक्रमाध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नॉन एक्झामिनेशनसाठी क्रेडीट मिळावे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकतेतून संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी युवा महोत्सव आयोजनामागील भूमिका विशद केली. पाच प्रमुख कलाप्रकारांत व पस्तीस उप कलाप्रकारांत विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 125 महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग असणार आहे. याप्रसंगी ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मागीलवर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देवून मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संचालन डॉ. क्षिप्रा मानकर यांनी, तर आभार डॉ. संजीव ई·ारकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे पदाधिकारी, नियोजन समितीचे सदस्य, युवा महोत्सव व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणींचे सदस्य, पत्रकार, युवा महोत्सवामध्ये सहभागी कलावंत विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

एसटी बंदच; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय खासगी वाहतुकदारांकडून लूट

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. मात्र, अजूनही एसटी बससेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात खासगी वाहतूक सुरू आहे. मात्र, ते जादा पैसा आकारून प्रवाशांची असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लूट करीत मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. तेव्हा प्रवाशांचे बेहाल झाले. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना ठरविलेल्या ठिकाणी वेळेवर पोहचणे फारच कठीण होत होते. शहरी भागात एसटी सुरू असली तरी काही बसेसची बुकींग मुख्य बसस्थानकात केल्यानंतर इतर कुठेही प्रवासी घेत नाही.

 त्यामुळे तासंतास काही बसस्थानकांवर बसची वाट पाहत उभे राहावे लागत होते. अशावेळी बस येणारच याची खात्रीही नसते काही भागात बससेवा सुरू करण्यात आली असली तरी बस फेऱ्याचे प्रमाण कमी असल्याने विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता संप मिटला. मात्र, अजूनही सेवा सुरळीत झाली नाही. सावली तालुक्याचे ठिकाण आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी कोणतीच साधन नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रातील बससेला सुरू करावी, अशी मागणी श्री. राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगाव यांनी केली आहे.

पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध!


 सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. अशीच घटना वणीत सुद्धा घडली आहे. शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाने झुंडीने येऊन विरोधात बातमी का लावली म्हणून हॉकी स्टिकने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वणीतील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत २०१९ च्या शासकीय अद्यादेश भाग चार नुसार कारवाई करावी आणि या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

सध्याच्या काळात शासनाच्या गौण खनिज संपत्तीची चोरटी वाहतूक सुरू आहे. या तस्करीला स्थानिक नेते आणि प्रशासनाचे जणू पाठबळ आहे. यासंबंधी नमो महाराष्ट्र चे पत्रकार रवी ढुमणे यांच्यावर जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेचा वणीतील सर्वच पत्रकार संघटनाही निषेध करीत राज्य शासनाचा अद्यादेश १९ एप्रिल २०१९ क्र २९ व जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे. आणि अशा गौण खनिज चोरट्यांचा मुसक्या आवळून पत्रकारांना संरक्षण द्यावे. अशा आशयाचे निवेदन वणी शहरातील सर्वच संघटनांचे पत्रकार जब्बार चिनी, राजू धावंजेवार, मो मुस्ताक, राजू तुरणकार,रमेश तांबे, सागर मुने,विवेक तोटेवार, प्रशांत चंदनखेडे, अजय कंडेवार, रामकृष्ण वैद्य, श्रीकांत किटकुले, राजू गव्हाणे, सूरज चाटे, पुरुषोत्तम नवघरे, सुरेंद्र इखारे, रवी ढुमणे सह आदी पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.

कांद्याचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात मात्र कमालीची घसरण झाली आहे. आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. 

किलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मागील काही वर्षी कांदा शंभर रुपये किलोच्या आसपास पोहचला होता यामुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आले असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळाला होता. 

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर याच आठवड्यात अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे. कांद्याचा भाजीचा तडका स्वस्त झाला आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. दुसरीकडे मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. याचा भावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात आल्याने भाव कमी झालेले आहे. कांद्याचे दर हे प्रतिकिलो आठ ते दहा रुपयावर येऊन ठेपला आहे.

गेल्या दहा दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण या आठवड्यात अचानकपणे १२ ते १६ रुपये प्रति किलो असे दर किरकोळ बाजारात आहे.