शास्त्री नगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी तालुक्यात आत्महत्येचा आलेख थांबता थांबत नसतांना आज बुधवारी ला शास्त्री नगर येथील विवाहित तरुणाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना दुपारी अडीज वाजता उजेडात आली.

जावेद शहा अहेमद शहा (38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यूज पेपर वाटून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. आज दि. 30 एप्रिल रोजी जावेद हा अक्सा मस्जिद चे कब्रस्तान मधील लोखंडी इलेट्रिक पोल ला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले.त्याच्या अशा निधनाने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून मृतक जावेद यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

गोंडबुरांडा येथील पारधी बेडा वस्ती मधील 2 मे रोजीचा होणारा बाल विवाह रद्द!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह "बालविवाह" ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.

मारेगांव तालुक्यातील मौजा गौंडबुरांडा येथील 18 वर्षे वय पुर्ण न झालेल्या मुलीचा विवाह दिनांक 2 मे 2025, शुक्रवार रोजी होणार होता, तो मुलीचे आई-वडील यांना भविष्यात मुलीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगून आज दि. 30 एप्रिल 2025 रोजी विवाह रद्द करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री विकास मिना जिल्हाधिकारी यवतमाळ, मा. श्री नितीशकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम निलावाड तहसीलदार, भिमराव व्हनखंडे गटविकास अधिकारी, कळमकर बाल विकास प्रकल्प अधिकारी, विक्की जाधव पोलिस उपनिरीक्षक, हेमराज राठोड सहायक गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव पोलिस पाटील इत्यादींच्या उपस्थितीत करण्यात आली.

भारतात, बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 अंतर्गत जर पुरुष असेल तर त्याने वयाची एकवीस वर्षे पूर्ण केली नसतील आणि स्त्रीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली नसतील." हा कायदा असेही घोषित करतो की कायदेशीर वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होणारे कोणतेही लग्न रद्दबातल आहे. जर कायद्याला बगल देत कोणी असे विवाह करत असेल तर संबंधित मुलामुली कडील आई-वडील, मंडप डेकोरेशनसह मंगल कार्यालय, लग्न पत्रिका छापखाना, गावातील सरपंच, पोलीस पाटील आदी गुन्हेगार ठरवले जातात अशी कायद्यात तरतूद आहे. 

बालविवाह होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आलेले आहेत.बालविवाह रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामस्तरीय कमिटी यांच्याकडे असते म्हणून ग्रामस्तरीय कमिटीने जास्तीत जास्त ह्या बाबीकडे विशेष प्राधान्याने लक्ष देऊन असे होणारे बाल विवाह रोखण्याची कार्यवाही करावी. बालविवाहमुळे केवळ भविष्यात मुलीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये हीच मोठी कायद्याची अपेक्षा आहे.

वाळूचा ट्रॅक्टर पकडला; 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वाळू ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 6 हजार किमतीची 1 ब्रास वाळू व 3 लाख रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार (दि.30) ला पहाटे 3.15 वा.करण्यात आली.

या प्रकरणी पोउपनि सुदाम आसोरे  (पोलीस स्टेशन वणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयीत आरोपी विवेक वसंता अवधान (वय 40 वर्ष रा. सावर्ला ता.वणी), यांचे विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विवेक अवधान हे विनापरवाना अवैध्यरित्या वाळूची वाहतुक करताना मिळुन आले. दरम्यान त्यांचे ताब्यातुन महिंद्रा कंपनीचे (Mahindra 575 di sp plus) लाल रंगाचा मुंडा ज्याचा चेचीस नंबर (MBNTFAKAPMNL00469) व ट्रॉलीचा क्र. एम एच 29 एम 4283 (किं.300000 रुपये) असा दिसून आला. सदर ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू (किं. 6000 रुपये) असा एकुण 306000 रु.चा मुद्देमाल मिळुन आला. आज बुधवारी पंचासमक्ष घटनास्थळी जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला. त्याचेवर वणी ठाण्यात बिएनएस नुसार कलम 303(2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी यांचे आदेशानुसार पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल यांनी केली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

यवतमाळ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, विकास मींना,यवतमाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, शाळा, कॉलेज शिक्षक, मंडप संचालक, मेकअप आर्टिस्ट, पंडित, मौलवी व महिला व बाल विकास अधिकारी, यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी मींना यांनी सांगितले.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास 1098 हा टोल-फ्री नंबर आहे. या क्रमांक वर संपर्क साधवा असें आवाहन त्यांनी संदेशातून केले आहे.

ग्रामपंचायत माथार्जून अंतर्गत डुबली पोड येथे शुद्ध ऑरो केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे. त्याच पैकी आदिम जमाती कोलाम पोड एकूण अंदाजे ५९ पोडे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

माथार्जून ग्रामपंचायत मध्ये एकूण ५ पोड आहेत. गारगोटी, बिहाडी पोड, दुबली पोड, चिचपोड, चिचपोड (लहान) त्यापैकी डुबलीपोड येथील लोक कित्येक वर्षापासुन विहिरीचे पाणी वापरायचे त्या मुळे किडनीच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी च्या आजाराने येथील काही एक ते दोन व्यक्ती दगावली होती.

ग्रामपंचायत २०२२ निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान डुबलीपोड येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये असणाऱ्या माजी सरपंच उपसरपंच यांना समस्या सांगून सुद्धा कोणतीही उपाययोजना केल्या नव्हत्या.

पणमात्र,आज रोजी सरपंच रवींद्र बाबुराव कायतवार यांच्या पुढाकाराने डुबली पोड येथे जल शुद्ध यंत्रणा उभारले गेले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ३ मधील सदस्य यांनी सरपंच यांचे आभार मानले. जल शुद्ध यंत्रणेचे उद्घाटन सरपंच रवींद्र कायतवार यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळेस गावातील ग्राम पंचायत सदस्य अय्या कुमरे, जिल्हा परिषद शिक्षक विलास किनाके, शिक्षक राजू सिडाम. प्रतिनिधी योगेश मडावी, निलेश मडावी, राजकुमार कुमरे, व गावातील नागरिक उपस्थित होते.