कॉ. दानव यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य पक्ष कार्यकर्ता मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मेटीखेडा : "कॉम्रेड शंकरराव दानव यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून त्यांच्यासाठी संघर्ष करण्यात खर्ची घातल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावात त्यांचा दांडगा संपर्क होता व प्रत्येक गावातील सर्वात पिचलेल्या वर्गासोबत त्यांची बैठक होती. पोळ असो, तांडा असो किंवा पारध्यांची वस्ती असो ते सातत्याने त्यांचा भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांना त्यांचा समस्यांवर मात करण्यासाठी संघर्षासाठी तयार करीत." 

"शोषित, वंचित कष्टकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक संघटने बांधली आणि त्यांचा शेवटचा श्वास घेत पर्यंत ते संघर्षरत होते. परंतु त्यांना प्राप्त झालेली ही विशिष्ट शैली व विचार कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी विचारातून आली असल्यामुळे त्यांनीं आपले अनमोल आयुष्य स्वतःचा स्वार्थ न बघता पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी दिले. मार्क्सवादी वैचारिक जाणिवेतून त्यांचा जगाकडे पाहण्याचा एक उत्तम दृष्टिकोन निर्माण झाला होता. तो दृष्टिकोन त्यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना दिला असल्याने त्यांचा हाच वैचारिक पाया मजबूत करीत यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील व कष्टकऱ्यांची बाजू मजबूत करीत संघर्ष सुरू ठेवतील." असा सूर दिनांक ३१ जानेवारी ला पालोती ( मेटीखेडा ) येथे झालेल्या कॉ. शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यातील उपस्थित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मनोगतातून आणि मार्गदर्शनातून व्यक्त केला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. दानव यांचा प्रथम स्मृती दिन कळंब तालुक्यातील पालोती (मेटीखेडा) येथे मेळावा घेऊन त्यांचा विचारांना आणि कार्याला सलाम करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचा अध्यक्षस्थानी कॉ. सदाशिव आत्राम हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, जि. क. सदस्य कॉ. ॲड. डी. बी. नाईक, किसान सभेचे राज्य सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. देविदास मोहकर, जि. क. सदस्य कॉ. अनिता खूनकर, आशा वर्कर संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, कॉ. मनिष इसाळकर, कॉ. निरंजन गांधलेकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. कवडू चांदेकर, सरिता दानव आदी उपस्थित होते. यावेळेस कॉ. शंकरराव दानव यांचा पत्नी श्रीमती कलावतीबाई दानव ह्यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

ह्या कॉ. शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृतिदिना निमित्त झालेल्या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कळंब तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

मारेगाव : जमादार अफजल पठाण यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन येथे जमादार पदावर कार्यरत असलेले अफजल शब्बीर पठाण यांचे आज (दि. 31 जाने.) ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 42 वर्ष होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पोलिस दलासह स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अफजल शब्बीर पठाण पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचेवर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, तिथे 10 ते 12 दिवसांच्या उपचारांनंतर ते बरे झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचा आजार पुन्हा बळावला.त्यामुळे त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे 15 दिवसांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन करण्यात आले. प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अफजलखान पठाण मेहनती, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता, त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्येही आपलंस करणारे व्यक्तिमत्व होते. मारेगावसह पांढरकवडा व पुसद येथेही त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

अफजल पठाण यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांचे पार्थिवावर उद्या शनिवार (दि. 1 फेब्रुवारी) त्यांच्या मुळगाव पुसद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी आणि चार मुली असा आप्त परिवार आहे.


अखेर ठाणेदार अनिल बेहरानी यांची बदली,तर गोपाल उंबरकर वणीचे नवे ठाणेदार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात वजनदार 'पोलीस ठाणे' म्हणून ओळखले जाणाऱ्या वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल बेहराणी यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी पुसद ग्रामीण चे ठाणेदार गोपाल सुधाकर उंबरकर यांची नियुक्ती झाली आहे. ते आज पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. 

मागील काही महिन्यात वणी सह तालुक्यात कायदा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. अवैध व्यवसाय तसेच वणी शहरात विविध गुन्ह्यात वाढ झाली होती, याबाबत श्री रामनवमी उत्सव समितीने आवाज उठवत जण मोहीम, व आंदोलन केले होते. वणी प्रशासनाला हादरविणारी घटना शहरात घडली होती. गोमास व त्यांचे शीर उघड्यावर आढळून आले होते.तर शेकडो जनावरांची हाडे कत्तलखाण्यात सापडली,त्यामुळे वणी शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर जनक्षोभ उसळून येथील ठाण्यावर माजी आमदार बोदकुरवार व हिंदू संघटना आक्रमक झाली होती. गोहत्या या प्रकरणात हलगर्जीपणा भोवल्यानचें अधीक्षकांनी बदली केली असावी अशी चर्चा आहे.

 मात्र, प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा आदेश जारी केला आणि पुसद ग्रामीण चे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, यांच्याकडे वणी ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे वणी पोलीस स्टेशनचं वजन ठाणेदार गोपाल उंबरकर कसे पेलतात हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे.

मागणी : अवैध धंदे बंद करा,भाजपा कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव व तालुक्यातील अवैध दारू, मटका, जुगार, गोवंश तस्करी, सुगंधित गुटखा विक्री बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना करण्यात आली आहे. या अगोदर सुद्धा मागणी होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परत भारतीय जनता पार्टीने सर्वानुमते ठराव घेतला आणि मारेगाव सह तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय सर्रास चालूच आहेत. ते तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 

याबाबत ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे.नमूद सर्व अवैध व्यवसाय बंद झाले नाही तर आंदोलन करू असे भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

निवेदनावर भारतीय जनता पार्टी चे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, प्रशांत नांदे, विनीत जयस्वाल, दत्तू लाडसे, चंद्रकांत धोबे, निखिल मेहता, शोभाताई नक्षणे, मालाताई गौरकार, डोमाजी भादिकर, व तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी, मारेगाव, झरी या तिन्ही तालुक्यातील नाफेड मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली. तसेच नोंदणी देखील दिलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच बंद करण्यात आली. त्यामु़ळे हजारों शेतक-यांची नोंदणी रखडली. नोंदणी अभावी व खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन घरीच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देत सोयाबीनची खरेदी व नोंदणी त्वरित करण्याची मागणी केली आहे. 

खरेदी विक्री संघ हे नोडल एजन्सी म्हणून नाफेडसाठी शेतमाल खरेदी करते. नाफेडमार्फत दिनांक 6 जानेवारी पर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू राहिल असे जाहिर करण्यात आले होते. परंतु ही नोंदणी 2 दिवस आधीच पोर्टल बंद झाले. वणी तालुक्यातील ३९७७ शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकि फक्त २९०३ शेतक-यांची 4 जानेवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी झाली. उर्वरित १०७४ शेतक-यांची पोर्टल बंद झाल्यामुळे नोंदणी रखडली. शेतक-यांनी कार्यालयात ऑफलाईन अर्ज जमा केले. परंतु नोंदणी अद्यापही रखडलेली आहे. 

 मारेगाव तालुक्यातील १५२० शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकि ७७० शेतक-यांची नोंदणी झाली. उर्वरित ७५० शेतक-यांची नोंदणी व्हायची आहे. तसेच झरी तालुक्यातील २०१० शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकी १९१२ शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी झाली. उर्वरित ९८ शेतक-यांची नोंदणी अद्यापही बाकि आहे. नोंदणी रखडलेल्या शेतकऱ्यांचा एकूण आकडा हा १९२२ आहे. यासह अनेक शेतकरी पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी विक्री संघापर्यंत नोंदणी करण्यासाठी पोहोचू शकले नाही. 

जगाच्या पोशिंद्याच्या नशिबी फक्त थट्टाच - संजय खाडे 
दोन दिवस आधीच पोर्टल बंद करण्यात आहे. ३५०० च्या वर शेतक-यांना याचा फटका बसत आहे. खुल्या मार्केट मध्ये भाव खूप कमी आहे. शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल पडून असला तरी शेतकऱ्यांसोबत थट्टा सुरूच आहे. 

सरकारने त्वरित सोयाबीनची खरेदी व नोंदणी सुरू करावी. शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा संजय खाडे यांनी दिला आहे. निवेदन देताना अशोक चिकटे, प्रशांत गोहोकार, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवारी, रोहन ठाकरे, संजय शेंडे इत्यादींची उपस्थिती होती.