सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू,संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढले. याविरोधात कामगारांनी सोमवारपासून निलजई येथील कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. मात्र संध्याकाळ पर्यंत कंपनीकडून कोणताही निरोप न आल्याने उपोषण सुरूच होते. कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी या उपोषण मंडपाला भेट देत त्यांना पाठिंबा जाहीर केला. कामगारांना न्याय मिळावा यासाठी वiरिष्ट पातळीवर चर्चा सुरू केली आहे. जो पर्यंत कामागारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगारांसोबत राहण्याचे वचन त्यांनी दिले. 

 एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या विरोधात कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 

उपोषण मंडळाला एसडीपीओ गणेश किंद्रे, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे, पीएसआय रावसाहेब बुधवट यांच्यासह प्रमोद वासेकर, राजू अकंतवार, तेजराज बोढे, शंकर व-हाटे, अशोक चिकटे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. सोमवारी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून मॅनेजर व इनचार्ज यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी कामगारांच्या मागण्या व्यवस्थापन पर्यंत पोहोचवून मंगळवारी स. 10 वाजेपर्यंत निरोप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कंपनीकडून कोणताही निरोप न आल्याने उपोषण सुरूच होते. 
विशाल गोवारदीपे, कानुजी लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, संदीप भोयर, रवि गुरनुले, प्रविण कातारकर, मनोज खाड़े, प्रकाश इंगोले, श्रीकांत निंदेकर, अरुण डाहुले, अनिल डोंगे, वासुदेव चिडे यांच्यासह सुमारे 40-50 कामगार उपोषणाला बसले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी - संजय खाडे 
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. मात्र कंपनी भूमिपुत्रांवरच अन्याय करीत आहे. कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी असून कंपनीने त्यांना तात्काळ नोकरीवर रुजू करावे. 


आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणी तर्फे आयोजित आंतर शालेय नृत्य स्पर्धेत पूर्व माध्यमिक गट यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही स्पर्धा एस पी एम शाळेत आयोजित करण्यात आला होती.

विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.श्री. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य श्री. विक्रांतजी चचडा, शाळेचे प्राचार्य श्री. प्रफुल महारतळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सौ.शुभांगी बलकी, सौ. वंदना बाविस्कर, सौ.अर्चना पाटील, सौ. प्रणोती खडसे, सौ. रुपाली शिरपुरकर, कु. तेजस्विनी झाडे, सौ. संतोषी ताजणे इत्यादी शिक्षकांचा व विद्यार्थांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.

मारेगावात वंचितचे "जवाब दो" आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगांव : वंचित बहुजन आघाडी मारेगांवचे वतीने छेडण्यात आलेले "जवाब दो" आंदोलन तालुकाध्यक्ष गौतम दारुंडे यांचे मार्गदर्शनात, आंदोलक गजानन चंदनखेडे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांचे हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून घंटानांद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. या सुरू केलेल्या "जवाब दो" आंदोलनाची नगर पंचायत ने दखल घेतली आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष नूतनताई तेलंग, जिल्हा सचिव प्रणिता ठमके, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, स्मिता खैरे, अश्विनी खाडे, संजय जीवने, हुसेन ढोबरे, हरिभाऊ रामपुरे, शेख दिलदार, सुमित गेडाम, सचिन मेश्राम, विजय मेश्राम, विजय खाडे, वासूमित्र वनकर, मोरेश्वर खैरे, विनोद बदकी, पत्रकार ज्योतिबा पोटे, प्रा. सतीश पांडे, प्रफुल्ल भगत आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीचे विनीयमन करण्याबाबत व त्यांच्याशी निगडित असलेल्या बाबी संबंधित तरतूद करण्यासाठी "जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९" या भारत सरकारच्या अधिनियमाला, मारेगाव नगरपंचायतिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून मुठ माती देत, अजब फतवा काढीत, चक्क नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. या अन्यायकारी धोरणाचे विरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगाव मैदानात उतरली होती. 25 जानेवारी ला मारेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर, "जिल्हाधिकारी साहेब जवाब दो" या बेमुदत घंटानाद आंदलनाचे कार्यकर्त्यांनी रणसिंग फुंकले होते.  

विशेष म्हणजे नगरपंचायत मारेगाव यांनी, जन्म व मृत्यू नोंदणी करीता लागणारी कागदपत्रे याबाबतचे कुठलेही विवरण प्रसिद्धी फलकावर लावलेले नव्हते. मन मानेल तसे उत्तर देत सामान्य जनतेला वेठीस धरत व तिची आर्थिक लूट करन्याचा सपाटा अलिखित पद्धतीने नगरपंचायतीकडून सुरू होता. जेव्हा की शासनाच्या जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार नियम आणि अटीला अधिनस्त राहूनच जन्म मृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे. 

या आर्थिक लुटीच्या भंडाफोड झाला तो, वंचित बहुजन आघाडीचे गजानन चंदनखेडे यांची आजी नामे अनुसया विठ्ठल नगरराळे यांचे २६ डिसेंबर २०२४ ला वृद्धापकाळाने निधन झाले होते. तिचा अंत्यसंस्कार मारेगाव स्मशानभूमीत झाला होता. हिच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी गजानन चंदनखेडे यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ ला नगरपंचायतीला रीतसर अर्ज होता. मात्र गजानन चंदनखेडे यांच्या अर्जाला केराची टोपी दाखविल्या गेली व मृत्यूची नोंद करून घ्यावयाची असल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञालेख करून आणल्याशिवाय मृत्यूची नोंद होणार नाही. असे खडसावून सांगितल्या गेले व प्रतिज्ञालेख आणल्यानंतरच मृत्यूची नोंद घेतल्या गेली. या प्रकरणानंतर नगरपंचायत मारेगाव च्या भ्रष्टाचारी यंत्रणेचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आला. यासाठी वंचित च्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आले. 


"प्रजासत्ताक दिनाचे आदल्या दिवशी नगरपंचायत मारेगाव कार्यालयाचे समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू केलेल्या "जवाब दो" आंदोलनाची दखल घेत न. प. मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की यांनी आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलकाला त्वरित न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली." 

ॲड.महाजन यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी ॲड. टोंगे यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                   
वणीवणी वकील संघाची निवडणूक दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात पार पडली. या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीचा निकाल 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निवणुक अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी घोषित केला. त्यामध्ये एकता पॅनलचे ॲड. विरेंद्र महाजन यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी ॲड. अमोल टोंगे यांना विजयी घोषित करण्यात आले.

बार असोसिएशनची निवडणूक दर तीन वर्षांनी घेतल्या जातात. या निवडणुकीमध्ये विविध वकील आपले अर्ज दाखल करून नशीब आजमावत असतात. वकिलांची निवडणूक असल्याने बुद्धिजीवी लोकांची निवडणूक म्हणून त्याकडे एक गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन आहेत. बुद्धिजीवी लोकांच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे जनतेचे सतत लक्ष लागलेले असतात. दोन्ही पॅनल प्रचंड ताकतीने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून प्रचार मोहीम राबवत असतात. याशिवाय काही अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीत असतात. बुद्धिजीवी वर्गाची निवडणूक म्हणून जनसामान्याचे या निवडणुकीकडे मोठे लक्ष असते आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असते. या निवडणुकीत बाजी कोण मारणार हाच प्रश्न निर्माण असतो. या निवडणुकीत एकता पॅनलने प्रचंड विजय संपादित करत अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, सहसचिव, या पदासह कार्यकारी सदस्य म्हणून 3 अश्या एकूण 7 एकता पॅनलच्या उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजयी झाला.

वकील संघाची चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ऍडव्होकेट विरेंद्र महाजन यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून ॲड.अमोल टोंगे, उपाध्यक्ष ॲड.यशवंत बर्डे, सहसचिव ॲड.रामेश्वर लोणारे, कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड.दिलीप परचाके, ॲड.आकाश निखाडे, ॲड. चंदू भगत या एकता पॅनलच्या उमेदवारांना विजय संपादन करण्यात यश मिळाले असून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी घोषित केले आहे.

ॲड.निलेश चौधरी यांच्या पॅनलचा पराभव झाला असून त्यांना केवळ चार जागेवर विजय संपादित करण्यात यश मिळाले. या चुरशीच्या निवडणुकीत बाजी कोण मारेल हा संभ्रम निर्माण झालेला असताना ॲड.महाजन यांच्या पॅनल ने प्रचंड बहुमताने विजय संपादित करत प्रतिस्पर्धी पॅनलला धुळीस लावले.
    
एकता पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजयाचे श्रेय, ॲड. डी एन लोडे. ॲड. व्हि.डी काकडे. ॲड.व्ही एम कवाडे,ॲड.झेड शरीफ,ॲड.तेलतुंबडे ॲड.बांदुरकर,ॲड. घनश्याम निखाडे यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांना दिले आहे. ॲड. महाजन, ॲड. टोंगे यांच्या सह सर्व विजयी उमेदवारांवर शुभेच्छाचा प्रचंड वर्षाव होत असून सर्व स्तरातून ॲड. महाजन व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आह



कारचा भीषण अपघात, दोन जण जखमी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : कारचा भीषण अपघात होऊन दोन युवक जखमी झाल्याची घटना वांजरी गावाजवळ घडली. कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकली. आणि यातच त्यांना दुखापत झाली आहे. 25 जानेवारीला रात्री 10.30 च्या सुमारास अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 26 जानेवारीला सकाळी या मार्गांवरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांना ही कार रस्त्याच्या कडेला उलटून पडलेली दिसल्यानंतर हा अपघात पाहण्यासाठी बघ्याची गर्दी उसळली होती. सुजल वानखेडे रा. पळसोनी व त्याचा सहकारी वैभव असे या अपघातात जखमी झालेल्या युवकांचे नाव आहे.
कार क्र (MH 40, 3424) ने नांदेपेरा येथे मित्राला पोहचवून पळसोनी या आपल्या गावाकडे येत असतांना कार अनियंत्रित होऊन सुजल व त्याचा मित्र कार सह किमान 70 ते 80 फुटाच्या अंतरावरून एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ती हवेत उडत रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. रात्रीच वांजरी येथील मित्रांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदत केली,सुजल वानखेडे याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले तर त्याच्या सहकाऱ्याला नागपूर येथे पाठविले.