आदिवासी संघटनाकडून धरणे आंदोलनाची घोषणा; पुष्पाताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या उपस्थितीत 11 ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी वणी येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता.3) ला जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. दरम्यान,समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने आदिवासी समाजातील सर्व संघटनांना अवगत करून बैठकीत न्याय संसदेत प्राप्त प्रश्न, समस्याचा अहवाल सादर करण्याचा निर्णय उपस्थित आदिवासी समाज संघटना समन्वय समिती द्वारा महाराष्ट्र सरकार व विशेषतः मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठरविले.

आदिवासी समाजात गैरआदिवासीकडून सातत्याने घुसखोरीची भाषा केली जाते, हे असंविधानिक असूनही राज्य शासन गांभीर्याने घेत नाही, उलट त्यांची पाठराखण करतात, त्यामुळे सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरून गैरआदिवासीची घुसखोरी व सरकारने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नये आणि समाजासमाजात आपसी भांडण लावू नये, असे उपस्थितांनी यावेळी चर्चेअंती सांगितले. तसेच या सरकार विरोधी धरणे आंदोलनाला आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले.

वणी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस पुष्पाताई आत्राम, गीत घोष, ॲड. अरविंद सिडाम, रामदास गेडाम, श्रीकृष्ण मडावी, भाऊराव आत्राम, वसंत चांदेकर, अशोक नागभीडकर, अशोक राजगडकर, पत्रकार संदीप बेसरकर, कुमारअमोल, महेश आत्राम, शरद बेसकर, नंदकुमार बोधकर, रामकृष्ण सिडाम, पी डी आत्राम, विनोद बोरकर, लहानू सालूरकर यांच्यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वणीत सिनेकलाकारांच्या उपस्थितीत राजे गरबा उत्सव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात ठिकठिकाणी नवरात्रीनिमित्त गरबा उत्सवाचे आयोजन केले गेले असून वणी शहरात पहिल्यांदाच राजे गरबा महोत्सव 2024 चे वसंत जिनिंग लॉन येथे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे मराठी श्रुष्टीतील कलाकारांची उपस्थिती या गरबा उत्सवात असणार आहे. 

4 ऑक्टोबरला चला हवा येऊ द्या फेम सिने अभिनेता भारत गणेशपुरे तर, 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुळकर्णी ही येणार असून वणीकरासोबत हे मराठी नट नटी गरब्याचा आनंद लुटणार आहेत. 

दररोज आकर्षक बक्षीसासह नऊ दिवस चालणाऱ्या राजे गरबा महोत्सवात निशुल्क सेवा असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या गरबा महोत्सवात वणीसह परिसरातील गरबाप्रेमिनी सहभागी व्हावे, असे आवाहन वसंत जिनींग अध्यक्ष आशिष खुलसंगे व सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी व्हनखंडे यांचा वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील गटविकास अधिकारी बि.व्ही व्हनखंडे यांचा जन्मदिवस कर्मचारीच्या वतीने पुष्पगुछ व केक कापून देऊन पंचायत समिती येथे छोटेखानी कार्यक्रम अंतर्गत वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यांना दीर्घ, निरोगी आयुष्याच्या यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

अधिकारी यापूर्वी चा मोर्शी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यानंतर त्यांची बदली एक जानेवारी 2024 रोजी मारेगाव पंचायत समितीला झाली. एक कर्तव्यदक्ष, युवा अत्यंत शांत मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागत आहे असे जनतेकडून बोलल्या जात आहे. 

हा वाढदिवस साजरा होत असताना या ठिकाणी उपस्थित कर्मचारी बादल खांडरे, सचिन सहारे, सिद्धम शेट्टीवार, माने साहेब, बालू देठे, वैभव चिपडे,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते, अत्यंत शांत वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

जलमिशनने आणले डोळ्यात पाणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शासनाकडून प्रत्येकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील अनेक गावात अद्याप पाणी न आल्याने साहेब, जलजीवन मिशनचे पाणी घरापर्यंत कधी येणार' असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात वाजतगाजत जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात झाली. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे करण्यात येत आहेत.

अनेक गावांमध्ये टाकीची कामे पूर्ण झाले, विहिरीचे काम झाले व पाईपलाईन टाकली. परंतु, अजूनही पाणी नागरिकांच्या घरापर्यंत न पोहोचल्याने जलजीवन मिशनचे पाणी कधी पोहोचेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

पाईपलाईनसाठी रस्ते खोदले. रस्ते खोदल्याने अनेक गावांमध्ये खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले. या रस्त्यांची अजूनपर्यंत डागडुजी केली नाही. पाऊस आला की रस्ते चिखलमय होऊन अख्या गावामध्ये चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरते.

याविषयी अनेक गावांमधून तक्रारीसुद्धा आल्या होत्या. परंतु, जलजीवन मिशन विभागाने याकडे लक्ष दिले नाही. जलजीवन मिशनचे पाणी कधीपर्यंत घरापर्यंत येणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वी पाणी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तूर्तास जलमिशनचे पाणी घरापर्यंत न येता डोळ्यात मात्र, येण्याची वेळ आली आहे.

वणीत आदिवासिंच्या सामाजिक 'न्याय संसदे'ला खासदार-आमदारांनी फिरवली पाठ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदार संघात आदिवासी समाज आपला स्वतंत्र प्रतिनिधी निवडून आणू शकतो एवढे मतदान विधानसभेत आहेत. परंतु असे न करता, वेळप्रसंगी प्रस्तापित पक्षांना सरसकट मतदान करून आपल्या सामाजिक समस्या, प्रश्न सोडवतील म्हणून आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी कायम आहे. परंतु आजतागायत कोणत्याही पक्षाने नेतृत्व करण्याची संधी न दिल्याने हा आदिवासी समाज मात्र, आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. असे असताना राज्यात गैरआदिवासीची घुसखोरी व बोगस आदिवासीचे प्रमाण वाढत चालल्याने त्यांनाच आपले लोकप्रतिनिधी समजून समाजाला न्याय देतील, म्हणून वणी येथे रविवारी एक आदिवासी सामाजिक न्याय संसदेचे आयोजन करण्यात आले. 

या संसदेला खासदार आमदार व मंत्र्यांना मान देऊन त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आले, त्यांनी आदरपूर्वक निमंत्रण स्वीकारलं हेही तितकंच सत्य आहे. न्याय व हक्कासाठी समाज बांधवानी महिनाभर जीवाचे रान करून संसद आयोजित केली. मात्र ऐन कार्यक्रमाच्या दिवशी आमंत्रित मान्यवरांनी या न्याय संसदेला दांडी मारल्याने समस्त आदिवासी समाजात या खासदार, आमदार व मंत्र्याच्याबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. या आदिवासी सामाजिक न्याय संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील पारधी, कोलाम, गोंड, आंध, परधान जमातीतील बहुसंख्य लोक सहभागी झाले होते. येत्या निवडणुकीत सरंजामशाही, भांडवलशाही धार्जिणे तसेच धर्मांध, संविधान विरोधी,आरक्षणविरोधी पक्षाना आता आदिवासी समुदाय हा राजकीय व्यवस्था बदलण्याच्या संग्रामात उतरला असल्याने हा समाज आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे या संसदेचे मुख्य संयोजक गीत घोष यांनी या प्रसंगी आपल्या भावना प्रास्ताविकेतून व्यक्त केल्या आहे. 

विविध पक्षाच्या दिग्गज नेत्यांना या न्याय संसदेत पाचारण करून आमच्या समाजाच्या समस्या प्रश्न शासन दरबारी मांडणार की नाही, किंबहुना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देणार की नाही अशी या संसदेमागची प्रमुख भूमिका होती. त्यातूनच खासदार प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर लोकसभा), ना. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, खासदार डॉ.नामदार किरसान (लोकसभा गडचिरोली क्षेत्र),आ. डॉ. अशोक उईके (राळेगाव विधानसभा क्षेत्र),आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र,आ. डॉ. संदीप धुर्वे (केळापूर विधानसभा क्षेत्र), आ. सुभाष धोटे, (राजुरा विधानसभा क्षेत्र), आ. किशोर जोरगेवार (चंद्रपूर विधानसभा क्षेत्र) यांना सन्मानाने बोलावण्यात आले परंतु त्यांनी जाणूनबुजून पाठ फिरविल्याची चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. 

जनतेचे आणि आदिवासी समाजाचे प्रगल्भ असलेल्या जिल्ह्यातील मान्यवरांना या न्याय संसदेत जराही येण्याची तसदी घेतली नसल्याने आदिवासी समाजात मोठा असंतोष पसरला असून कुरघोडीचे राजकारण उफाळून आले आहे. पक्षाच्या सभा असो की शासकीय कार्यक्रम, यामध्ये येण्याची ते नेते कोणतीच कसर सोडत नाहीत. मात्र आदिवासी समाज जेव्हा आपला न्याय हक्काची दाद मागण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, हे त्यावेळी कुरघोडी करीत आहेत. वणी येथील आदिवासी बांधवानी जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्या, प्रश्ना चे निराकरण करण्यासाठी रविवारी (ता.२९) रोजी संसद घेतली. मात्र, या संसदेला ला लोकप्रतिनिधीनी पाठ फिरविली असतांनाही सदर संसदीय कार्यक्रम आदिवासी विचारवंत यांचे उपस्थित यशस्वीरीत्या पार पडला. या संसदेचे अध्यक्ष मा उत्तमराव गेडाम, उद्घाटक मधुकरजी गेडाम माजी तहसीलदार, स्वागताध्यक्ष डॉ. संचीताताई नगराळे, प्रमुख पाहुणे रामचंद्र आत्राम, रामदासजी गेडाम, राहूल आत्राम, पुष्पाताई आत्राम, होमदेव कनाके, हे होते व त्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. या संसदेचे प्रास्ताविक गीत घोष यांनी केले, सूत्रसंचालन ॲड अरविंद सिडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत चांदेकर यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अध्यक्ष उत्तमराव गेडाम, कार्याध्यक्ष पुष्पा आत्राम, सचिव अ‍ॅड अरविंद सिडाम, उपाध्यक्ष राहुल आत्राम, रामदास गेडाम, प्रकाश घोसले संयोजक गीत घोष, भाऊराव आत्राम, वसंतराव चांदेकर, संतोष पेंदोर, कुमारअमोल कुमरे, महेश आत्राम, विकास पंधरे, रमेश मडावी, प्रशांत डोनेकर, श्रीकृष्ण मडावी, अशोक नागभिडकर, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, सचिन मेश्राम, आदिवासी सामाजिक न्याय परिषदेच्या सर्व पदाधिकारी सभासद तसेच आदिवासी समाज बांधवांनी प्रयत्न केले. 

एकीकडे जनतेचे प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत तळमळीने मांडणाऱ्या खासदार, आमदारांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. खासदार धानोरकर, आमदार बोदकुरवार, व वनमंत्री मुनगंटीवार संसदेला न आल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस ला जागा दाखवणार असल्याची चर्चा यानिमित्ताने वणी विधानसभा मतदार संघात रंगतांना दिसत आहे.