विवाहित तरुणाने घेतला "जन्मदिनी" गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगावच्या क्लब येथे घडली आहे. आज रविवारी दुपारी 2.15 च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. 

नवीन मोतीगिरी बामणे (वय 35) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. नवीन याच्या पाठीमागे पत्नी व दोन वर्षाची चिमुकली आहे. विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस देखील होता, आणि त्याने जन्मदिनीच आपली जिवन यात्रा संपवल्याने मारेगावात हळहळ व्यक्त होत आहे. 

मृतक नवीन याचे वडीलांचे छत्र हरवल्याने लहानपासून मोठ्या वडिलांनी त्याचे पालणपोषण केले होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, आपल्या जन्मदिनी एका नामांकित क्लब मधील तिसऱ्या मजल्यावर त्याने गळफास घेतल्यामुळे विविध चर्चेला उधाण आले असून अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहेत.

कोसारा पुलारून पाणी: खैरी कोसारा ते माढेळी मार्ग बंद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात शनिवारी रात्रभर पाऊस कोसळला. शहरासह ग्रामीण भागाला बेभानपणे झोडपून काढणा-या पावसाने घरादाराची मात्र फार माया केली नाही. तालुक्यात शनिवारी (ता.३१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास दणक्यात सुरू झालेला पाऊस ठिकठिकाणी रात्रभर कोसळला. 

तालुक्याला चिंब भिजवत पावसाने पुन्हा खैरी कोसारा ते माढेळी वरोरा मार्ग बंद पडला. मिळालेल्या माहितीनुसार कोसारा ते माढेळी वर्धा नदी दुथळीभरून वाहत असल्यामुळे पुराचे पाणी कोसारा पुलावरून नुकतेच ओसंडून वाहू लागले आहे. रात्री मुसळधार पाऊस कोसळला असल्याचे येथील उपसरपंच सचिन पचारे यांनी सांगितले असून खैरी कोसारा ते माढेळी मार्ग सध्या बंद आहे. कोणीही या मार्गांवर येण्याचा व जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान या मार्गांवरील वाहतूक तूर्तास ठप्प असून पाणी स्थिर असून पूर उतरण्याची वाट प्रवाशी पाहत आहे.
तालुक्यात मान्सून सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. पावसाचा लपंडाव यामुळे शेतकरी हैराण झाले.

मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : सन‌ २०२२ मध्ये पार पडलेल्या खापरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत मुलांची माहिती दडवून निवडणूक लढवणे सरपंचाला भोवले असुन अप्पर जिल्हाधिकारी, अमरावती यांनी खापरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ सज्जुलाल पटेल यांस अपात्र घोषित केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उभे राहता येत नाही. परंतु गंभेरी येथील रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना चार मुले असतानाही सन २०२२ मध्ये ग्राम पंचायत खापरखेडा च्या सरपंच पदांची निवडणुक लढविली होती. या निवडणूकीत रामभाऊ सज्जुलाल पटेल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मुलांची माहिती दडवून आपले नामांकन दाखल केले होते व विजयी झाले होते. मुलांची माहिती दडवून सरपंच पदावर निवड झाल्याने खापरखेडा येथील किशोर रामकिशन जांभेकर यांनी ॲड निखिल भि. सायरे यांचेमार्फत अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सरपंच पदाचे अपात्रता प्रकरण दाखल केले होते. 

प्रस्तुत प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. सायरे यांनी दाखल केलेले पुरावे तसेच लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिनांक २८/०८/२०२४ रोजीच्या आदेशानुसार किशोर जांभेकर यांचा अर्ज स्विकारुन रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना ग्रामपंचायत खापरखेडा ता. धारणी जि. अमरावती येथील सरपंच पदाकरीता अपात्र घोषित केले आहे. 


रात्रीचा मुसळधार पाऊस,वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट; शहर जलमय ग्रामीण घरांची परझड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस वेगवान वारा व अस्मानी विजेच्या कडकडाटाने सर्वसामान्यांची पुरती धांदल उडाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी जमा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने शहरासह ग्रामीण भागातील घरे जलमय झाले. मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील दोन घरांची पडझड होत जमीनदोस्त झाल्याने किमान लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

तालुका प्रशासनाने दखल घेवून तत्काळ आर्थिक सहाय्य करण्याची मागणी नुकसानग्रस्तानी केली आहे.

वणी तालुक्यातील वांजरी येथील एका युवकाची दुचाकी पुराणे वाहून गेली. मात्र, युवकाने स्वतः चा बचाव करित कसे बसे गाव गाठले आज सकाळी पाण्यात वाहून गेलेली दुचाकी झुडुपात अडकून होती तीला बाहेर काढण्यात आले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा धक्कादायक प्रकार वणी नांदेपेरा बायपास वरील नांदेपेरा रोडवरचा आहे. दरम्यान रात्री वणी नांदेपेरा मार्ग काही काळ ठप्प पडला होता.

सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना पडली भुरळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मनसे दहीहंडी उत्सव आधुनिक जल्लोषात आणि उत्साहाने भरभराटीला येत असून, वणीमध्ये नव्याने समृद्ध परंपरा आणि प्रथा दर्शवत असल्याचा प्रत्यय काल शुक्रवारी (ता. 30) ला आला. अभूतपूर्व प्रतिसाद बघता नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव शासकीय मैदान येथे उत्सहात पार पडला आहे. 
शहराची आधुनिक प्रगती असूनही, परंपरा आणि उत्सव यांचे हे मिश्रण वणीचा चैतन्यशील सांस्कृतिक वारसा अधोरेखित करते. गोपाळकाला पर्वावर वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडीची विशेष उपस्थिती मराठी सिनेअभिनेत्री हे एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे उत्सवाला चार चांद लागतात. यावेळी सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. माधुरी पवार यांच्या हस्ते, राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत बक्षीस गोविंदा पथकांना देण्यात आले. दरम्यान सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना भुरळ पडली. 
मागील वर्षां देखील या दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळला होता. यावर्षीही मनसे दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मनसे नेते राजु उंबरकर यांनी ह्या दहीहंडी उत्सवाची संकल्पना वणी शहरात रुजवून उत्साही गोविंदासाठी आपली प्रतिष्ठा कायम राखत, मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अल्पभुदारक शेतकऱ्यांसाठी मोफत बि -बियाणे वितरण करण्याची घोषणा केली. या लक्षणीय उत्सवात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व उत्साहीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होती.