मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासोबत त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी ७ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून ५० हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॉ.अशोक उईके, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे. या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही, त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिण्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना ३ सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिण्याला ६ ते १० हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे.

राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. ७.५ एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून स्त्री शक्तीचा जागर - देवेंद्र फडणवीस
राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने स्त्री शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या १८ व्या वर्षापर्यंत १ लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. ८ हजार ५०० कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपुस केली जात आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला १२ तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करतो आहे. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही - अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खुष आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. योजनेतून महिलांना ४५ हजार कोटी रुपये आपण देतोय. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल.  

राज्यातील ५२ हजार कुटुंबाना वर्षाला ३ सिलेंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजूरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु - संजय राठोड
शेतकरी, महिला, गरीब, कामगार, युवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून १ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ६० हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेमुळे बहिणींना आता हात पसरायची गरज राहिलेली नाही. मुख्यमंत्री भावाने दिलेल्या ओवाळणीतून बहिणींनी खरेदी करून आपल्या भावाला राखी बांधली. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. अशातही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ५० हजारांपेक्षा अधिक महिलांनी आपल्या मुख्यमंत्री भावाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावांना राख्या बांधल्या. भावाने केलेल्या घोषणेची वचनपूर्ती केली. काहीच दिवसात अपेक्षा नसतांना ओवाळणी देखील जमा झाल्याने आनंदाचे भाव महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगत, नंदा सुतारकर, बेबी माणिक चव्हाण, नलिनी राम राठोड, चंदा सचिन शेंडे, शुभांगी शिंदे, प्रतिभा कोरडे, सुमन रमेश गेजीक, जया हरीदास विरदंडे, इंदिरा लक्ष्मण मांगरे, शुभांगी रविंद्र ढोरे, टिंकल आकाश उरगुंडे, संगिता शेषराव राठोड, रेश्मा शेख जावेद, नाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

महाराष्ट्रात महिलांचे व बालिकांचे संरक्षण न करणारे महाराष्ट्रातील युती सरकार बरखास्त करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराचे विरोधात दिनांक २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांना निवेदन पक्षाचे सचिव ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी व ॲड. कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वात देण्यात आले.

महाराष्ट्रातील महिला आणि बालिकांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती.

बदलापूर, पुणे, अकोला आदी ठिकाणी शाळांमधील लहानग्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. बदलापूर येथील घटना घडलेल्या शाळेचे संचालक भाजपाचे असल्याने महायुतीच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास अक्षम्य टाळाटाळ केली. याविरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीमार केला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष, एकनाथ शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली.

महायुतीने मुळातच गुन्हेगारीतून राज्याची सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची राजधानी बनवत या महायुतीने आजवर सुसंस्कृत, महिला आणि सर्वसामान्यांचा आदर करणारे राज्य ही महाराष्ट्राची प्रतिमा मातीत घातली आहे.

बेटी बचाव, लाडकी बहीण या घोषणांमागील हे वास्तव आहे. राज्यातील महिलांना खरी गरज महायुती पोसत असलेल्या गुंडांपासून संरक्षणाची आहे. 

यापूर्वी ठाणे जिल्ह्यातीलच कल्याण येथील गणेश घोळ मंदिरात सासरच्या छळाला कंटाळून थोडा मानसिक आधार घेण्यासाठी आलेल्या अंकिता म्हात्रेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिचा खून केला होता. रायगडची यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर......यादी न संपणारी आहे.

महायुती सरकारच्या महिला विरोधी कारभाराचा निषेध करून ही अनैतिक व अवैध महायुती सरकार बरखास्त करण्यात यावे यासाठी शनिवार २४ ऑगस्ट राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन देताना ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी, ॲड. कॉ. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. शंकर गाऊत्रे, कॉ. नंदू बोबडे, कॉ. अशोक गेडाम, कॉ. विलास कुमरे, कॉ. सुभाष नांदेकर, कॉ. सुनील गेडाम, कॉ. हरीश वासेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. अमोल चटप, कॉ. हुसेन आत्राम, कॉ. नेताजी गेडाम, कॉ. अर्जुन शेडमाके आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्र्यांच्या कार्यक्रसाठी बस येऊ शकते तर, विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याकरीता एस.टी. गावात का येत नाही?

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : यवतमाळ येथे मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करीता बस का येत नाही? असा सवाल जागजई येथील विद्यार्थ्यांनी आज गावात आलेल्या एस.टी बस समोर उभे राहुन सरकारवर संताप व्यक्त केला. 

आज शनिवारी २४/८/२४ रोजी यवतमाळ येथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते,त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी बस का येत नाही? असा संताप तालुक्यातील जागजई येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच जागजई, चंदेरी, अंतरंगाव, शेळी, वनोजा, धानोरा रोहनी, परीसरात मागील काही दिवसांपासून वाघाच्या वावर असल्याने परीसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अंतरंगाव येथे सात किलोमीटर पायपीट करीत जाणे येणे करावे लागते. त्यामुळे सरकारने जशी लाडक्या बहीणीची काळजी घेतली, तशीच शाळेत जाणाऱ्या लाडक्या भाच्याची काळजी का घेत नाही. त्यांचा जिव प्रिय नाही का?,आम्हाला बस सेवा कधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थी तसेच पालकांकडून केली जात आहे.

वणीत 'मविआ' चा काळी पट्टी लावून निषेध आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज महाराष्ट्र बंद ची कडक हाक महाविकास आघाडी ने पुकाली होती. मात्र, कोर्टाने परवानगी नाकारल्याने या सरकार च्या दडपशाही च्या विरोधात व बदलापूर घटनेचा निषेध म्हणून वणी येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या पट्टी लावून मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी संजय खाडे, आशिष खुलसंगे, संजय निखाडे, डॉ. लोढा, दीपक कोकास, अजिंक्य शेंडे, संध्या बोबडे, सुधीर थेरे, राजीव कासावार, शालिनी रासेकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, यासह असंख्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मविआ च्या वतीने आज शनिवारी भर पावसात तोंडाला काळी पट्टी लावून आंदोलन केले आहे.

सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत शेतकऱ्यांना देण्यात आली माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सन 2024 मधील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी शेतात पिकांची पेरणी केलेली आहे. त्या पिकांची ई-पीक पाहणीचा सध्या कार्यक्रम चालू आहे.आज दि. 24/8/2024 शनिवार रोजी मारेगाव तालुक्यातील त्या त्या गावातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल, ग्राम पंचायत, मंदिरात, चौकात आणि गावातील जास्तीत जास्त शेतकरी एकत्रित येतात अशा ठिकाणी सभा घेऊन ई-पिक पाहणीचे महत्व सांगितले जात आहेत. आज सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत माहिती देण्यात आली. 

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर जाऊन ई- पिक पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. सध्या शासन स्तरावर ई-पिक पाहणी अतिशय महत्त्वाची बाब झाली आहे. एका मोबाईल वरून 100 शेतकऱ्यांचे/खातेदारचे ई-पिक पाहणी करता येते. सर्व शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पिक पाहणी करून भविष्यात मिळणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगांव यांनी केलेले आहे. 

मारेगांव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी अडचणी येत आहेत, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, कोतवाल, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे.तसेच वर्धा नदीला पाणी सोडल्याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.