दरोड्यातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील करंजी येथील वाहन चालकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना 7 जून रोजी घोगुलधरा (ता. मारेगाव) फाट्यावर घडली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.ही कारवाई यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

करंजी येथील सलीम सुलतान गिलाणी (44) हे आपल्या वाहनात पॅसेंजर घेऊन जात असताना मारेगाव तालुक्यातील बोटोणीच्या समोर घोगुलधरा फाट्यावर गिलाणी यांना लाथाबुक्क्‌यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी चाकूचा धाक दाखवून 20 हजार 900 रुपये बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पो.स्टे मारेगाव येथे फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन अप क्र. 198/24 कलम 395, 364 (अ), 342, 326, 504, 506, भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, इतर आरोपी फरार होते.

फरार आरोपींचा शोध घेत असताना सदर तिघे नागपूर येथून बाहेर राज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळाली. त्यावरून सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा आणि यवतमाळचे पथक नागपूरकडे सरकारी व खासगी वाहनाने रवाना होवुन नागपुर रेल्वे स्थानक परीसरात वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींचा कसोशिने शोध घेतला असता आरोंपीना पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पथकांनी आरोपींचा पाठलाग करुन रेल्वे स्टेशन परीसरातुन नमुद तीनही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. शुभम सुधाकर कापसे (30) रा. जामनकरनगर यवतमाळ, विकास दिनेश खुडे (31), सूरजनगर यवतमाळ व प्रफुल्ल नारायणराव चौकडे (36) रा. आठवडीबाजार यवतमाळ या तिघांना ताब्यात घेतले. तसेच आरोपींना गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस करुन स्क्रापीयो वाहन क्र (एम एच 14 डी ऐ 2727) किमंत अंदाजे 12,000,00 /- रुपयेची ताब्यात घेवुन आरोपी सह पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन मारेगाव येथे पोहचुन तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले. 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलंदार उल्हास कुरकुटे, नरेश राउत, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

आनंदवनात २५ वर्षीय तरुणीचा "मर्डर"

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : येथील प्रसिद्ध स्वर्गीय बाबा आमटे यांच्या "आनंदवन" आश्रमात एका पंचवीस वर्षीय तरुणीचा निर्दयी खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

आरती दिगंबर चंद्रवंशी (25) रा. आनंदवन वरोरा असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बऱ्याच वर्षांपासून आनंदवनात आपल्या आई व अंध वडिलांसह राहत होती. या घटनेसंबंधित एका 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याचे समजते आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून आनंदवनमध्ये दाखल होता, आरती चंद्रवंशी हिची हत्या केल्याचे त्याने पोलिसासमोर कबूल केले. त्याने बुधवारीच्या रात्री आरोपी समाधान कोळी रा. चोपडा जिल्हा जळगाव ह. मु. याने आरतीची हत्या केली. 26 जून रोजी आईवडील उपचारासाठी सेवाग्राम येथे होते, ते उशिरा आल्यानंतर तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरातील बाथरूम आढळून आला होता. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने व जलद गतीने शोध घेतल्यानंतर चोपडा जि.जळगाव ह. मु. वरोरा येथील संशयित आरोपी समाधान कोळी याला अटक केली आहे. गुन्ह्याचा हेतू व पद्धत निष्पन्न करण्याकरता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.

सदर कारवाई श्री. मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.

"यापूर्वीही याच आनंदवनात आत्महत्येचे प्रकरण तापले होते, मात्र वर्ष उलटले. परंतु पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत, आता ते आत्महत्या प्रकरण कधी उघड होणार का? असा प्रश्न उपस्थित या नुकत्याच "मर्डर" प्रकरणाने होत आहे. "

महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी!


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : मागील ३ महिन्यापूर्वी महागांव तहसील मधील भ्रष्ट महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांचे विरोधात पुराव्यासहित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, त्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी महागांवच्या ३ पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. 

हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्‍याने पांदण रस्ता खूला करुन मिळण्यासाठी प्रकरण गेल्या ३ वर्षापासून सुरु असून शेतकरी आंडगे यांनी न्याय मागण्यासाठी ५ वेळा उपोषण केले. परंतू महागांव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी आंडगे यांना न्याय तर दिलाच नाही. परंतू महसूल खात्याला काळीमा असणारा महसूल सहाय्यक यांनी दि. २१/०६/२०२४ रोजी ४० हजार रुपयाची लाच मागीतली. तडजोडीअंती ३० हजार रुपयांमध्ये बोलणी फिक्स झाली होती.
शेतीसाठी जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे त्रासाने मेटाकूळीस आलेल्या शेतकरी पांडूरंग आंडगे यांनी थेट एसीबी कार्यालय, यवतमाळ गाठले, आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणारा महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर याला ३० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडून देवून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे. उशीरापर्यंत आरोपी प्रवीणकुमार पोहरकर याची चौकशी सुरु होती. पुसद सत्र न्यायालयाने आरोपी महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यास २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे कळते. सदर कार्यवाही लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली.

मारेगाव ते घोडदरा बस सेवा सुरू करा - ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव ते घोडदरा बस सेवा सुरू करावी, अशी मागणी घोडदरा येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.आज गुरुवारी यासंदर्भात वणी आगार यांना निवेदन देण्यात आले. 

मौजे घोडदरा येथील विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी मारेगाव येथे रोज येत असतात. परंतु बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घोडदरा ते मारेगाव येण्याजाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाची निकड लक्षात घेऊन बस सेवा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश आत्राम यांच्या नेतृत्वात वणी आगार प्रमुखांना निवेदनातून करण्यात आली. विशेष म्हणजे,घोडदरा ते मारेगाव बस सेवा सुरू करण्यासाठी ग्राम.पं.घोडदरा मासिक सभा दि.10/06/2024 रोजी ठराव सुद्धा घेण्यात आला आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तथा प्रा. शैलेश आत्राम, विनोद आत्राम, शितल परसुटकर नलू धोबे, वंदना राऊत, मेघा सहारे, रत्नमाला नेहारे, प्रतिभा धोबे, सुरेख मेश्राम, सरीता राऊत, हरिदास वऱ्हाटे, प्रकाश सोनटक्के, रघुनाथ आवारी, राजू नवले, नारायण ठाकरे, प्रमोद चांदेकर आदींची उपस्थिती होती. 

निधी अभावी "मोदी आवास" घरकुल बांधकाम ठप्प!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी "मोदी आवास" घरकुल योजना राबविण्यात येत आहे. मात्र, त्या योजनेचा लाभ (निधी) थांबल्याने घरकुल लाभार्थीचा संसार उघड्या वर आला आहे. त्यामुळे "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके त्वरीत देण्यात यावे, अशा आशयचे निवेदन बुधवारी (ता.26) सरपंच संघटनेच्या वतीने पंचायत समिती चे गटविकास अधिकारी भिमराव व्हणखंडे, मारेगाव यांच्या मार्फत मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना देण्यात आले. 

सन २०२३-२४ च्या मोदी (ओ.बी.सी.) आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना जो लाभ (निधी) मिळत होता, त्या निधीला दि. २३/०५/२०२३ पासून ब्रेक लागलेला आहे. मात्र, पावसाळा सुरु झाला असून लाभार्थ्यांचे बांधकाम योजनेच्या देयकापासून ठप्प पडले आहे. निधी अभावी लाभार्थ्यांना थातुर-मातुर झोपड्या करुन आपल्या कुटुंबासह ऐन पावसाळ्यात उघड्यावर गुजरान करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे जिवन धोक्यात आले, असून ही योजना ग्रामीण भागातील लोकांना हिताची कि धोक्याची असा गंभीर प्रश्न लाभार्थ्यातून उपस्थित होत आहे.

तालुक्यातील लाभार्थ्यांची सध्याची अवस्था पाहता,आणि पावसाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके तत्काळ देण्यात यावे,करीता अखिल भारतीय सरपंच परिषदचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना निवेदन दिले. 

निवेदनावर अध्यक्ष अविनाश लांबट, सुरेश लांडे, मालाताई गौरकार, राहुल आत्राम, नंदाताई मेश्राम, चंदू जवादे, प्रवीण नान्हे, श्रीकांत गौरकार, ललिता गौरकार, प्रशांत भंडारी,दिलीप आत्राम, शशिकांत तावाडे, गोवर्धन तोडासे, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर,रुपेश ढोके, गणेश लांडे, सदाशिव मेश्राम सह सर्व सरपंच उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.