देशात हुकूमशाहीचा उदय झाल्याने येत्या निवडणुकीत हुकूमशाह भाजपला पराजित करणे काळाची गरज- कॉ. उदयन शर्मा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉ. शंकरराव दानव यांचे अकस्मात निधनानंतर पक्षाची पहिली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित बैठक वणी येथे दि. ७ फेब्रु. ला घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला आलेले पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. उदयन शर्मा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी देशातील परिस्थितीवर बोलताना सांगितले की, देशात संविधनिक व्यवस्थेला बाजूला सारून भाजपच केंद्र सरकारने सर्वच घटनात्मक संस्थेला भाजपमय केले असून ईडी, निवडणूक आयोग, सीबीआय, न्यायालय व संसद ह्याचा वापर आपल्या इशाऱ्यावर करून लोकशाही समर्थकांना तसेच विरोधकांना संपविण्याचा घाट रचला आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, इडीचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातो आहे तर न्यायालयात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असून सर्वोच्च न्यायालय ऐकून घ्यायला तयार नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे खाच्चिकरण करण्यासाठी व आपला हस्तक नियुक्त करण्यासाठी नियुक्तीची पद्धत बदलवून टाकली आहे. सरकार, त्यांचे मंत्री व एक विरोधी पक्ष नेता ही पद्धत अवलंबित आहे. आधी मंत्र्यांचा जागेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे होते. त्यामुळे निवडणूक आयुक्त मनमर्जिने नाहीतर प्रक्रियेतून बनविल्या जात असे. त्याचप्रमाणे सत्यता लपविण्यासाठी लोकशाहीचा चौथ्या स्थंभाला गोदी मीडिया करून टाकले आहे. शेतकऱ्यांचा विरोधात काळे कायदे करणे, कामगार कायदे रद्द करून मालक धार्जिणे नवीन चार संहिता आणणे, संसदेमध्ये विरोधकांना बोलू न देणे, विरोधकांना संसदेतून निलंबित करणे, २-२ मिनिटात जनविरोधी कायदे पास करणे, आयपिसी, सी आर पी सी, एविडन्स ॲक्टचा जागेवर नवीन कायदे आणणे, दंडा मध्ये भरमसाठ वाढ करणे हे सर्व देशात हुकूमशाही सुरू झाल्याचे लक्षण आहे. 
त्याचप्रमाणे सर्वच जन कल्याण योजनांना कात्री लावून मूठभर भांडवलदारांना सर्व सवलती देऊन त्यांची कर्जे माफ करणे ह्यामुळे देशात अब्जाधीशांचा संपत्तीत वाढ झाली असून १ टक्के श्रीमंतांचा ७३ टक्के साधनांवर कब्जा झाला आहे. तर दुसरीकडे देशात प्रचंड गरिबी, भुखमरी, वाढली असून ८० कोटी लोकांना मोफतचा रेशनवर जगावे लागत आहे. असे प्रतिपादन करीत कॉ. शर्मा यांनी देशातील भाजप सरकारची हुकूमशाही संपवायची असेल तर येत्या लोकसभेचा निवडणुकीत भाजपचा पराजय करून मोदी सरकारचा पायउतार करणे आवश्यक आहे व त्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे असे आवाहन केले.

ह्या विशेष विस्तारित बैठकीत कॉ. शंकरराव दानव यांची २१ फेब्रुवारीला सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेणे, जिल्ह्यात अस्थिकलश यात्रा काढणे व वणी येथे कॉ. शंकरराव दानव भवन चे निर्माण करणे आदी निर्णय घेण्यात आले. 

या विशेष विस्तारित बैठकीचे अध्यक्ष स्थानी कॉ. डी.बी.नाईक हे होते. कॉ. उदयन शर्मा व्यतिरिक्त जिल्हा सचिव कुमार मोहरमपुरी, एड. दिलीप परचाके, माजी जि.प. सदस्य देविदास मोहकर, अनिता खुनकर, मनीष इसाळकर, चंद्रशेखर सिडाम, रमेश सोनुले, मनोज काळे आदींनी विचार मांडले. यावेळेस कलावती शंकरराव दानव, सरिता दानव, सदाशिव आत्राम,निरंजन बोधलकर, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, सुधाकर सोनटक्के, नंदू बोबडे, शंकर गाउत्रे, अरुण चिंचोलकर, संदीप मोहुरे, संजय वालकोंडे ,एकनाथ नालमवार, संदीप सुरपाम, धावस, राजमल घोसले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

खाटेवर असलेल्या पेन्शन धारकांच्या नातेवाईकांना बँकेने लावले धुडकावून



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील कालिंदा दिगांबर नारेकर (वय 84) प्रभाग क्र. सहा, रहिवाशी असून ह्या गेल्या चार ते पाच वर्षांपासून अंथरुणावर आहे. त्यामुळे त्या बँकेत जाऊ शकत नाही, जेष्ठ नागरिक असल्यामुळे व त्या खाटेवर असल्याने पेन्शन धारकाच्या नातेवाईकांनी पेन्शनर धारकांचे मेडिकल सर्टिफिकेट संबंधित बँकेला सादर केले असताना देखील सेंट्रल बँकेतील अधिकारी अरेरावी ची भाषा करून पेन्शन धारकांच्या त्या नातेवाईकाला अपशब्द बोलून पेन्शन रोखण्यात आले अशा आशयचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

शहरातील श्रीमती कालिंदा नारेकर ह्या 84 वर्षाच्या असून आज त्या खाटेवर आहे, त्यांची संडास व लघुशंका जागेवर आहे. पाय सुजलेले आहे. डॉक्टरच्या मेडिकल प्रिस्कीप्शन त्याच प्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट नुसार ती कुठेही जाऊ शकत नाही अथवा चालू शकत नाही असे त्यांचे जावई श्रीकांत तांबेकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

जेष्ठ नागरिक असल्यामुळे हा अत्यन्त गंभीर व जिव्हाळ्याचा विषय असताना सेंट्रल बँकेतील मॅनेजरने सादर केलेल्या माहिती किंबहुना सर्टिफिकेट ला धुळकवून लावत याचा काही उपयोग नाही अशा शब्दात माघारी पाठविले. त्यांना बँकेत उचलून आणा, तुम्ही जास्त बोलू नका मि पोलिसांना बोलावेल अशी धमकी दिल्याची श्रीकांत तांबेकर यांची तक्रार आहे. पुढं असंही म्हटलं आहे की पेन्शनर च्या नातेवाईकांना मानसिक त्रास देण्याचं काम करित आहे. पेन्शनरला पाहण्यासाठी अथवा जीवित अथवा मृत आहे किंवा नाही, हे संबंधित बँकेतील अधिकारी वा कर्मचारी त्या पेन्शनरच्या घरी जाऊन पाहणं चौकशी करणे क्रमपात्र असताना सुद्धा आम्ही कर्मचारी पाठवू शकत नाही, अशी उद्धट भाषा वापरून त्यांना बँकेतून हाकलून लावले असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे सन्माननीय तहसीलदार साहेब आपण त्यांना आमच्या व्यथा त्यांच्या पर्यंत पोहोचवून आम्हांला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी त्यांची आहे. अन्यथा संबंधित बँकेच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असे पेन्शनर ह्यांचे जावई श्रीकांत तांबेकर यांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना सांगितले.

तृणधान्याचे जाणू महत्त्व… मिळेल त्यातून जीवनसत्व

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

तृणधान्याच्या सेवनामुळे शरीरपोषणासाठी कमी खर्चात अधिक प्रमाणात उर्जा तृणधान्यांतून मिळतात. तंतुमय पदार्थाव्यतिरिक्त तृणधान्ये ही खनिजे, बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत. तृणधान्याच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते. तृणधान्ये ही आरोग्याला चालना देणाऱ्या फायटोकेमिकल्स, फिनोलिक संयुगे, टॅनिन यांसारख्या घटकांनी समृद्ध असून त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2021 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तृणधान्यांमुळे टाईप 2 च्या मधुमेहाचा धोका कमी होण्यास व मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये एचबीए 1 सी चे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

तृणधान्ये पचनक्रिया सुधारण्यास मदत

तृणधान्ये आपल्याला पोषणविषयक सुरक्षा पुरवितात. तृणधान्ये ही तंतुमय पदार्थानी समृध्द असलेली धान्य असून ती मानवी आतड्यामधील सूक्ष्म जीवसमूहासाठी चांगले जीवाणू म्हणून कार्य करतात, तृणधान्यांतील तंतुमय पदार्थ स्थूलांत्रे सजल ठेवतात आणि चयापचय क्रिया अतिशय चांगल्या स्थितीत ठेवतात. अशा प्रकारे तृणधान्य ही पचनविषयक आरोग्य चांगले ठेवण्यात योगदान देतात व आतड्यातील हालचाली नियमीत ठेवण्यास मदत करतात.

रागी किंवा नाचणी (फिंगर मिलेट)

रागी किंवा नाचणी ‘आफ्रिकन बाजरी’या नावानेही ओळखली जाते. नाचणी हे सर्वाधिक पोषक तृणधान्य मानले जाते. प्रथिने, तंतुमय घटक व खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व पोटॅशियम असते नाचणीमध्ये असलेल्या कमी ग्लायसेमिक संवेदनशीलतेमुळे नाचणीयुक्त आहारामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. रक्तदाब, यकृताचे विकार व दमा आजराच्यावेळी तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नाचणीयुक्त आहार घेण्याची शिफारस करण्यात येते. नैसर्गिक लोह भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या सेवनामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

वरई (प्रोसो मिलेट)

प्रोसो मिलेट पॅनिकम मिलिसेम, चायनीज मिलेट, वऱ्याचे तांदूळ, वरी व हिंदीत चिन आदी नावाने ओळखले जाते. खनिजे, पचनशील तंतुमय घटक, पॉलिफिनॉल्स, जीवनसत्वे (विटॅामिन) व प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी ते बहुगुणी ठरते. ग्लुटेनयुक्त आहाराचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. वरईमध्ये उच्च पातळीचे लेक्टिनिन असते त्यामुळे मेंदू विषयक आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते. याचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असून टाईप 2 मधुमेह असलेल्या मधुमेहींसाठी उत्तम अन्न ठरते.

कांगणी किंवा राळ फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका)

फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका) ही मराठीमध्ये कंगणी किंवा राळ या नावाने ज्ञात असून ग्लुटेनमुक्त धान्य आहे, ज्यात तंतुमय पदार्थ, प्रथिने व खनिजे अधिक प्रमाणात असतात. थियामिन, नियासिन व जीवनसत्व बी-6 आणि मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजांचा समावेश असलेला उत्तम स्त्रोत आहे. कमी शर्करा असलेले अन्न असल्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण वाढत नाही. ऑक्सिडीकरण रोधी पदार्थांचा देखील चांगला स्त्रोत असून त्यामुळे आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते.

भगर-बानयार्ड मिलेटस (इथिनोक्लोआ एस्कुलेंटा किंवा जापानी तृणधान्य)

भगर हे एक बहुउद्देशीय पिक असून खाद्यान्न व चारा या दोन्हीसाठी त्याची लागवड केली जाते. त्याचे हिंदीमधील सर्वसाधारण नाव सावा व मराठीतील नाव शामुळ आहे. तृणधान्यात प्रथिने, पाचक तंतू, आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. मॅग्नेशियम, पोटॅशियम व जस्त यासारख्या खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थाची संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते.

सामा किंवा कोराळे-(ब्राऊन टॉप) (उरांचोला रॅमोस एल)

सामा किंवा कोराळे हे थायमिन, नियासिन व जीवनसत्व बी-6 चा उत्तम स्त्रोत आहे. दुय्यम पदार्थ म्हणून शिजविता येऊ शकत, वाढता येते, सुप किंवा स्ट्यूमध्ये तसेच पीठात देखील मिसळता येते. पाव, पॅनकेका किंवा इतर भाजलेल्या पदार्थात वापरता येते.

कोद्रा-(ब्राऊन टॉप)

कोद्रा तृणधान्यात सुमारे 11 टक्के प्रथिने आहेत, आणि प्रथिनांचे पौष्टिकमुल्य फॉक्सटेल बाजरीपेक्षा किंचित चांगले असल्याचे आढळले आहे, परंतु इतर लहान बाजरींच्या तुलनेत ते जास्त आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान

पौष्टीक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला प्रोत्साहन आणि तृणधान्याच्या महत्वाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणीत बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मुलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषी औजारांचे वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन होत आहे. जिल्हास्तरीय कार्यशाळांद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढ व आहारातील वापर वाढ यासाठी विविध उपक्रम राबविण्याकरीता 110 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी पौष्टिक आहार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ असे दोन्ही फायदे असल्याने हे अभियान उपयुक्त ठरणारे आहे.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

मारेगाव येथे महिला संमेलनाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतून साकार होऊन दिनांक 6/2/2024 ला मारेगाव येथील जेष्ठ नागरिक सभागृहामध्ये महिला संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट होते, उद्घाटक सौ. ललिताताई संजीव रेड्डी बोदकुरवार होत्या, या कार्यक्रमांमध्ये उखाणे स्पर्धा, गायन स्पर्धा, उलटी गिनती स्पर्धा तसेच महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शालिनीताई दारुंडे यांनी केले, या कार्यक्रमाला उपस्थिती प्रशांत नांदे, दत्तू लाडसे, सुशीला भादीकर, सुनिता लालसरे, सुनीता जुमनाके, शेख अंजुम, छाया कनाके, माया बदकी तसेच मंदाताई जांभूळकर व इतर मान्यवर महिलांची होती.
कार्यक्रमाचे आयोजन शालिनीताई दारुंडे आणि मालाताई गौरकार यांनी केले आहे. संमेलन समारोपीय भाषण सौ. मालाताई गोरकार यांनी केले असून या संमेलन कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करुन तपास कामाला सुरवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी, पुणे यांनी दि. ७ फेब्रवारी २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार चोरीस गेलेले एक कंट्रोल युनिट पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले आहे. दोन संशयित भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस ता.पुरंदर, जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४.११.२०२३ रोजीच्या पत्रातील निर्देशांनुसार राज्यात दि.१०.१२.२०२३ ते दि.२८.०२.२०२४ या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो.

या घटनेबाबत राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक 6 फेब्रुवारी 2024 रोजी घेऊन सुरु असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले.