महसूल विभागाची धडक कारवाई : कोसारा परिसरात अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तर एक वाहन घेऊन फरार...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. या जप्ती च्या कारवाई ने रेती तस्करांचे धाबे चांगलेच दनाणले असून ही पावरफूल कारवाई तहसीलदार निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गुघाने (मंडळ अधिकारी), तलाठी शैलेंद्र कुमार शिंगणे, विवेश सोयाम, सनदेवल कुळमेथे या महसूल टीम ने केली. दरम्यान,अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करीत असताना एक चालक वाहन घेऊन फरार झाल्याचे समजते.

मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटावरून रेतीची तस्करी नित्याचिक झाली आहे तरी, तहसीलदार निलावाड कार्यालयात रुजू झाल्यापासून रेती तस्करी वर काही प्रमाणात आळा घातला गेला असला तरी,रेती तस्कर महसूल विभागाच्या प्रत्येक हालचाली वर कटाक्षाने लक्ष ठेऊन आपले हित साधत असतात. परंतु महसूल प्रशासन हे सुद्धा या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रात्रंदिवस एक करित आहे, त्याची प्रचिती काल बुधवार च्या सायंकाळी सहा वाजता सोईट (ता. वरोरा) ते कोसारा रोडवरील कोसारा गावा लगत अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेले रेतीचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकानी पकडले. व दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
मारेगाव तालुक्यात हर्रास नसताना चांद रात्रीस मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून, यात लाखों रुपयाचा महसूल रेती तस्करांकाकडून शासनाला चुना लावला जात आहे. यात काही राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश आहे.

परिणामी, रेती तस्करांच्या अफलातून मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभागाने तस्करावर आळा घालण्यासाठी कंबर कसली असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार निलावाड, मंडळ अधिकारी घुगाने, तलाठी कुळमेथे, तलाठी शिंगणे, तलाठी सोयाम व ड्रायवर विजय हे सातत्याने प्रयत्न करित आहेत. 

विभागीय बालपरिषदेत मूर्ती शाळेच्या शिरपेचात दुहेरी मुकुट !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर, नाशिक व अमरावती या तिन्ही विभागातील सर्व जिल्ह्यातील तंबाखू विरोधी यंग लिडर्स विद्यार्थ्यांकरीता दि. ३० जानेवारी २०२४ ला आयोजित विभागीय ऑनलाईन बालपरिषद २०२४ मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती, केंद्र नलफडी, पं. स. राजुरा येथील विषय शिक्षक मनीष अशोकराव मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अस्मिता शिवाजी डाखरे, वर्ग ८ वा या विद्यार्थीनीने मा. श्री राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम यांच्या सोबत प्रश्नोत्तरे रूपात संवाद साधला. तर या बालपरिषदेचे संयुक्त सुत्रसंचलन मूर्ती येथील विषय शिक्षक श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांनी केले. 

     बालपरिषद म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ. त्यात अस्मिताने सर्वप्रथम सादर केलेल्या तंबाखू विरोधी जनजागृती कार्याचे वाशिम जिल्हा शिक्षणाधिकारी मा. राजेंद्र शिंदे यांनी खूप कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आणि त्यानंतर अस्मिताने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर व सकारात्मक उत्तर त्यांनी दिले. 
       नागपूर, नाशिक व अमरावती या तीनही विभागातील सर्व जिल्ह्यातील यंग लिडर्स विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी बालपरिषदेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्री.राजेंद्र शिंदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा वाशिम , मा. श्री. श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कारंजा लाड, जिल्हा वाशिम, मा. डॉ मनीष बत्रा , दंत शल्य चिकित्सक, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, जिल्हा भंडारा, मा. डॉ शैलेश कुकडे कार्यक्रम व्यवस्थापक NTCP, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा भंडारा, मा. श्री. रामदास आर. धनगर, मुख्य संपादक वत्सगुल्मा मीडिया नेटवर्क, जिल्हा वार्ताहर
D.D.News व हितवाद हे उपस्थित होते.

      या विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी कु. अस्मिता शिवाजी डाखरे, हिच्यासह मूर्ती शाळेतील कुंदन शालिक लांडे, वर्ग सातवा, कु. तेजस्विनी रोशन ताकसांडे, वर्ग आठवा, कु. जानवी सुरेंद्र वडस्कर, वर्ग सातवा, श्रीजल रमेश शेरकी, वर्ग सातवा असे एकूण पाच विद्यार्थीगण व मार्गदर्शक शिक्षक मनीष मंगरूळकर यांनी मागील तीन महिन्यांपासून बालपरिषदेचे संपूर्ण ११ ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण केले. शाळा व गाव स्तरावर अतिशय प्रभावीपणे तंबाखू विरोधी जनजागृती केली. त्यामुळेच कु.अस्मिता शिवाजी डाखरे व श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांची निवड विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी करण्यात आली. आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याबद्दल मूर्ती येथील या विद्यार्थी यंग लिडर्सचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

     *विभागीय ऑनलाईन बालपरिषदेतील आत्मविश्वासपूर्ण सक्रिय सहभागाबद्दल तसेच मूर्ती शाळेचे नाव विभागीय पातळीवर उंचावल्याबद्दल कु. अस्मिता शिवाजी डाखरे व मनीष अशोकराव मंगरूळकर सर यांचे अभिनंदन करून हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी राजुरा, गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी राजुरा, नामदेव बावणे केंद्रप्रमुख केंद्र नलफडी, धनराज रामटेके सरपंच मूर्ती, मिथुन मंदे , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, महेश शेंडे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद संजय बोबाटे, दयानंद पवार, अमोल बल्लावार आणि गावकरी* यांनी आवर्जून कौतुक व अभिनंदन केले आहे

श्रमिकांच्या आवाज हरपला, कॉ. शंकरराव दानव यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, शेतकरी, कामगारांचे आवाज असलेले, त्यांचे साठी सातत्याने आंदोलन करणारे कॉ. शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेला संघर्ष संपला. आज पहाटे ६ वाजता मृत्यूने त्यांना कवटाळले व ते आपल्यातून निघून गेले. कॉ. शंकरराव ह्यांना दि. २७ जानेवारी लां त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांचे चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ४ दिवस त्यांचा मृत्यूशी झुंज होती. त्यांचे अवेळी निघून जाण्याने पक्ष व कार्यकर्त्यांवर खूप मोठी दुःखाचे आभाळ कोसळली आहे.  

कॉ. शंकरराव दानव हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील संस्थापक सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जनतेचा प्रत्येक समस्येशी असलेल्या संघटना त्यांनी उभारल्या होत्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते वयाचा १५ व्य वर्षी पासून ते आज शेवटचा घटका पर्यंत ते कार्यरत होते. दवाखान्यात त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी ताबडतोब मला येथून घेऊन चला, मला यवतमाळ जायचे आहे, तिथे महिलांचा संघर्ष सुरू आहे, मला तिथे जायचे आहे, असे त्यांचे वाक्य होते. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांना पुन्हा एकदा झटका आला व ते कोमात गेले. त्यानंतर ते कोमातून परत आलेच नाहीत.

कॉ. शंकरराव दानव ह्यांनी विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, फेरी, कोळसा कामगार, नगर परिषद कर्मचारी, जिनिंग प्रेस कामगार, चुनाभट्टी कामगार, चुना दगड कामगार, आशा व गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका अश्या कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करीत होते. त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन जमीन कसनाऱ्यांना त्यांना हक्काची जमीन मिळवून दिली तर अनेकांना ती मिळवून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरू होता. 

कॉ. शंकरराव ह्यांचा जन्म १९४८ ल एका गरीब कुटुंबात झाला. त्यांची संपूर्ण हयात गरिबीत गेली. पक्ष व जनतेचा कार्यात ते एवढे गुंग असायचे की सायंकाळी त्यांचा घरी स्वयंपाक शिजेल की नाही ह्याची सुद्धा शाश्वती नसायची. मोठ्या कठीण अवस्थेत त्यांचा परिवार जगत होता. शेवटी फार कमी वयात त्यांचा मोठा मुलगा राहुल ने परिवाराची जिम्मेदारी निभावली. परंतु कॉ. शंकरराव हे सातत्याने खेड्यापाड्यात पायदळ तर कधी सायकलने फिरत राहिले. दलीत, आदिवासी, शेतमजूर ह्यांचे संघटन बांधत राहिले, त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला.

कॉ. शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते ज्यामध्ये. कॉ.ए. बी. बर्धन, वासुदेव आचार्य, बी. टि. रणदिवे, वृंदा करात, डॉ.अशोक ढवळे अशा कितीतरी नेत्यांसमावेत खांद्याला खांदा लावून काम करीत राहिले. ते अनेक आघाड्यांवर काम करीत असल्याने त्यांना सगळीकडे बहुमान होता. त्यांचा कडे संघर्षाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी ऐकून घेतल्या जात होते. अश्या ह्या पुढाऱ्यांचे अवेळी एकाएकी निघून जाणे पक्ष, जन आघाड्या व कार्यकर्त्यांना खूप मोठी हानी झालेली आहे. त्यांचा जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत, एवढे मात्र नक्की!

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आज यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन 1995 पासून सुरुवात झाली. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य –चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी अनेक चित्रपटातून रसिकांना खळखळून हसायला लावले. त्याचबरोबर, संवेदनशीलतेने भूमिका साकारताना रसिकांच्या आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभिनयाचे गारुड मराठी चित्रपटरसिकांवर आजही कायम आहे.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या चित्रपटसृष्टीत परिचित आहेत. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाने त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. व्यावसायिक नाटकापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन अशा चित्रपटांतून विविध रंगी भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात स्वताचे स्थान निर्माण केले. स्वताचे कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव राज्य शासनाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करुन केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. शशिकला वंजारी, अॅड. उज्वल निकम आणि समितीचे सदस्य सचिव बिभीषण चवरे यांचा समावेश होता.


पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या - शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वर्धा नदीच्या काठा जवळील शिवणी (धोबे) या गावाला पुराचा दरवर्षी तडाखा मोठ्या प्रमाणात बसत असतो.या तडाख्यामुळे दरवर्षी अनेक घरांची परझड, नुकसान होत आहे. त्यामुळे पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या अशी मागणी शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची आहे.

तालुक्यातील शिवणी धोबे येथे आता मोदी आवास योजनेचे 33 घराचे उदिष्ट ग्रामपंचायतला आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायतने 33 जणांची लिस्ट बनवुन ग्रामपंचायत ठराव सादर करण्यात आला होता. परंतु तक्रारीअंती चौकशी अंतर्गत त्यातील 14 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले. अशी तक्रार आज मंगळवारला पंचायत समिती कार्यालयाला देण्यात आली.

विशेष म्हणजे शिवणी धोबे हे गाव वर्धा नदीच्या तिरावर असुन पावसाळ्यामध्ये पुर्ण गाव पाण्याखाली येत असते, त्यामुळे येथील पूरग्रस्त लोकांनी विटा,सिमेंट व छतावर टिनपत्रे व कवेलु टाकुन तात्पुरती राहण्याची आपापल्या व्यवस्था केली आहे. मात्र,त्या घरांना पक्के घर असे संबोधू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तूर्तास अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना ग्राम.पं. ने दिलेल्या ठरावानुसार मोदी आवास योजनेत समाविष्ट करून पुरग्रस्त त्या अपात्र लोकांना लाभ देण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी गावातील सरपंच निलेश रासेकर, रमेश ढोके, ज्ञानेश्वर धोबे तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांचे सह शिवणी धोबे येथील लाभार्थी उपस्थित होते.