मारेगाव: पुन्हा कोळशाचा खुलेआम चोर बाजार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात वर्धा नदीच्या अलीकडे, कोसारा-खैरी मार्गांवर अवैध कोळशाचा चोर बाजार राजरोसपणे सुरु असून निडरपणे तस्कराकडून हा व्यवसाय जोमात आहे. हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही की 'कोयले के दलाली में इनके भी हात काले' तो नही ना अशी अर्थपूर्ण शंका निर्माण होणे सहाजिक आहे. ह्या संदर्भात नानाविध ई-पेपर आणि माध्यमातून बातम्या प्रकाशित होऊनही पोलीस प्रशासनाला जाग का? येत नाही हा संशोधनाचा विषय आहे. शासकीय मालमत्तेची अशी खुलेआम तस्करी करून शासनाच्या महसूलला चुना लावून काही मातब्बर स्वतःचा गल्ला भरत असल्याची चर्चा परिसरात रंगतांना दिसत आहे. 

मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकावरील कोसारा ते माढेळी मार्ग तसा अवैध तस्करीसाठी कुपरिचित आहेच. वर्धा नदी काठाजवळच वरोरा मार्गे येणाऱ्या कोलवाहू ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन काही मूठभर मंडळी गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे. एवढी हिंम्मत करतांना नक्कीच प्रशासनाचं पाठबळ आहे, अन्यथा ही हिम्मत सहजसोपी नाही. ह्या समस्येच्या मुळापर्यंत जावून कारवाई होईल का? की मुळापर्यंत जाण्याची इच्छाच नाही, यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश येईल का? ह्या आशेने सामान्याच्या नजरा खिळलेल्या आहे.

कोल बाजार, खैरी मार्गाने जाताना कोसारा गावाच्या अगदी वर्धा नदीच्या अलीकडेच काही अंतरावर हा चोर बाजार असून मोठया प्रमाणात खुलेआम तस्करी केली जात आहे. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोर बाजारात वणी, एकोणा क्षेत्रातील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री करिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेरफेर केली जाते. ह्या अवैध वाहन चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल चोर बाजारावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही - विजय अवताडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राष्ट्रसंताचे नुसते भजन गाऊन चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावे लागणार आहे. राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही, असे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा ग्राम. सदस्य विजय अवताडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळ्यात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे, उदघाटक विजयाताई देहकर, प्रमुख पाहुणे श्री गंगाधर लोणसावळे महाराज, श्री विलासराव गोडे (सेवा अधिकारी केळापूर), श्री. प्रभाकर ठाकरे, श्री. झिबल भोयर, श्री.राजू सिडाम (ता. प्र. प्र.), श्री.सुभाष सप्रे (म. प्र.), श्री.कैलास बोन्डे, श्री.मनोहर वांढरे, श्री.देहाराज अडबाले, कुमार अमोल कुमरे (पत्रकार), श्री.मारोती उरकुडे (माजी सेवा अधिकारी), श्री. सुधाकर धानोरकर (म.प्र.), उमेश चव्हाण (गु. से. भ. मं वसंतनगर अध्यक्ष), आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.अवताडे म्हणाले की, संतांनी कधी जातपात मानला नाही, अखिल भारतीय मानव कल्याण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अवतरले. "याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा" आपल्याला ह्याच नरजन्मात सगळं भोगायचं आहे. आपण या 55 वा पुण्य सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमलो आणि संताच्या विशाल विचारांचा प्रचार व प्रसार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्या हातून घडत आहे,वसंत नगरवासी भाग्यवान आहेत आणि हेच वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यसनमुक्ती, स्पर्धा परीक्षा, आधुनिक साधन (मोबाईल), इव्हीएम मशीन (EVM), हुंडा प्रथा, शेतकऱ्यांची पिळवणूक, अशा अनेक सामाजिक विषयावर भाष्य केले. तसेच विचार पिठावर असलेल्या इतर मान्यवरांनीही आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व उत्तम आरोग्यासाठी राष्ट्रसंताकडे प्रार्थना केली. 
वसंत नगर येथील शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन दि.29 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5. वाजता घटस्थापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6. वाजता श्री. सुधाकर धानोरकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायंकाळी 8. वाजता हपभ डॉ. गजानन महाराज सुरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवार दि.30 डिसेंबर 2023 ला पहाटे 5. वाजता ध्यान प्रार्थना, सकाळी 6. वाजता ग्रामसफाई, हपभ ज्ञानेश्वर ढप्पर महाराज यांचे सकाळी 9.वाजता काल्याचे किर्तन, त्यानंतर भव्य दिंडी मिरवणूक, कार्यकर्ता संमेलन, लगेचच महाप्रसाद चा कार्यक्रम, रात्री भजन संमेलन संपल्यानंतर राष्ट्र वंदनेने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आत्राम यांनी केले. तर उमेश चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, महिला मंडळ तथा समस्त वसंत नगर ग्रामवासी यांनी केले असून या पुण्यस्मरण सोहळ्याला जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातील आमंत्रित सर्व उपासक, उपासिका तथा सर्व गुरुदेव प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 

मारेगाव महसूल विभागाची धडक कारवाई, रेती तस्करी करणारा हायवा मध्यरात्री जप्त



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात चोरट्या मार्गाने रेती तस्करांचा उच्छाद कायम असून, महसूल विभाग ऍक्शन मोडवर असतांना शनिवारीच्या मध्यरात्री आणखी छापा टाकण्यात आला. ते चारचाकी वाहन दांडात्मक कारवाई साठी जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 
मारेगाव तालुक्यातील रेती तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. हे तस्कर संबंधित अधिकारी कधी कुठे जातात येतात, याची खबर घेत आपले हित साध्य करीत असतात. मात्र, यावेळी त्यांचा डाव फसला आणि कोसारा घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा वाहन क्र. (MH-32 AK-4446) कुंभा येथे महसूल विभागाच्या गळाला लागला. 
ही कारवाई शनिवारच्या मध्यरात्री केली असून, हायवा दांडात्मक कारवाई साठी तहसील कार्यालयात जमा केला. एवढ्या मोठ्या वाहनावर तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. 
तहसीलदार उत्तम निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी कुडमेथे, सोयाम, कोतवाल गायकवाड, कोयचाडे यांनी ही कारवाई केली.

संजय देरकर यांच्या नेतृत्वात वेकोली वाहन चालकाच्या समस्या निकाली


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी नार्थ क्षेत्रामध्ये वेकोली च्या माध्यमातून टेंडर (निविदा) काढून खाजगी कंपनीना टेंडर देण्यात येते, वेकोली व खाजगी मालकाच्या संयुक्तरित्या कामकाज चालवतात. त्याच आधारावर वाहक भरती केल्या जाते. मात्र, ठेकेदारी पद्धतीने टेंडर मालक, खाजगी वाहन चालक शासकीय नियम धाब्यावर ठेवून वाहन चालकाची शारीरिक व मानसिक व आर्थिक पिळवणूक करतात. ह्या विरोधात एकता असोसिएशन मोटार वाहन मदतनीस वेलफेयर तर्फे दिनांक 28 डिसेंबर ला क्षेत्रीय प्रबंधक वेकोली वणी नॉर्थ व सर्व ट्रॅव्हल्स एजेन्सी च्या विरोधात कामबंध आंदोलन करण्यात आले.
त्याठिकाणी वाहनचालकांच्या नैतिक मागण्या प्रशासना समक्ष ठेवण्यात आल्या,त्यामधते प्रामुख्याने पूर्ण मागण्या अवघ्या दोन ते तीन तासात मान्य केल्या त्या पुढील प्रमाणे, 1) वाहन चालक यांना NIT च्या तत्वावर वाहन चालवीत फक्त 8/12 करण्यात येणार. 2) वर्क ऑर्डर प्रमाणे जे मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येईल. 3) मासिक वेतन प्रति महिना 10 तारखेलाच देण्यात येणार. 4) 26 दिवसाचे काम करण्यात येणार व मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येणार. 5) पि. एफ. व पगार पत्र प्रत्येक महिण्यात लिखित स्वरूपात देण्यात येणार. 
ह्या सर्व मागण्याबैठकी अंती वेकोली व ट्रॅव्हल्स एजन्सी मार्फत लेखी आश्वासन देऊन काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय देरकर, वेकोली क्षेत्रीय प्रबंधक यु. सी. गुप्ताजी, उदय कुमार नोडल अधिकारी वणी नॉर्थ, संजय देठे, डॉ.जगन जुनघरी, वसंता डुकरे, फैजल बशीर खान, प्रवीण खानझोडे यासह संघटनेचे पदाधिकारी विजय सिंग, आकाश गौतम, राकेश वरारकर, रजिक शेख, जतींदर सिंग, राजू चिंचोलकर, फारुख पठाण, राजू यादव, चंदन हिकरे, प्रशांत मिलमीले, विलास मंदे, विशाल राऊत, नवरतन भावरकर व शेकडो वाहन चालक तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

नॉन पेसा क्षेत्रातील १५९ पदांसाठी पदभरती करणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठी जाहिराती ११.०८.२०२३ ते १४.०८.२०२३ या कालावधीत विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १४.०९.२०२३ ते ०३.१०.२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असल्याचे श्री.दिवेकर यांनी सांगितले.

कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यशावकाश आय.बी.पी.एस. संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही सहसंचालक श्री. दिवेकर यांनी म्हटले आहे.