मोदी आवास घरकुल योजना


सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.

शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते.

यामुळे राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

अशी आहे योजना

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटीक सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल.

इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येवून लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करुन घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.

अशी असेल लाभार्थी पात्रता

• लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.

• लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.

• लाथार्थ्यांचे वार्षिंक उत्पन्न रु.1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.

• लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

• लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.

• लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

• एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

• लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड, स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड लाभार्थींच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

प्राधान्यक्षेत्र लाभार्थींची यादी करतांना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख, पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरीता राखीव ठेवणे आवयश्क आहे. इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

घरकुल योजनेंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल 1.30 लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल 1.20 लक्ष अर्थसहाय्य देय राहील. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान 90/95 दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले 12 हजार प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल. इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वत:ची जागा उपलब्ध नाही. असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत 500 चौ.फुट जागेपर्यत 50 हजार पर्यंत अनुदान देय राहील. तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.

-संदीप गावीत,
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी दिली.

शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित 'दिव्यांगांच्या दारी अभियानात' मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आणि दु:ख आहे, असे सांगून श्री. कडू म्हणाले, या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र ऐवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. दिव्यांगांच्या घरापर्यंत योजना कशा पोहाेचविता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे श्री. कडू म्हणाले, घरकूल, अंत्योदय, शौचालय या योजनांसोबतच येत्या दोन-तीन महिन्यात दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील. ग्रामीण स्तरावर काम करणारे ग्रामसेवक, कोतवाल, तलाठी, कृषी सहायक, रोजगार सहायक आदींनी या योजनांबाबत दिव्यांग बांधवांना अवगत करावे. केवळ शासन निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम करा. दिव्यांग तसेच निराधारांना 1500 रुपये महिना दिला जातो. मात्र कधीकधी चार-चार महिने पैसे मिळत नाही, त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करावी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने विशेष अभियान राबविले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदनही यावेळी बच्चू कडू यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन म्हणाले, विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे यासाठी दिव्यांगांना फिरावे लागते. सर्व लाभ एकत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या सरासरी तीन ते पाच टक्के दिव्यांग असतात. आपल्या जिल्ह्यात दिव्यांगांची नोंदणी कमी आहे, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. मात्र जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबवून दिव्यांगाची नोंदणी केली जाईल. दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्यात हा अभिनव प्रयोग फक्त चंद्रपूर जिल्ह्यानेच केला असल्याचे श्री. जॉन्सन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. सुभाष पवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 13 हजार दिव्यांगांची नोंदणी आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका प्रशासन, सामाजिक न्याय, समाजकल्याण विभाग तसेच विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात व लाभसुध्दा दिला जातो. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी 12 शाळा असून त्यात 650 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तसेच येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी सिध्दार्थ टिपले यांना झेरॉक्स मशीन, सुनील गांगरेड्डीवार यांना मोटरपंप, फरान शेख, अर्णव अलोणे यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग उद्योजकांचा सत्कारसुध्दा करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगासाठी असलेल्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच येथे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची बच्चू कडू यांनी पाहणी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ब्रेल लिपीचे जनक ग्रॅहम बेल आणि डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आनंदवन वरोरा येथील संधी निकेतन अपंगांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, सहाय्यक पांडूरंग माचेवाड यांच्यासह दिव्यांग प्रतिनिधी नीलेश पाझारे व इतर बांधव उपस्थित होते.

तलाठी भरतीत डबल परिक्षा शुल्क जमा झाल्यास शुल्क परत मिळवण्यासाठी यादीतील उमेदवारांनी असा करावा अर्ज !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि. २६/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परिक्षेकरिता एकुण १०,४१,७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परिक्षा शुल्क जमा करणेत आलेले आहे. डबल परिक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपेकी २३,३७९ उमेदवारांचे परिक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. परंतू १,२१९ उमेदवार यांचे नाव व बैंक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने अद्यापपर्यंत त्यांचे दुबार झालेले परिक्षा शुल्क उमेदवारांना परत करता आले नाही. 
तरी ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क परत करणेचे आहे त्यांची यादी या सोबत जोडली असून यादीतील उमेदवार यांनी खालीलप्रमाणे तपशिल talathi.recruitment2023@gmail.com या ई- मेल आयडीवर तातडीने सादर करावा.

१.उमेदवारांचे नाव
२.बँकेचे नाव :        
३.बँक खाते क्र.       
४.बँकेचा IFSC Code
५.रजिस्ट्रेशन नं. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक) 
६.मोबाईल नं. 
७.ई-मेल आयडी


आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालं, व होतही आहे. विकासात्मक धोरण जोपासून वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. विकसनशील व जनहितार्थ कामे हाती घेऊन त्यांनी ती पूर्णत्वास आणली. शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही त्यांनी तेवढीच प्राथमिकता दिली. असे विकासासाठी झटणारे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव सह विविध माध्यमातून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शारीरिक व्याधी व गंभीर आजारांचं निदान लागावं म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात आली. 
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध रहावा, हा दृष्टिकोन जोपासून आमदारांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार 25 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. स्थानिक बाजोरिया लॉन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी रक्तदात्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. रक्तदात्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व एक मोठी बॅग भेट स्वरूपात देण्यात आली. रक्तदात्यांना देण्यात आलेल्या बॅगवर 55 हा दोन पंचवार्षिक विजयाच्या यशस्वी वाटचालीचा कार्यकाळ अंक स्वरूपात ठळकपणे दिसत होता. या शिबिरादरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या सेवा पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबिराच्या यशस्वीतेकरिता भाजपच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यात भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

परप्रांतीय व्यक्तीचे अपहरण: पैशाच्या मागणीसह प्राणघातक हल्ला, ५ आरोपी कोठडीत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : चक्क वाहन चालकाचे अपहरण करून त्याच्या मालकाकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. आरोपींनी किडनॅप व्यक्तीला वरोरा टोलनाक्याजवळ काही वेळाने सोडून दिल्याची घटना रविवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. त्यानंतर चालकाने पोलिसांत तक्रार केली.शिरपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत रात्री उशिरापर्यंत अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली. रहमतब शहाबुद्दीन अन्सारी, (24) रा. झारखंड, असे तक्रारदाराचे नाव आहे. 
प्रशांत बबन सत्रमवार (वय 40, रा. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती), अनिल परसराम भवरे (49), रा.रायसा (ता.घाटंजी), दत्तात्रय रघुनाथ कांबळे (48), रा. पटपांगारा(ता. घाटंजी), अनिकेत दशरथ भालेराव (24), रा. रायसा (ता. घाटंजी), विनोद आनंद गेडाम (31) गोंड मोहल्ला चंद्रपूर जिल्हा, याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमहताब शहाबुद्दीन अन्सारी (24, रा. झारखंड) हा चालक ट्रक ट्रेलर क्रमांक एमएच-16 सीव्ही-3208 ने पोकलॅन मशीन घेऊन अहमदनगरहून मोहदा येथे आला होता. मोहदा येथील गिट्टी क्रशर मालकाला पोकलेन मशीन देण्यात आली, त्यानंतर तो त्याच्या ट्रेलरने गावाकडे परत जात होता. दरम्यान, त्यांना वेळाबाई चौकाजवळ चार ते पाच जणांनी अडवून मारहाण करून त्यांचे अपहरण केले.
सर्व स्तरावरून शिरपूर पोलीसांची प्रशंसा...

अपहरणानंतर आरोपीने ट्रेलर मालकाकडे मोबाईलवरून मोठ्या रकमेची मागणी केली आणि पैसे न देता वाहन सोडून जाण्याची धमकी दिली. यावेळी वाहन वरोरा रस्त्यावरून जात होते. वरोरा रोडवरील शेंबळ टोला नाका येथे येताच आरोपींनी वाहन चालकाला सोडून तेथून पळ काढला, त्यानंतर घाबरलेल्या ट्रेलर चालकाने शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना आपली आपबीती सांगितली. घटनेची गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत आरोपींना पाटणबोरी आणि भद्रावती येथून ताब्यात घेण्यात आले. वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार संजय राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईने सर्व स्तरावरून शिरपूर पोलीसांची प्रशंसा होत आहे.