आवश्यक मूल्य जोपासली तरच खऱ्या अर्थाने विश्वाचे मार्गदर्शक ठरू शकतो - विजय गंधेवार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
       
वणी : "भारताला विश्वगुरू पदावर स्थापित करायचे असेल तर ते आर्थिक किंवा इतर माध्यमातून होणार नाही. जग भारताकडे ज्या संस्कारांसाठी पाहते ते संस्कार, ती मूल्ये आपल्या स्वतःमध्ये आणि समाजात रुजवले तरच मानवी जीवनाचा आणि समाजाचा विकास संभव आहे. आपल्या अधिकारांसोबत आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली आणि त्यासाठी आवश्यक मूल्य जोपासली तरच आपण खऱ्या अर्थाने विश्वाचे मार्गदर्शक ठरू शकतो " असे विचार श्री विजय गंधेवार यांनी व्यक्त केले.
        
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात घेण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा माझं गाव माझा वक्ता या व्याख्यान शृंखलेत "मूल्य शिक्षण काळाची गरज !"या विषयावर ते व्यक्त होत होते.

यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
मानवी जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या विविध मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करीत श्री. विजय गंधेवार यांनी अत्यंत संयत पण अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली शैलीत मानवी जीवनातील मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
      
मूल्य शिक्षणाशी संबंधित तेरा गाभा घटकांचे त्यांनी केलेले विस्तृत विवेचन सर्व श्रोत्यांच्या पसंतीचा विषय ठरले.
विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे यांना प्राप्त झालेल्या जादूभूषण पुरस्कारा निमित्त श्री अशोक सोनटक्के यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
        
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावर यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न- पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागेल त्याला फळबाग, पिक विमा 1 रुपयात, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

समता मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या आणि अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे पालकमंत्री यांनी निरिक्षण केले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा करताना राज्याने केलेली प्रगती सर्वाना आश्चर्यचकित करणारी आहे. केवळ शेजारी राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाच्या एकंदर विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिशादर्शक ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगुन शिंदे सरकारने सादर केलेल्या पहिल्याच अर्थ संकल्पात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

यामध्ये केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहिर केली आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच आता राज्य सरकार सुद्धा 6 हजार रुपये प्रती वर्ष देणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये महासन्मान निधी मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातील 3 लक्ष 52 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

त्याचबरोबर यापुढे पीक विमा योजनेसाठी शेतकरी हिस्सा शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे. याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुद्धा यापुढे विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न देता शासन स्वतः शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवित आहे. फळबाग लागवड वाढविण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर आता 'मागेल त्याला फळबाग' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी शासनाने प्रथमच सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई दिली. जिल्ह्यातील 59 हजार 689 शेतकऱ्यांना 44 कोटी 99 लक्ष 14 हजार 713 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

यासोबतच नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मे महिन्यापासून या धोरणाची राज्यात व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होऊन त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न आवाक्यात येईल.

ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार होण्यासाठी आणि प्रशासकिय सेवेत आपल्या जिल्ह्यातील मुलांची टक्केवारी वाढण्यासाठी 'गाव तिथे वाचानालय' निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 4 कोटी 50 लक्ष रुपयांना मान्यता दिली आहे. या वाचनालयात स्पर्धा परीक्षेची उत्तमोत्तम पुस्तके युवकांना गावातच उपलब्ध होतील.

केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'जल जीवन मिशन' मध्ये आपल्या जिल्हयाने उत्कृष्ट कामगिरी केली असुन आतापर्यंत 3 लक्ष 50 हजार कुटुंबाच्या घरी नळ जोडणी झाली आहे. उर्वरित 1 लक्ष 72 हजार नळ जोडण्या मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर या योजनेचा पाठपुरावा आणि नियोजन केल्यामुळे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत यवतमाळ जिल्हयाने अंत्योदय, प्राधान्य व शेतकरी अशा सर्व योजनांच्या 6 लक्ष 10 हजार 768 शिधापत्रिका धारकांच्या 22 लक्ष 77 हजार 310 लाभार्थाची 100 टक्के आधार जोडणी केली आहे. 100 टक्के आधार जोडणी करणारा यवतमाळ हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

सर्व योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासकीय योजनांची जत्रा: सर्व सामान्यांच्या विकासाची यात्रा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिल ते 15 जून यादरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत असून आपल्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या योजनांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्य किमान 75 हजार लाभार्थ्यांना आपण एकाच वेळी विविध योजनांचा लाभ देणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

माजी सैनिकांच्या कल्याणार्थ ध्वजदिन निधी संकलन करण्याचे उदिष्ट जिल्ह्याने 100 टक्के पुर्ण केले यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह पालकमंत्री यांच्याहस्ते जिल्हाधिकारी तसेच प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सविता चौधर यांना प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची यशोगाथा या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास मुंडे, विजया पंधरे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक परिवहन विभाग प्रमोद जिड्डेवार, पालीस हेडकॉन्स्टेबल निलेश दायमा, पोलीस चालक नरेश राऊत तसेच आदर्श तलाठी गणेश तेलेवार, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धा परितोषिक अंतर्गत तलाठी श्रीमती दिपाली आंबेकर यांना महाराष्ट्र शासनाचा तृतिय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळव्याध या आजाराच्या सर्वाधिक शल्यकर्म चिकित्सा करण्याचे विक्रमी कार्य केलेल्या डॉ. अंजली गवार्ले यांची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. यासाठी त्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण, जिल्हा आर्थिक विकास महामंडळातर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त टी डी आर एफ द्वारा नागरी सुरक्षेसाठी रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफ ला दि. ९ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफ वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वणी कंपनी (शाखा) च्या जवानांकडून TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा, गॅस सुरक्षा तसेच विविध आपत्तीच्या व्यवस्थापनाविषयी जनजागृती रॅली व गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दि. १ मे ते ९ मे या कालावधीत संपूर्ण राज्यात TDRF वर्धापन दिन महोत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.या मध्ये प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई, विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  सकाळी रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सुरुवात गव्हर्मेंट हायस्कूल येथून झाली त्यानंतर ही रॅली शहरातील टीळक चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी व डॉ आंबेडकर चौक या प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा, गॅस सुरक्षा व विविध आपत्ती व्यवस्थापन संदर्भात नारे देऊन जनजागृती केली. एवढेच नाही तर गांधी चौक, टीळक चौक व डॉ आंबेडकर चौक या तीनही चौकांमध्ये टीडीआरएफ जवानांकडून रस्ते सुरक्षा या विषयावर पथनाट्यही करण्यात आले.
या पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना वाहन चालवीत असताना हेल्मेटची आवश्यकता तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे व इतरांनाही करायला लावणे तसेच प्रथमोपचार विषयाचे ज्ञान सर्वांना असणे का आवश्यक आहे घरातील गॅस संबंधित घ्यावयाची काळजी याविषयी पथनाट्यद्वारे प्रकाश टाकण्यात आला. या पथनाट्यप्रसंगी वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक संजय आत्राम व पोलीस स्टेशन वणी चे शेखर वांढरे व ज्ञानेश्वर आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.सदर रॅली व पथनाट्याचे पोलीस विभाग व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. 
सदर रॅली व पथनाट्यासाठी टी.डी.आर.एफ. मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, वणी कंपनी कमांडर गणेश बुरांडे, किरण चव्हाण, अस्मिता वाळके, काजळ वाळके,रोहिणी लेनगुले, बिंदिया उईके, सुमित जुमनाके, पृथ्वी पेंदोर, शिवम आवारी, रेखा उलमाले, गणेश सोनटक्के, प्राची डोंगे, संकेत काळे, वितेश वंजारी, लक्ष्मीकांत गाडगे, ईशा जुनगरी, अनुष्का नक्षीने, वैभव मडावी, संकेत काळे, आरती चव्हाण, स्नेह कौरसे, समीक्षा पाटील, त्रीशरणा दुपारे, प्रगती बढे इत्यादी टीडीआरएफ अधिकारी व जवानांनी परिश्रम घेतले.
सदरील रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे, प्रा.डॉ.गजानन आघलते उपस्थित होते.


एस. पी.एम.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर उपमुख्याध्यापक मा.श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय प्रार्थना राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले.

तो लढला अन् जिंकूनही आला; अनेकांनी केलं अविनाश लांबट यांचं तोंडभरुन कौतुक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वणी मतदार संघातील बाजार समितीचे निकाल समोर आल्यानंतर ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्याचं दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मारेगाव तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटक संघाकडे. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय सरपंच परिषद चे तालुका अध्यक्ष यांच्या राजकीय कौशल्य पणाला लागलं होतं. एकीकडे सर्वच जन अविनाश लांबट याच्याविरोधात गेले होते. पण या पठ्ठ्याने हार मानली नाही.

मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निकालानं अविनाश लांबट यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. या निवडणुकीत भाजपा समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनेलचे ते एकटेच विजयी झाले आहे. या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनेलनं १७, तर शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या एका उमेदवाराचा म्हणजेच अविनाश लांबट हे एकमेव या निवडून आले आहे. या निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर सर्वच स्तरातून अविनाश लांबट यांचे कौतुक होत आहे. तो लढला आणि जिंकूनही आला. ३५ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापिढीसमोर एक आदर्श घालून दिला आहे. जेव्हा रक्तातच जिंकण्याची धमक असते तेव्हा हरवण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करुन देणे आवश्यक असते. असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

तसेच एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व अविनाश लांबट यांनी स्व. आईबाबांचे स्वप्न पूर्ण करत मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर एकटा जिंकून आल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... अशा शब्दात अनेकांनी यावेळी यांचे कौतुक केले आहे.


आईंची आठवण मनात दाटून येतेय...

विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, मारेगाव आणि परिसराच्या विकासासाठी तथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी आपण कटीबद्ध आहोत, असं अविनाश भाऊ लांबट यांनी विजयानंतर म्हटलं आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आईंची आठवण मनात दाटून येत आहे. आईनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय सरपंच परिषद चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला.

मारेगाव तालुक्यातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, तालुक्यातील शेतकरी बांधव तथा हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे असंही अविनाश लांबट म्हणाले.