मानवी जीवनमान उंचवण्यासाठी व जीवन अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे - प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दि.२६/४/२०२३ जीवनाच्या प्रवासात अनेक आपत्ती उद्भभवत असतात .काही नैसर्गिक तर काही कृत्रीम असतात.त्या आपत्तीला न घाबरता मानवी जीवन उंचवण्याची व जीवन अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी समाजशास्त्र विभाग व रा.से.यो.विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. 7/04/2023 ते दि.24/04/2023 पर्यंत घेण्यात आला.यात विद्यार्थ्याना नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मितआपत्ती, मानसीक आपत्ती अशा विविधआपत्तीची ओळख या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. आपत्ती आली असता आपत्ती ला कसे समोर जावे आणि त्यावेळी काय करावं या विषयावर मार्गदर्शन करणात आले तर ऑनलाईन च्या माध्यमातून NDRF चे इन्स्पेक्टर नीलेशजी जाधव, इन्स्पेक्टर ईश्वर जी मते यांनी विद्यार्थ्यांना फ्लड रेस्कु, सायक्लोन, भूकंप, आग लागली असता कसा बचाव करावा, अशा अनेक विषयांवर माहिती देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यानंतर श्रीमती साळुंका बाई राऊत कला वाणिज्य महाविद्यालय वानोजा येथील रसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बापूराव डोंगरे यांनी अपघात ग्रस्त स्तीती मध्ये काय करावं कोणत्या प्रकारे विक्टिम ची काळजी घ्यावी या विषयावर सविस्तर माहिती दिली. श्रीमती साळुंका बाई राऊत कला वाणिज्य महाविद्यालय वणोजा तेथील रासेयों चा स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचा स्वयंसेवक आदित्य इंगोले ज्याने अनेक वन्यप्राण्यांना संकटात मदत करुन जीवनदान दिले, अपघात ग्रस्तांना मदत करुन त्यांचे जीव वाचविले अशा विद्यार्थ्याने आपत्ती व्यवस्थापन करीत असताना कोणत्या बाबीची काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले कुणाचा जीव वाचविला की मिळणारा आनंद हा अनमोल असतो असा प्रेरणादायी संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला.     
या एकदंर 18 दिवस चाललेल्या अभ्यास क्रमाचा समारोप आज मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला .सुरवातीला समाजशास्त्र विभाग प्रमुख , रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समन्वयीका डॉ.निलीमा दवणे यांनी प्रास्ताविकेतून आपत्ती व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सामाजीक जीवनात किती महत्वाचा आहे याबाबत सखोल माहीती दिली. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे काय फायदा झाला या विषयांवर कु. अस्मिता वाळके, कू. वैष्णवी निखाडे, कू. अनुष्का नक्षीने आणि गौरव नायनवार यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कू. संजीवनी भोयर आणि आभारप्रदर्शन कू. वैष्णवी निखाडे या विद्यार्थिनीनी केले सदर अभ्यास क्रमात कला, वाणिज्य, विज्ञान सर्व शाखेतील एकुण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मारेगाव न्यायालयात घडले आठ वर्षानंतर "त्या" दोघांचे मनोमिलन...!!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : न्यायालय म्हटले की पक्षकारांची धाकधूक. मोठ्याने पुकारे,शिस्तीचे करडे वातावरण अन् धीरगंभीर कामकाजाची पद्धत हे सर्व ठरलेले असते.

मात्र, मारेगाव न्यायालयात आज आगळे वेगळे मनोमिलन घडले. विभक्त राहणारे पती पत्नी यांचा एकमेकांविरुद्ध येथील न्यायालयात अनेक महिन्यापासून खटला सुरू होता.आज कोर्टात लोकन्यायालयचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये न्यायाधिश निलेश वासाडे यांनी मौजा मांगरुळ येथील उज्वला व गोपाल ठाकरे या दोघां पतीपत्नीची समजूत काढली. न्यायालयात एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा आपसी वैरभाव विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरवात करण्याचा मौलिक सल्ला दिला.

मन परिवर्तन घडलेल्या या विभक्त दांपत्याने पुन्हा एकदा संसार जोडला. दोघांना पुष्पहार घालण्यात आले. यावेळी न्यायाधिश निलेश वासाडे अ‍ॅड. हरिदास पावडे, अ‍ॅड.परवेज पठाण, पोलीस उपनरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे यांनी दांपत्यास आशीर्वाद दिले.

या लोकन्यायालात दाखलपूर्व व दाखल केसेस पैकी २३० केसेस चा निपटारा करण्यात आला. यात विविध केसेस मध्ये १२,२०,७७९/- आपसी तडजोडीत वसूल करण्यात आले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय बाळगावे-ब्रिगेडियर शंतनू मयंकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय बाळगावे, शिस्त,श्रम, प्रामाणिकता यांसह शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढवून प्रत्येकाने देशसेवा केली पाहिजे.भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत," असे प्रतिपादन ब्रिगेडियर शंतनू मयंकर यांनी वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात केले.

आज ब्रिगेडियर शंतनू मयंकर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या युनिटला भेट दिली.यावेळी छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, " ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाषिक न्यूनगंड बाळगू नये, आपल्या बोलीभाषेत पूर्ण आत्मविश्वासाने समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद साधावा,आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण असण्यासाठी प्रयत्न करावे."
यावेळी कर्नल व्यंकट रत्नाम, सुभेदार मेजर रोहितास कुमार, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.मानसकुमार गुप्ता, राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी अधिकारी डॉ. रवींद्र मत्ते, हवालदार पांडुरंग झोडे , राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा.किशन घोगरे हे मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अमरावती येथील आर.डी.सी.कॅम्पमध्ये निवड झाल्याबद्दल कोमल जांभुळकर हिचा आणि राष्ट्रीय छात्र सेनेची द्वितीय वर्षाची परीक्षा ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल वैष्णवी रामटेके हिचा ब्रिगेडियर शंतनू मयंकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन, प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा.किशन घोगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गुलशन कुथे, प्रा.मनोज जंत्रे, दिनकर उरकुंडे,पंकज सोनटक्के, कार्तिक देशपांडे, संजय बिलोरिया,भदुसिंग वडते, गणेश लोणारे यांनी परिश्रम घेतले.

APMC Election Result 2023 : मारेगाव बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार वामनराव कासावारांनी राखला गड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागा पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाने एक खाते उघडले.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली गाव पातळीवरील प्रत्यक्षात शेतकरी सहभागी असणारी निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावमध्ये सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली असून आमदार वामनराव कासावारांनी आपला गड पुन्हा राखला आहे.

मारेगाव शेतकरी एकता पॅनलने जिंकल्या सतरा जागा : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एक तर्फी वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मारेगाव शेतकरी एकता पॅनलने १७ जागा जिंकून बाजार समितीवर सत्ता आणली आहे. यामध्ये विरोधक असणाऱ्या शेतकरी परिवर्तन पॅनलला एक जागा मिळवता आली. त्यांचा दारून पराभव झाला आहे.

काँग्रेस पुरस्कृत शेतकरी एकता पॅनल चे विजयी उमेदवार :

गौरी शंकर खुराणा, अरुणाताई खंडाळकर, वसंत आसूटकर, गणू थेरे, यादव काळे, जीवन काळे, काशिनाथ खडसे, ब्रम्हदेव जुनगरी, सुनीता मस्की, संतोष मडावी, रमण डोये, प्रफुल विखणकर, विजय अवताडे, महादेव सारवे, देविदास बोबडे, भास्कर धांडे यांचा समावेश आहे.



अज्ञातांनी पेटवली माजी नगरसेवकाची गाडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक यांच्या घरा समोर उभे असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहणाला अज्ञात इसमांनी ज्वलनशील पदार्थ झोकून पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे 2.30 वा.च्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

माजी नगरसेवक तथा चापली रिपवाटिकेचे संचालक राजू तुराणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीवरून घरी दहा वाजता परतले, त्यांनी आपली महिंद्रा बेलोरो (एम एच 31 सी एस 7900) हे वाहन घरा समोर उभे केली होती. दरम्यान कालपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरु असल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानी गाडी च्या काचा फोडल्या व ज्वलंनशील पदार्थ झोकून बेलोरा गाडीला पेटवून दिले. दरम्यान, वाहनाच्या काचा फुटत असल्याचा आवाज त्यांना गेला, परंतु पाऊस सुरु असल्यामुळे त्यांना विजेचा आवाज असावा म्हणून दुर्लक्ष केले. मात्र धूर उडल्याने व काचेचा आवाज जोराने घुमल्याने आजूबाजूला वास्तव्यास राहणारे लोकं जागी झाले. तेव्हा गाडी पेटत असल्याचे निदर्शनास आले. अशातच घरची मंडळी उठली, आजूबाजूला असणाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेत गाडी विझवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला. व अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवाण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.

शहरातील भरवस्तीत घडलेल्या या जाळपोळीच्या घटनेने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दहशत माजविणारे हे राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला जात असून अशी खमंग चर्चा शहरात आहे.