मारेगाव न्यायालयात घडले आठ वर्षानंतर "त्या" दोघांचे मनोमिलन...!!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : न्यायालय म्हटले की पक्षकारांची धाकधूक. मोठ्याने पुकारे,शिस्तीचे करडे वातावरण अन् धीरगंभीर कामकाजाची पद्धत हे सर्व ठरलेले असते.

मात्र, मारेगाव न्यायालयात आज आगळे वेगळे मनोमिलन घडले. विभक्त राहणारे पती पत्नी यांचा एकमेकांविरुद्ध येथील न्यायालयात अनेक महिन्यापासून खटला सुरू होता.आज कोर्टात लोकन्यायालयचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये न्यायाधिश निलेश वासाडे यांनी मौजा मांगरुळ येथील उज्वला व गोपाल ठाकरे या दोघां पतीपत्नीची समजूत काढली. न्यायालयात एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा आपसी वैरभाव विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरवात करण्याचा मौलिक सल्ला दिला.

मन परिवर्तन घडलेल्या या विभक्त दांपत्याने पुन्हा एकदा संसार जोडला. दोघांना पुष्पहार घालण्यात आले. यावेळी न्यायाधिश निलेश वासाडे अ‍ॅड. हरिदास पावडे, अ‍ॅड.परवेज पठाण, पोलीस उपनरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे यांनी दांपत्यास आशीर्वाद दिले.

या लोकन्यायालात दाखलपूर्व व दाखल केसेस पैकी २३० केसेस चा निपटारा करण्यात आला. यात विविध केसेस मध्ये १२,२०,७७९/- आपसी तडजोडीत वसूल करण्यात आले.