विलास जुमनाके यांना आदर्श सरपंच सम्राट पुरस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : तालुक्यातील पढा-पिपंळापूर-गणेशपूर या गट ग्रामपंचायतचे सरपंच श्री विलास भगवानराव जुमनाके यांना आदर्श युवा सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वात कमी वयात सरपंच होऊन गावात केलेल्या विविध कामांची दखल घेऊन 'आदर्श युवा सरपंच' हा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले आहे.

त्याबदद्दल उपसरपंच कांचन गेडाम, संदिप पवार, सुचिता पवार, जयश्री मोहिते, उमेश खिरटकर, प्रांजली बुराण, चंद्रभान मडावी, सरिता परचाके, ग्राम. सदस्य,सचिन काळे, ग्राम.पं,कर्मचारी, उमेश गेडाम, ग्रामस्थांसह तालुक्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होईल. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनच्या माध्यमातून क्षयरोग निदानासाठी वापर करण्यात येणार आहे. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आता ग्रा. पं. सदस्य, सरपंच, अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरता येतील.

या जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. नामनिर्देशन पत्राअभावी निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू नये म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास काही कालावधी मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.


खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता गुणवत्ता क्र. ६ वरील उमेदवाराची निवड करण्यात आली. या पदाकरीता सहयोगी प्राध्यापक पदावरील तीन वर्षाचा अनुभव अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली होती. या पदाचे वेतन विचारात घेता सध्याच्या नॉन-क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा अधिक होत असले तरी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना या खुल्या गटातील महिला आरक्षित पदावर निवड होऊन त्याचा लाभ होत होता.

हा लाभ सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना होणे आवश्यक असल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार आता खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आले असून शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार आहे. सन २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा यामाध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही उपस्थित होते.

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणे वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होईल.

वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा स्वतंत्र रिव्हॉल्विंग फंड देखील स्थापन करण्यात येईल. चालू वर्षासाठी या करिता १०० कोटी रुपये इतका निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल.

या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर व शुल्कांतून सूट देण्यात येईल. कृषी वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन नाममात्र एक रुपया वार्षिक भाडे पट्ट्याने देण्यास, यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीचे नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किंमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्षी १ लाख २५ हजार प्रति हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल, त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता -पालकमंत्री मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन व शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, विद्युत उपकार्य अभियंता श्री. येरगुडे, सरपंच विकी लाडसे, अनिल डोंगरे, माजी सैनिक मनोज ठेंगणे, शोभा पिदुरकर, प्रदीप गंधारे, सागर गोविंदवार,अनुताई ठेंगणे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पडोली चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या चौकात अपघात झाले असून यात दोघांना जीव गमवावा लागला. या दृष्टीने माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी उपोषण देखील केले. याची दखल घेत या मतदार संघाचा आमदार नसतानाही निधी कुठून उपलब्ध करून द्यायचा? याबाबत अभ्यास केला व 2016-17 मधील कायद्यान्वये सुरक्षा निधीतून 5 कोटी 21 लक्ष रुपये या चौकातील सुरक्षा उपाययोजनासह विद्युतीकरण करण्यासाठी मंजूर करून दिले. या कामाचे भूमिपूजन करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. प्रस्तावित सर्व कामे गतीने व वेगाने व्हावे, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.

रोड सेफ्टी मेजर्स, सिग्नल इन्स्टॉलेशन, रोड डिव्हायडर व फुल लाईट सिग्नल आदी उपाययोजनेसह जिल्ह्यात कुठेही नाही, असे काम येथे करावे. या चौकाचे सौंदर्यीकरण करून सीसीटीव्ही सिस्टीम, सौंदर्यीकरण व आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासाठी योग्य नियोजन करा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघातात दोष कोणाचा हे शोधणे सोयीस्कर होईल. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी लखमापूर हनुमान मंदिरासाठी 60 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून पडोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.

पडोली येथील चौकात झालेल्या अपघातात मुलगा गमाविलेल्या वीर बहादुर सिंग आणि रोशनी सिंग या दाम्पत्याचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. तसेच येथील चौकाच्या उपाययोजनेकरीता उपोषण करणारे माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचा त्यांनी सत्कार केला.

शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण

आरो मशीनच्या माध्यमातून पडोली वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पडोली ग्रामपंचायतीने मागणी केली होती. या गावातील नागरिकांना आरो मशीनच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी अल्पदरात उपलब्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले