अर्थशास्त्र परिषदेतील चिंतन शासकीय धोरणासाठी आधारभूत ठरेल - आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

 वणी : "वणी सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या वणी नगरीत संपन्न होत असलेले अर्थशास्त्र परिषदेचे अधिवेशन हा अभिमानाचा विषय आहे. विविध सत्राचे विषय दैनंदिन आणि जनोपयोगी आहेत. यातून घडणाऱ्या चिंतनाचा अहवाल शासनाची ध्येयधोरणे ठरविताना मार्गदर्शक आधार ठरेल" असा विश्वास वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित ४६ व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटक म्हणून ते व्यक्त होत होते.
       
याप्रसंगी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा, परिषदेचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्यासह, रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, श्रीनिवास खांदेवाले, डॉ.राजेंद्र भांडवलकर, डॉ.निवृत्ती पिस्तूलकर, डॉ.विठ्ठल घिनमिने, डॉ.संजय कोठारी, डॉ विनोद गावंडे, डॉ संतोष कुथे ,प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा स्थानिक सचिव डॉ.करमसिंग राजपूत उपस्थित होते.
      
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना डॉ. करमसिंग राजपूत यांनी परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले तर संजय कोठारी यांनी परिषदेतील विविध कार्यक्रमांचा उल्लेख करीत परिषदेची ध्येयधोरणे विशद केली.

प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयात उपलब्ध शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांची माहिती देत सर्वांचे स्वागत केले.याप्रसंगी अर्थमीमांसा या विशेषांकासह, ई जर्नल आणि डॉ. राजपूत यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या दोन ग्रंथांचे विमोचन करण्यात आले.
       
डॉ. निवृत्ती पिस्तूलकर, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी देखील प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनायक देशपांडे यांनी विज्ञान विषयाच्या विकासासाठी होणारे प्रयत्न आणि आर्थिक सहभाग या तुलनेत मानव्य विद्या शाखेला मिळणाऱ्या डाव्या वागणूकी बाबत खंत व्यक्त करीत आर्थिक गुंतवणुकीप्रमाणे गुणवत्ता गुंतवणुक देखील अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
       
आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणात परिषदेचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव आणि आधुनिक ग्रामविकासाची दिशा " या आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, शिक्षण, बँकिंग सेवा ,आरोग्य सुविधा ,जनधन खाते, ग्राम सडक योजना, महिला सक्षमीकरण आदर्श ग्राम योजना अशा अनेक योजनांचा आढावा घेत ग्रामविकासात विद्यापीठाची अनिवार्य असलेली भूमिका अधोरेखित करत विद्यापीठ त्यासाठी करीत असलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
       
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या हस्ते अर्थशास्त्र परिषदेच्या सर्व भूतपूर्व अध्यक्षांचा देखील सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारोपाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा यांनी डॉलरच्या अवमूल्यनाचे चिंतन करीत त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यावर भर दिला.
     
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले. परिषदेत संपूर्ण विदर्भातून विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सुमारे १२५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

मुख्य बाजारपेठेतील बंद असलेले मुत्रीघर पूर्ववत करा - युवासेनेचे मागणी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात मागील ४० ते ५० वर्षा अगोदर सुरू असलेले पुरुष मुत्रीघर गेल्या एक ते दीड महिनाभरापासून कोणतीही जाहिरात न काढता नगर परिषदेकडून बंद करण्यात आले आहे.
ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना केली. 

येथील नगर परिषदेकडून या मुत्रीघरासमोर कुलूप लावून आरोग्य विभागाच्या मागे असलेले नगर परिषदेचे मुत्रीघर वापरण्यात यावे, असे बोर्ड लावण्यात आले आहे. परंतु हे मुत्रीघर मुख्य बाजारपेठेपासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग आपले दुकान सोडून तितक्या दूर जाऊ शकत नाही. शिवाय हे मुत्रीघर अनेक वर्षापासून याच ठिकाणी सुरू होते, बाहेरगावाहून शहरात येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे बंद असलेल्या मुत्रीघराचे दुर्गंधी येत असल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु इतक्या वर्षांपासून नाही मग आताच ही दुर्गंधी येत आहे काय? जर दुर्गंधी येत असेल तर ते स्वच्छ करण्याचे काम हे नगर परिषदेचे आहे. अशी थेट तक्रार करण्यात आली आहे. 

सदर ठिकाणी एक पाण्याची टाकी लावण्यात यावी, ही जनतेची मागणी आहे त्यामुळे या मागणीला मान देऊन येथील मुत्रीघर पूर्ववत करण्यात यावी याआठी अजिंक्य शेंडे, बबन केळकर, रविंद्र चिडे, सचिन जुनगरे, कमलेश खडसे, सुरज जाधव, गणेश आत्राम, संदिप गेडाम, भरत कुळसंगे, धृत येरणे, महेश चौधरी, रोहित बोबडे, अमोल धानोरकर, निखिल बोबडे, रमेश मेश्राम, राजु वाघमारे, किशोर ठाकरे, त्रिलोक डोहे, निखिल गट्टेवार यांच्यासह युवा सैनिक यांनी केली.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात धीरज लिंगाडे सर्वाधिक मते मिळवून विजयी

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री. लिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा, मुलगा सोहम आणि वेदांत उपस्थित होते.
निवडणूकीत झालेल्या 1 लाख 2 हजार 587 मतदानापैकी 93 हजार 852 एवढी मते वैध व 8 हजार 735 मते अवैध ठरली. अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांचे फेरअवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली. यापैकी 348 मते वैध मानण्यात आली. त्यानुसार एकूण वैध मते 94 हजार 200 ही संख्या निश्चित होऊन 8 हजार 387 मते अवैध ठरली. विजयासाठी 47 हजार 101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेत श्री. लिंगाडे यांना सर्वाधिक 43 हजार 517 मते मिळाली. डॉ. पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली. अनिल ओंकार अमलकार (4 हजार 188), डॉ. गौरव आर. गवई (241), अनिल वकटूजी ठवरे (26), अनंतराव राघवजी चौधरी (79), अरुण रामराव सरनाईक (1 हजार 542), ॲड. आनंद रवींद्र राठोड (383), धनराज किसनराव शेंडे (23), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (69), निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), पाटील उपेंद्र बाबाराव (66), पाटील झांबरे शरद प्रभाकर (421), प्रजापती श्याम जनमोहन (208), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1 हजार 695), प्रवीण दिगांबर बोंद्रे (45), भारती दाभाडे (216), माधुरी अरुणराव डाहारे (93), रणवीर संदेश गौतमराव (43), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), विकेश गोकुलराव गवाले (51), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), संदीप बाबुलाल मेश्राम (70) प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेनंतरही कोटा पूर्ण होत नसल्याने बाद फेरी सुरू होऊन त्या फे-यांत सर्वात कमी मते मिळाल्याने बाद होणा-या उमेदवारांची दुस-या पसंतीक्रमाच्या मतांची गणना झाली.

या गणनेदरम्यान निलेश दिपकपंत पवार (राजे), लक्ष्मीकांत नारायण तडसे, धनराज किसनराव शेंडे, सुहास विठ्ठलराव ठाकरे, अनिल वकटुजी ठवरे, रणवीर संदेश गौतमराव, प्रविण डिगांबर बोंद्रे, विकेश गोकुलराव गवाले, पाटील उपेंद्र बाबाराव, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, संदीप बाबुलाल मेश्राम, अनंतराव राघवजी चौधरी, माधुरी अरुणराव डाहारे, प्रजापती श्याम जगमोहन, डॉ. गौरव आर गवई, श्रीमती भारती ख. दाभाडे, ॲड. आनंद रविंद्र राठोड, शरद प्रभाकर झांबरे पाटील, अरूण सरनाईक, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी, अनिल ओंकार अमलकार हे उमेदवार त्यांच्या कमी मतसंख्येनुसार क्रमाक्रमाने बाद ठरविण्यात आले.

त्यानंतर उर्वरित दोन उमेदवारामध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक 46 हजार 344 मते श्री. लिंगाडे यांना व दुस-या क्रमांकाची 42 हजार 962 मते डॉ. पाटील यांना मिळाली. त्यानुसार श्री. लिंगाडे यांना 3 हजार 382 ही अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणीला बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे काल दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू झाली. तब्बल 34 तास ही प्रक्रिया चालली. निवडणुकीत 265 टपाली मतपत्रिकांपैकी प्रतिज्ञापत्र नसणे, सही, साक्षांकन, सीलबंद पाकिटात नसणे आदींमुळे 73 मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.

अन्य उमेदवारांची मते खालीलप्रमाणे -
निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), धनराज किसनराव शेंडे (23), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), अनिल वकटूजी ठवरे (26), रणवीर संदेश गौतमराव (44), प्रवीण दिगांबर बोंद्रे (46), विकेश गोकुलराव गवाले (52), पाटील उपेंद्र बाबाराव (70), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (73), संदीप बाबुलाल मेश्राम (76), अनंतराव राघवजी चौधरी (80), माधुरी अरुणराव डाहारे (108), प्रजापती श्याम जनमोहन (212), डॉ. गौरव आर. गवई (246), भारती ख दाभाडे (252), ॲड. आनंद रवींद्र राठोड (402), पाटील झांबरे शरद प्रभाकर (462), अरुण रामराव सरनाईक (1596), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1774), अनिल ओंकार अमलकार (4338).

 मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी एस. सी. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन व अधिकारी- कर्मचा-यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


लोकं खरच अशी काही भानगड आहे का? म्हणून बघण्यासाठी येतात व परत जातात - अ‍ॅड. देविदास काळे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
वणी : सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. मात्र, या पतसंस्थेत गैरप्रकार झाल्याचा नुकताच आरोप-प्रत्यारोप झाला. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने ठेवीदारांनी मुदतपूर्व ठेवी उचल करण्याकरिता ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे.

पतसंस्थेत वणी तालुक्यासह यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों नागरिकांच्या कोटींनी ठेवी ठेवल्या आहे. तसेच दैनंदिन अल्पबचत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही दिवसापासून पतसंस्थेतून कामावरून कमी केलेल्या वरोरा व वणी येथील अभिकर्ते व कर्मचाऱ्यांनी संस्थे विरुद्ध आरोप केले. तशी पुराव्यानिशी सहकार विभागाकडे तक्रारी दाखल केली अशी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताच ठेवीदारांनी पतसंस्थेच्या शाखांमध्ये धाव घेत आपली ठेवी सुरक्षित हलविण्याकरीता दररोज ठेवीची उचल केला जात आहे. असे वृत्त माध्यमातून समोर येत असतांना...

या सर्व घडामोडी वर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वच शाखेतील ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहे. पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. परंतु ज्यांना वाटते की आपले पैसे काढून घ्यावे तर ते काढू शकतात त्यासाठी आमची टीम तयार आहे. तात्काळ ग्राहकांचे पैसे देत आहे. रोजचा कोट्यावधी चा ट्रांजेक्शन आहे,दररोज पन्नास साठ लोकांची साहजिक पतसंस्थेत गर्दी असते, लोकं खरच अशी काही भानगड आहे का? म्हणून बघण्यासाठी येतात परंतु त्यांना योग्य माहिती देण्यात येत असल्यामुळे ते परत जात आहे.

अ‍ॅड काळे पुढे बोलतांना म्हणाले की, स्वाभाविक आहे की, कुठल्याही ठेवीदारांना आपले पैसे सुरक्षित आहे की, नाही याची चौकशी करतीलच, त्यामुळे ते येतात आणि जातात, घाबरण्याचे काही कारण नाही ग्राहकांनी निसंकोच राहावे. 

मग्रारोहयोची अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक संघटनेचा राज्यव्यापी संप सुरू..

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : मागील 3-4 वर्षांपासून या मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही वाढीव मानधन मिळत नसल्याने दि. 1 फेब्रुवारी 2023 पासून मागील प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून कर्मचाऱ्यांचे जि प यवतमाळ च्या समोर काम बंद आंदोलन सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील दहा ते बारा वर्षांपासून इमाने इतबारे अखंडित मग्रारोहयोची कामे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक करित आहेत. तसेच कोविड -19 अशा महामारीच्या काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता, मग्रारोहयोची अंतर्गत गावामधील प्रत्येक मजुरांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन रोजगार दिलेला आहे. असे असतांना गेल्या तीन चार वर्षांपासून प्रलंबित मागण्या व कोणतेही मानधन वाढ झालेली नाही त्यामुळे मग्रारोहयो संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

या पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील सहभागी झालेल्या संघटनेच्या प्रमुख मागण्या
खालीलप्रमाणे :
१. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबांधमध्ये समायोजन करण्यात यावे.
२. पश्चिम बंगाल राज्याच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.
३. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यनिधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.
४. मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६५ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.

वरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त स्वरूपाच्या असून या काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस लोटला असून आज चौथा दिवस उजाळला आहे. आंदोलन सुरू च आहे तरी देखील शासनस्तरावर कोणतीही दखल किंबहुना जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट दिली नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे आंदोलन असेच पुढे सुरू राहील असे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र- राज्य, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने माहिती देण्यात आली आहे.