सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : "वणी सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या वणी नगरीत संपन्न होत असलेले अर्थशास्त्र परिषदेचे अधिवेशन हा अभिमानाचा विषय आहे. विविध सत्राचे विषय दैनंदिन आणि जनोपयोगी आहेत. यातून घडणाऱ्या चिंतनाचा अहवाल शासनाची ध्येयधोरणे ठरविताना मार्गदर्शक आधार ठरेल" असा विश्वास वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित ४६ व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटक म्हणून ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा, परिषदेचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्यासह, रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, श्रीनिवास खांदेवाले, डॉ.राजेंद्र भांडवलकर, डॉ.निवृत्ती पिस्तूलकर, डॉ.विठ्ठल घिनमिने, डॉ.संजय कोठारी, डॉ विनोद गावंडे, डॉ संतोष कुथे ,प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा स्थानिक सचिव डॉ.करमसिंग राजपूत उपस्थित होते.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना डॉ. करमसिंग राजपूत यांनी परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले तर संजय कोठारी यांनी परिषदेतील विविध कार्यक्रमांचा उल्लेख करीत परिषदेची ध्येयधोरणे विशद केली.
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयात उपलब्ध शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांची माहिती देत सर्वांचे स्वागत केले.याप्रसंगी अर्थमीमांसा या विशेषांकासह, ई जर्नल आणि डॉ. राजपूत यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या दोन ग्रंथांचे विमोचन करण्यात आले.
डॉ. निवृत्ती पिस्तूलकर, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी देखील प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनायक देशपांडे यांनी विज्ञान विषयाच्या विकासासाठी होणारे प्रयत्न आणि आर्थिक सहभाग या तुलनेत मानव्य विद्या शाखेला मिळणाऱ्या डाव्या वागणूकी बाबत खंत व्यक्त करीत आर्थिक गुंतवणुकीप्रमाणे गुणवत्ता गुंतवणुक देखील अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणात परिषदेचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव आणि आधुनिक ग्रामविकासाची दिशा " या आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, शिक्षण, बँकिंग सेवा ,आरोग्य सुविधा ,जनधन खाते, ग्राम सडक योजना, महिला सक्षमीकरण आदर्श ग्राम योजना अशा अनेक योजनांचा आढावा घेत ग्रामविकासात विद्यापीठाची अनिवार्य असलेली भूमिका अधोरेखित करत विद्यापीठ त्यासाठी करीत असलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या हस्ते अर्थशास्त्र परिषदेच्या सर्व भूतपूर्व अध्यक्षांचा देखील सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारोपाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा यांनी डॉलरच्या अवमूल्यनाचे चिंतन करीत त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यावर भर दिला.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले. परिषदेत संपूर्ण विदर्भातून विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सुमारे १२५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.