सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. मात्र, या पतसंस्थेत गैरप्रकार झाल्याचा नुकताच आरोप-प्रत्यारोप झाला. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने ठेवीदारांनी मुदतपूर्व ठेवी उचल करण्याकरिता ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे.
पतसंस्थेत वणी तालुक्यासह यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों नागरिकांच्या कोटींनी ठेवी ठेवल्या आहे. तसेच दैनंदिन अल्पबचत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही दिवसापासून पतसंस्थेतून कामावरून कमी केलेल्या वरोरा व वणी येथील अभिकर्ते व कर्मचाऱ्यांनी संस्थे विरुद्ध आरोप केले. तशी पुराव्यानिशी सहकार विभागाकडे तक्रारी दाखल केली अशी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताच ठेवीदारांनी पतसंस्थेच्या शाखांमध्ये धाव घेत आपली ठेवी सुरक्षित हलविण्याकरीता दररोज ठेवीची उचल केला जात आहे. असे वृत्त माध्यमातून समोर येत असतांना...
या सर्व घडामोडी वर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनी संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वच शाखेतील ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहे. पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. परंतु ज्यांना वाटते की आपले पैसे काढून घ्यावे तर ते काढू शकतात त्यासाठी आमची टीम तयार आहे. तात्काळ ग्राहकांचे पैसे देत आहे. रोजचा कोट्यावधी चा ट्रांजेक्शन आहे,दररोज पन्नास साठ लोकांची साहजिक पतसंस्थेत गर्दी असते, लोकं खरच अशी काही भानगड आहे का? म्हणून बघण्यासाठी येतात परंतु त्यांना योग्य माहिती देण्यात येत असल्यामुळे ते परत जात आहे.
अॅड काळे पुढे बोलतांना म्हणाले की, स्वाभाविक आहे की, कुठल्याही ठेवीदारांना आपले पैसे सुरक्षित आहे की, नाही याची चौकशी करतीलच, त्यामुळे ते येतात आणि जातात, घाबरण्याचे काही कारण नाही ग्राहकांनी निसंकोच राहावे.