डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा, पाच वर्षांची प्रतिक्षा संपली

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा काल झाली असून राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. यासाठी उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने 2017 मध्ये घेतला होता. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये TAIT परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत. मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.

असे आहे वेळापत्रक 
▪️ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
▪️परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
▪️प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
▪️ऑनलाईन परीक्षा तारखा - 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

डिझेल च्या नादात गमावली लाख रुपयाची मोटारसायकल

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अशातच डिझेल आणून देण्याचा बहानाकरून एका भामट्याने कैलास लक्ष्मण जुमनाके (वणी-मारेगाव बजरंगबली मंदिर परिसर) नामक इसमाची मोटारसायकल लांबवल्याचा घटना समोर आली.

काल दि.३० जानेवारी ला एका भामट्याने "तुला स्वस्त दरात ट्रॅक्टरसाठी डिझेल आणून देतो, तू पैसे दे म्हणत दुचाकी आणि सात हजार रुपये घेऊन गेला. मात्र मोटारसायकल भामटा, डिझेल आणि पैसे घेऊन गायब झाला. ही घटना दुपारी 1 वाजता च्या दरम्यान, घडली. माझ्या ओळखीचे खूप सारे जेसीबीवाले आहेत, दुचाकी वाहन धारकांना विश्वासात घेवून तुमी पैसे द्या मी डिझेल आणून देतो म्हणून पोबारा केला आहे. कैलास यांनी बराच वेळ त्याची वाट बघितली परंतु भामटा आलाच नाही, दुचाकी चा शोधही घेतला. मात्र मोटारसायकल कुठेही आढळून आली नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात घेत अखेर मारेगाव पोलीस स्टेशन गाठून या बाबत रीतसर तक्रार दाखल केली.

दुचाकी क्रमांक. एम. एच. 29 एच. बि आर. 8257 होंडा कंपनीची असून भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असता पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे. 

महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे.

यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्या मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ संचलित होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या आशयाखाली "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती" हा विषय निवडला होता. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोककला आणि मंदिर शैलींचा वारसा दाखवण्याचाही यातून प्रयत्न करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ कर्तव्यपथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथा सोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या समूह पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची होती तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते. शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते.
१९७१ पासून महाराष्ट्राला १४ वेळा पारितोषिक

दरवर्षी २६ जानेवारीला नवीदिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत आहे. आतापर्यंत म्हणजे १९७१ पासून ते २०२३ पर्यंत महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. सर्वप्रथम १९८१ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. तर १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर १९८६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारीत चित्ररथास दुसरे पारितोषिक तर १९८८ साली लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारीत चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर १९९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर १९९४ साली हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. १९९५ साली बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.

२००७ मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरे पारितोषिक तर २००९ मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. २०१५ मध्ये "पंढरीची वारी" या चित्ररथास पहिले पारितोषिक तर २०१७ मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे या घोषणेचा शताब्दी महोत्सव तसेच सर्वाजनिक गणेशोत्सव अभियानाची १२५ वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले. २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. तर २०२२ मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले. आणि आता २०२३ मध्ये "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती" या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

यावर्षी प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतही महाराष्ट्राच्या चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे, हे विशेष. व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट या पथकाने हे अप्रतिम सादरीकरण केले होते. सांस्कृतिक संचालनालयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथ या दोन्हीवर खूप मेहनत घेतली होती.

आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक तर ४ वेळा दुसरे पारितोषिक आणि २ वेळा तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंहांचे मानले आभार

१९७० पासून दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्र चित्ररथ सादर करीत आहे. मात्र दरवर्षी काही राज्यांनाच चित्ररथ सादर करण्याची संधी मिळत असल्याने आतापर्यंत ११ वेळा महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली नाही. तशी ती यावर्षीही नाकारण्यात आली होती. मात्र नागपूर अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून महाराष्ट्राला यावर्षी चित्ररथ सादर करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्री. मुनगंटीवार यांनी श्री. सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज दि.३० जाने. रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के,
औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.

भव्य शुभारंभ : न्यू पारस गंधर्व

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : खरं तर आपण सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या सहकार्यातून विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज यांचे कृपेनें दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोज बुधवार पासून "न्यू पारस गंधर्व" फ्लाय ऍश ब्रिक्स अँड सिमेंट पेवर चा शुभारंभ संपन्न होत आहे. हा शुभारंभ आदर्श उपक्रम म्हणून पुढे ठरावा या उदात्त हेतूने येथील कामगारांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. हे विशेष..

आमच्या या नव्याने सुरू होत असलेल्या उद्योगाला आपण माझे सहकारी मित्र तथा स्नेही म्हणून उपस्थित राहाल अशी मी आणि माझ्या सोबत असलेला सहकारी मित्र आपण सर्वांची येण्याची वाट पाहतो आहे.
येत्या बुधवार ला नांदेपेरा रोड रसोया फॅक्टरी च्या समोर वणी येथे दुपारी 1 वाजता पूजन. त्यानंतर लगेचच दु. 2 ते 5 या वेळात स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार या भव्य शुभारंभाला आवर्जून यावे असे, न्यू पारस गंधर्व चे संचालक अविनाशभाऊ लांबट व प्रवीणभाऊ बोथले यांचे तर्फे आग्रहाची विनंती करण्यात येत आहे.