देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते‍ विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई -पुणे एक्सप्रेस वे, तसेच महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल यामुळे महाराष्ट्राला एक गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्त्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहेत. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरिमन पॉईंट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळुरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तात्काळ सुरु करावे असेही श्री. गडकरी म्हणाले.

धुवाधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले बेंबळाचे पाणी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील सिंधी येथील अनिल घुगल, घुलाराम टेकाम या दोन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेंबळा प्रकल्पाचे पाणी कालव्याचे गेट बंद असल्याने कालव्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. ही शेती पाण्याखाली गेली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.            

मागील बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरु असून बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली येवून वाया गेलेले आहेत.
सिंधी येथील शेतकरी घुलाराम टेकाम, अनिल घुगल या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना बेंबळा प्रकल्प यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

आता नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

                                                        File photo 
सह्याद्री चौफेर | न्यूज 

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली. 
बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहे 
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे - तसेच आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आता सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्ह्यात या कारणांमुळे निर्माण होते पूर परिस्थिती

सह्याद्री चौफेर न्यूज 

मराठवाड्यातील गोदावरी सारख्या प्रमुख नदीसह पेनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या नद्या पावसाळ्यात जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापून टाकतात. हमखास पर्जन्याच्या क्षेत्रात नांदेड जिल्हा येत असल्याने अपवाद वगळता बऱ्याच वेळा अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील जवळपास 337 गावे पूरप्रवण क्षेत्रात आहेत. याचबरोबर गोदावरीवर 7 ठिकाणी पूर नियंत्रणासाठीचे ठिकाणे मोडतात.
गोदावरीतील पाणी वाढण्यासाठी हे आहेत प्रवाह

जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरीच्या पात्रातून ढालेगाव बंधारा, माजलगाव धरणातील पाणी सोडल्यास सिंधफना नदीद्वारे ते गोदावरी नदी पात्रात, मुळी बंधारा, दिग्रस बंधारा, दुधा नदीचे पाणी पुर्णा नदीच्या पात्रात, सिद्धेश्वर धरणाचे पाणी पुर्णा नदीच्या पात्राद्वारे एकत्रित गोदावरीच्या पात्रात येऊन मिळते. हे सर्व पाणी वरच्या बाजुला असलेल्या बंधाऱ्यातून सोडण्यात आले तर ते सर्व पाणी एकत्र होत गोदावरी पात्रातून विष्णुपुरी धरणात पोहचते. विष्णुपुरीच्या खालच्या बाजूला गोदावरी पात्रात धर्माबाद जवळ बांभळी बंधारा व पुढे पोचमाड धरणात हे पाणी टप्याटप्याने पोहचत जाते.
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती समजून घेण्यासाठी गोदावरी नदी पात्रातील विविध बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ज्या-ज्या वेळेला मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होतो तेंव्हा स्वाभाविकच गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वाढीस लागते. नाशिक परिसरात जेव्हा जास्त पाऊस होतो तेंव्हा हे पाणी गोदावरी मार्गे जायकवाडीला येऊन मिळते. जायकवाडीचे पाणी सोडल्यानंतर ते सरळ नांदेड मार्गे पुढे पोचमपाड धरणापर्यंत सरकत जाते. पोचमपाड धरण भरल्यावर त्याचा फुगवटा स्वाभाविकच गोदावरीच्या पात्रात निर्माण होतो. तीच स्थिती बाभळी बंधाऱ्याची आहे. बाभळी बंधारा ते विष्णुपुरी प्रकल्प यातील अंतर गोदावरीच्या फुगवट्यामुळे अधिक बाधित होते. एका बाजुला विष्णुपुरीतून सोडलेले पाणी तर दुसऱ्या बाजुला खालचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा झालेला ठहराव अधिक काळजीचा होऊन जातो.
प्रशासनाची ही आहे दक्षता

जिल्ह्यातील या नैसर्गिक स्थितीमुळे प्रशासन नेहमी पूर आणि आपत्कालीन परिस्थितीबाबत वेळोवेळी योग्य ती खबरदारी घेऊन असते. संभाव्य परिस्थितीतून सावरण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे याही वर्षी संपूर्ण आढावा घेऊन सुरक्षिततेचा व्यापक आराखडा तयार केलेला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: लक्ष ठेवून असून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन विभाग 24 तास सुरू करण्यात आला आहे. यासाठी तीन पाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. आजच्या घडिला जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे एक पथक तैनात आहे. जिल्हा प्रशासनाकडे एकुण 11 बोटी आहेत. 8 आसन क्षमता असलेल्या 8 बोटी रबर तर 3 बोटी या एचडीपीईच्या आहेत. प्रत्येक बोट लाईफ जॅकेटसह आवश्यक त्या सुरक्षा साहित्याने परिपूर्ण आहेत. 80 लाईफ जॅकेट, 80 लाईफ बॉय (गोल रिंग), स्वाकटर, टुलकिट, रेस्क्यू रोप आदी साहित्य आहे.
पाच वर्षातील पर्जन्यमान

गत पाच वर्षाच्या पर्जन्यमानामध्ये 2020 वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. एकुण वार्षिक सरासरी 891.30 मिमी एवढी आहे. सन 2017 मध्ये या सरासरीच्या तुलनेत 72 टक्के, सन 2018 मध्ये 87 टक्के, सन 2019 मध्ये 106 टक्के, 2020 मध्ये 103 टक्के तर गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये 138 टक्के एवढा पाऊस झाला. स्वाभाविकच एवढा पाऊस झाल्याने काही भागातील शेतीतील माती वाहून गेली. शासनाने सर्वत्र नदीच्या काठावर असलेल्या गावात, संबंधित ग्रामपंचायतींना, ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आजच्या घडीला पूराचे आव्हान जरी नसले तरी प्रशासन योग्य ती खबरादारी घेऊन आहे.

- विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

लोकमान्य टिळक महाविद्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, द्वारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित व लोकमान्य टिळक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ता. 7 जुलै) रोजी आयोजन करण्यात आले होते.
या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, डॉ.शरद जावळे, संजय देरकर, विद्याताई शितोळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तथा विविध बारा संस्थांचे रोजगार अधिकारी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यामधून प्राप्त होणाऱ्या नोकरीत मेहनत व जिद्दीने ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे. आपले मोठे ध्येय गाठण्यासाठी या छोट्या संधीचे रूपांतर मोठ्या संधीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रोजगार मेळाव्यातील उमेदवारांना केले.
यावेळी पुणे,औरंगाबाद इत्यादी स्थानावरून आलेल्या विविध संस्थांनी सुमारे साडेचारशेच्या वर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, यात 116 उमेदवारांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पावडे यांनी केले.
        जाहिरात साठी संपर्क करा : 9011152179