शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्य मूल्यमापनासाठी समिती

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांचे संचालक डॉ. अभय वाघ या समितीचे अध्यक्ष आहेत.

समितीचे सदस्य सचिव म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, पुण्याचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल आहेत. समितीत अन्य 6 सदस्य आहेत.

समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे:

(१) समिती शिक्षकाच्या वार्षिक कार्यमूल्यमापनाबाबत विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यासारख्या शिखर संस्थांच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या अधिसूचनांचा अभ्यास करून मार्गदर्शक सूचना तयार करेल.

(२) शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यमूल्यमापनाकरिता कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबत शिफारशी करेल.

(३) नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची भूमिका व कार्याचा आढावा घेऊन हा कक्ष अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवेल.

(४) यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.

(५) डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.

समितीने आपला अहवाल शासनास तीन महिन्यांत सादर करावयाचा आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा व निधी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्याच्या आणि खाण्या – पिण्याच्या सवयींबाबत जगात संशोधन सुरू आहे. सद्यस्थितीत रासायनिक व भेसळयुक्त पदार्थ खात असल्यामुळे विविध आजारांना आपणच निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने उगविलेले अन्नधान्य खाण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. याच उद्देशाने सेंद्रीय पध्दतीने शेती करून 3600 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभिनव उपक्रम असून शेतक-यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, या उद्देशाने 3600 शेतकरी सभासदांनी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, शेतक-यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणे, संघटीतरित्या त्यांनी एकत्र येणे आजच्या काळाची गरज आहे. सद्यस्थितीत आपण भेसळयुक्त खात आहोत, शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने तयार केलेला माल स्वत:च विकला तर त्याचा अधिक फायदा शेतक-यांना होईल.
शेती क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत. शेतमालावर आपणच प्रक्रिया केली तर भविष्यात एक मोठे काम उभे राहील. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक मॉल किंवा जागा उपलब्ध करून देऊ. याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. कॅन्सर व इतर रोगांची उत्पत्ती कशी होते हे आपणच लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जाऊन आपला माल विक्री करा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, पाच कंपन्यांच्या निर्मितीने एक चांगली सुरवात केली आहे. बदलत्या जगात मार्केटिंगची पध्दत बदलावी लागेल. केवळ दुकान उघडून बसू नये. तर विक्रीकरीता लोकांच्या दारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
अशा आहेत पाच उत्पादक कंपन्या : या पाचही शेतकरी उत्पादक कंपन्या सावली तालुक्यातील असून यात चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (शेतकरी सभासद 1200), नास शेतकरी उत्पादक कंपनी मर्या (600), व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनी (500), गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी (700) आणि आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनी (600 सभासद) समावेश आहे. या कपंन्यामार्फत सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला काळा, पिवळा व हिरवा तांदूह, मिरची पावडर, धने, हळद पावडर, तीळ, तूप, तूर – चना – मूग डाळ, हरभरा व इतर उत्पादने आहेत. या कपंन्यासाठी नाबार्डचे सहकार्य मिळाले असून स्मार्ट प्रकल्पांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे प्रमुख चेतन रामटेके यांनी केले. संचालन विजय कोरेवार यांनी तर आभार गेवरा शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमुख दिलीप फुलबांधे यांनी केले. कार्यक्रमाला व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमुख राकेश पेटकर, नास कंपनीचे रामवीर सिंग, आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनीचे आशिष पुण्यपवार यांच्यासह राजू सिद्दम, विनायक डांगे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, सावलीच्या तालुका कृषी अधिकारी आश्विनी गोडसे व शेतकरी उपस्थित होते.

जब मिल बैठे तीन यार; खाकी, राजस्व आणि रेती माफिया

कुमार अमोल : सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील होत असलेल्या अवैध रेती तस्करांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केली असून, वाळू तस्करी जोरात सुरू आहे. यामध्ये स्थानिक ठाण्यातील पोलिसांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. यासाठी महसुलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध रेती वाहतुक बंद करण्यासाठी धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील रेतीघाटावरून अवैध रेती वाहतूक अहोरात्र होत असून, शासनाचा महसूल बुडत असल्यामुळें, रेती माफियांनी एकजुट दाखवून पोलिस आणि महसूल विभागांच्या कर्मचाऱ्यांशी ‘सेटींग' केले असून दर दिवसाला मारेगाव शहरासह तालुक्यातील अवैधरित्या जवळपास २०० हायवासह ट्रॅक्टरने रेती येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. महसूल विभाग आणि पोलिस विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू आहे.
कोसारा, आपटी घाटावरून मारेगाव शहरासह कुंभा, मार्डी, वेगाव, इत्यादी ठिकाणी रेती येते. व स्टॉक करून असलेल्या भागातून रात्रभर ट्रॅक्टरसह हायवाच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक केली जातो. त्यामुळे शासनाचा महसूल तस्करांच्या घसात जात आहे. तसेच या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची पूर्ण वाट लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाला दुहेरी तोटा होतो आहे. या अवैध रेती वाहतूकीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून पोलिस, महसूल आणि परीवहन विभागाच्या संयुक्त पथकाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. 
या कारवाईत ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केल्यास रेतीच्या अवैध वाहतूकीवर नजर ठेवता येईल शिवाय या गोरखधंद्यावर आळाही बसेल. तूर्तास होत असलेल्या अवैध वाहतूक वाहनावर दंडाच्या रकमेसह जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. 

उभ्या ट्रकला दुचाकीस्वाराची धडक, पंचमुखी हनुमान मंदिरा समोरील घटना

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर

वणी : नांदेपेरा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरा जवळ उभ्या असलेल्या ट्रक ला वणीवरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 3 जून रोजी घडली. घटनेची वार्ता परिसरात पसरताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

प्राप्त माहिती नुसार वनोजा देवी ते नांदेपेरा मार्गांवर पंचमुखी हनुमान मंदीर आहे. त्या मंदिरासमोर ट्रक क्र (Mh 34BG 4667) हा उभा होता, अशातच वणीवरून अनिल कृष्णाजी लांबट (अंदाजे 53) रा. दांडगाव (ता. मारेगाव) हे प्लॅटिनम कंपनीची मोटार सायकलने वणी वरून बाजार घेवून व आपले काम आटपून गावाकडे निघाले असता, नांदेपेरा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर डाव्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला मागून अनिल लांबट याने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना  4:15 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील उपचारासाठी जखमीला वणी कडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
"विशेष म्हणजे मार्डी नांदेपेरा या मार्गांवर भरधाव जड वाहतूक होत असल्याने मागील आठवड्यात वाघाडा नालाच्या जवळ मच्छिन्द्रा येथील 47 वर्षीय विवाहित तरुणाचा ट्रक च्या धडकेत दुर्दैवी अपघात झाला त्यात तो जागीच ठार झाला होता."

वाढती बेरोजगारीला आळा घालण्यासाठी नवीन उद्योजक निर्मिती ही काळाची गरज - चंद्रकांत रानडे

सह्याद्री | चौफेर न्यूज 

यवतमाळ : स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे महाविद्यालयीन माजी विद्यार्थिनी करिता एक दिवसीय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यशाळेचे आयोजन हे महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यवतमाळ व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे सन्माननीय सचिव श्री चंद्रकांतजी रानडे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महिला उद्योजक यांची भारतीय अर्थव्यवस्थेमधील भूमिका यावर प्रकाश टाकला त्यांनी म्हटलं की स्त्री एक उत्तम उद्योजक बनू शकते आजही प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थापनात स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते.
प्रत्येक स्त्रीला जर योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन योग्य वेळी देण्यात आले तर नक्कीच ती एक नवीन व सुशिक्षित उद्योगाचे ज्ञान असणारी पिढी घडवू शकते.
आपल्या अध्यक्षकिय मनोगतातून श्री रानडे यांनी सध्याच्या काळामध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात उद्योजकांची आवश्यक आहे.

जितके नवीन उद्योग निर्माण होतील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होईल व त्याचा उपयोग अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी केला जाईल.
अश्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीसाठी व नवनवीन उद्योग यांच्या निर्मितीसाठी महाविद्यालय पुढाकार घेत असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यशाळेच्या प्रथम सत्र मध्ये एमसीइडी यवतमाळचे प्रकल्प अधिकारी श्री रुपेश हिरुळकर यांनी मार्गदर्शन केले. 
आपल्या मार्गदर्शनात मध्ये उद्योजक घडवण्यामध्ये एम सी इ डी ची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कशा पद्धतीने वेगवेगळे कार्यशाळेचे आयोजन करून युवकांमध्ये उद्योग निर्मितीबाबत साक्षरता पसरवत आहे नवीन नवीन उद्योजक घडवत आहे याची त्यांनी माहिती उपस्थितांना दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात श्री एच सी गुळमे जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये वेगवेगळे उद्योग व सेवा उद्योग याची माहिती उपस्थितांना करून दिली. आज बदलत्या काळामध्ये लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उद्योगाची उभारणी कशी करावी याबाबत त्यांनी सूचना केल्या.

श्री चंद्रसेन जंजाळ व श्री अशोक कांबळे यांनी विद्यार्थिनींना उद्योग उभारणी साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तते संदर्भात मार्गदर्शन केले व उद्योगासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थिनींनी कडून पुढील प्रक्रियेसाठी फॉर्म भरून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौरभ वगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. ममता दयने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. सरिता देशमुख प्राध्यापक मोनाली सलामे, श्री नितीन वालदे, श्री वैभव चौधरी इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.