वाढती बेरोजगारीला आळा घालण्यासाठी नवीन उद्योजक निर्मिती ही काळाची गरज - चंद्रकांत रानडे

सह्याद्री | चौफेर न्यूज 

यवतमाळ : स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे महाविद्यालयीन माजी विद्यार्थिनी करिता एक दिवसीय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यशाळेचे आयोजन हे महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यवतमाळ व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे सन्माननीय सचिव श्री चंद्रकांतजी रानडे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महिला उद्योजक यांची भारतीय अर्थव्यवस्थेमधील भूमिका यावर प्रकाश टाकला त्यांनी म्हटलं की स्त्री एक उत्तम उद्योजक बनू शकते आजही प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थापनात स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते.
प्रत्येक स्त्रीला जर योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन योग्य वेळी देण्यात आले तर नक्कीच ती एक नवीन व सुशिक्षित उद्योगाचे ज्ञान असणारी पिढी घडवू शकते.
आपल्या अध्यक्षकिय मनोगतातून श्री रानडे यांनी सध्याच्या काळामध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात उद्योजकांची आवश्यक आहे.

जितके नवीन उद्योग निर्माण होतील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होईल व त्याचा उपयोग अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी केला जाईल.
अश्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीसाठी व नवनवीन उद्योग यांच्या निर्मितीसाठी महाविद्यालय पुढाकार घेत असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यशाळेच्या प्रथम सत्र मध्ये एमसीइडी यवतमाळचे प्रकल्प अधिकारी श्री रुपेश हिरुळकर यांनी मार्गदर्शन केले. 
आपल्या मार्गदर्शनात मध्ये उद्योजक घडवण्यामध्ये एम सी इ डी ची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कशा पद्धतीने वेगवेगळे कार्यशाळेचे आयोजन करून युवकांमध्ये उद्योग निर्मितीबाबत साक्षरता पसरवत आहे नवीन नवीन उद्योजक घडवत आहे याची त्यांनी माहिती उपस्थितांना दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात श्री एच सी गुळमे जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये वेगवेगळे उद्योग व सेवा उद्योग याची माहिती उपस्थितांना करून दिली. आज बदलत्या काळामध्ये लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उद्योगाची उभारणी कशी करावी याबाबत त्यांनी सूचना केल्या.

श्री चंद्रसेन जंजाळ व श्री अशोक कांबळे यांनी विद्यार्थिनींना उद्योग उभारणी साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तते संदर्भात मार्गदर्शन केले व उद्योगासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थिनींनी कडून पुढील प्रक्रियेसाठी फॉर्म भरून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौरभ वगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. ममता दयने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. सरिता देशमुख प्राध्यापक मोनाली सलामे, श्री नितीन वालदे, श्री वैभव चौधरी इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.