महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : धडक कामगार युनियन महासंघ आणि दैनिक मुंबई मित्र व वृत्त मित्र यांचे संपादक/संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेता अभिजीत राणे व त्यांच्या समुहाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार संघटना, वृत्तपत्र समुह,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार,यांचा भव्य-दीव्य नागरिक सत्कार गोरेगाव,आरे मुंबई येथे ठेवण्यात आला होता.

त्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुहास राणे (संपादक साप्ताहिक प्रजेचे शिवराज्य, मासिक विर जनसेना, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना, उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी,उपाध्यक्ष) यांनी सामाजिककार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना "महाराष्ट्र मित्र २०२२" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर सन्मानित !


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक काळातील बहिणाबाई सौ. विमलताई माळी, अनगर व सौ . शांताबाई क्षीरसागर जेष्ठ कवियत्री यांना अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित राज्यस्तरीय सर्व शाखीय परिचय मेळावा, अरण येथे सन्मानपत्र, विजयचिन्ह (पारितोषिक) पुष्पगुच्छ अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. रोहिणीताई पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सौ. विमलताई माळी* या शेतकरी कुटुंबातील इ.२ री शिकल्या असून त्यांच्या ६०० पेक्ष्या जास्त कविता तोंडपाठ आहेत. त्यांचा महाराष्ट्रमध्ये अनेक कवी संमेलन सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग असतो. त्यांना शासकीय स्तरावर महिला दिनानिमित्त कवी संमेलनात सहभागी केले जाते. अशा या कवियत्रीच्या कविता शासनाने प्रकाशित करून त्यांचा उचित सन्मान करावा. अशी मागणी लिंगे यांनी केली. सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे बरेच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या त्या सक्रीय सदस्या आहेत . त्यांचाही शासनाने उचित सन्मान करावा. अशी मागणी करून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पुरस्काराच्या मानकरी सौ. विमलताई सिद्राम माळी, सौ. शांताबाई व्यंकटेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. 

मंचकावरील विठ्ठल (आबा) तोडकर (लातूर), संजय इनामदार (सोलापूर), अमर बोराटे (पुणे), विलास माळी (ठाणे) संतोष गायकवाड (सोलापूर), भाऊसाहेब झगडे (सोलापूर), कैलास जामगडे (नागपूर), दादा महाराज वसेकर (सावता महाराज यांचे वंशज), गणेश वसेकर, दामू माळी, पोपट वसेकर, माजी सरपंच विजया वसेकर, शामल गोरे, गौतम क्षिरसागर (उस्मानाबाद), सोपान खारे इ. मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक, अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न



बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथे महाराष्ट्र दिन नुकताच साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन सेवाभावी संस्थेची मागणी


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील इदगाह मैदानावर 'ईद उल फित्र' चा नमाज आदा करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज आदा करताना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

या करिता संपूर्ण ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याची ही मागणी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जन परिवर्तन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी केली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री ना संजयजी बनसोडे यांना निवेदन दिले असता त्यांनी तात्काल उदगीर नगर परिषद प्रशासनास मंडप टाकण्या करिता आदेशित केले.

उज्वला गॅस पुन्हा चालली लाकूड फाट्याच्या शोधात..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : 'स्वच्छ इंधन बेहतर जीवन' असा नारा देऊन केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला.

या योजनेचा उद्देश भारतातील दारिद्र्य देषेखालील सुमारे पाच कोटी महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस देण्याचा होता. जगण्यासाठी अन्न लागते आणि अन्न शिजवण्यासाठी इंधन लागते. सुरुवातीला घरोघरी गॅस पोहोचविण्याचा सरकार यशस्वी झाले. पण आज गोरगरिबांच्या घरांमध्ये एक कोपऱ्यात गॅस पडून आहे. एवढ्या महागाईत महागडा गॅस भरण्यासाठी एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न त्यांना पडला आहे. 
     
ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा घरातून धूर निघताना दिसत आहे. चूल पेटविण्यासाठी उज्वला शेतामध्ये लाकडे आणण्यासाठी फिरत असताना दिसत आहे. एक तर अनेक दिवसांपासून चुलीची असलेली सवय मोडली त्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे अनेक जणींना अवघड जात आहे. भारताला धुर मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले उज्ज्वला योजना ही महिलांची एक प्रकारची अवहेलना करणारी योजना असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षानी यांनी करत केंद्र शासनावर घणाघात केला.

सुरुवातीला सदर योजनेत उज्वला यांना एलपीजी सिलेंडर वर ५० टक्के सबसिडी देऊन एक प्रकारची केंद्र शासणा कडुन दिशाभूल करत आज रोजी सदर एलपीजी सिलेंडर वर ९ रुपये सबसिडी केंद्र शासनाकडून उज्वला यांना देऊन त्यांच्या गरिबीची थट्टा उडवत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.