कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषणात झाली मोठी वाढ, रस्त्यांवरही निर्माण झाले खड्डे, ब्लास्टिंगमुळे घरांना पडले तडे तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात साचू लागले तळे

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील कोळसाखाणींमधून रेल्वे साईडींग व विद्युत निर्मिती केंद्रांना रस्ते मार्गाने होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे धुळीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोळसाखाणींकडे जाणाऱ्या व नव्यानेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यातल्यात्यात काही कोळसाखाणींमधून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याने मागील काही दिवसांत दोन्ही समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. कोळशाची वाहतूक करतांना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने प्रदूषणाची समस्या तर ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या या दोन्ही समस्यांच्या तक्रारी राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांनी वेकोलि मुख्य महाप्रबंधकांपासून तर मंत्र्यांपर्यंत केल्या आहेत. 

कोळसाखाणींमुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोळसाखाणींमधून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण झाले आहे. कोळसाखाणींकडे जाणाऱ्या मार्गांवर नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर पडणाऱ्या कोळशाची भुकटी तयार होऊन ती धूळ बनून सतत उडत असते. या धुळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील जनतेचं जीवनचं काळवंडलं आहे. प्रदूषणाचा दर शंभरी पार झाला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे शासन व प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. राहुटी वस्त्यांलगत वणी येथे दोन रेल्वे साइडिंग आहे. या कोळशाच्या साईडिंगवर शेकडो ट्रक दररोज कोळशाची वाहतूक करित असतात. मालवाहू रेल्वेमध्ये कोळसा भरतांना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. कोळशावर व रस्त्यांवर मुबलक पाणी मारण्याची व्यवस्थापकांकडून जराही तसदी घेतली जात नाही. वणी व राजूर येथे रहिवासी वस्त्यांजवळ कोळशाचे मालधक्के असून हे मालधक्के रहिवासी वस्त्यांपासून दूर नेण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. पण काळ्या कोळशात हात रंगलेल्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष करित नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु ठेवला आहे. या कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांचे जीवनमान खालावले असून त्यांना अनेक जीवघेणे आजार जडले आहेत. प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या कोळसाखाणी आता नागरिकांसाठी शाप ठरू लागल्या आहे. 
कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उकणी कोळसाखाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घोन्सा गावाकडे जाणारा रस्ताही खड्यांनी व्यापला आहे. राजूर फाट्यापासून भांदेवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. प्रमुख रहदारीचे रस्ते असलेल्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कोळसाखाणींमधून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काळ्या कोळशाची काळी माया, कशी जाऊ द्यायची वाया, कोण जाईल या जनतेला सांगाया, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कुणीही या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोळसाखाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंमुळे घरांना तडे पडले आहेत, दगड ढेले उसळून शेतात पडत आहेत, कोळशाच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे, ब्लास्टिंसाठी वापणाऱ्या बारुदच्या वासामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे, कोळसाखाणींमध्ये उत्खनन करून मातीचे गावाभोवती ढिगारे तयार करण्यात आल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे भुस्खननाची भितीही निर्माण झाली आहे. मातीच्या मोठमोठ्या ढिगाऱ्यांमुळे नदीनाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरून पिकांची हानी होऊ लागली आहे. परंतु शहर प्रशासन व वेकोलि प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या सर्व समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविल्या जात असतांनाही यावर समाधानकारक तोडगा निघत नाही. वेकोलिने नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळ चालविला असून कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल साळवे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तर सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बांदूरकर यांनी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

देवटोक येथे शिलापुजन खासदार मा अशोक नेते यांच्या हस्ते

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरील या तीर्थस्थानी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आज शिलापुजन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष परम पूज्य संत मुरलीधर महाराज उपस्तीत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बाध सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा अध्यक्ष अविनास पाल,नगसेवक न.प. सावली सौ निलीमाताई सुरमवार,नगराअध्यक्ष न. प.मुल सौ रत्नमालाताई भोयर, न. प. नगरशेविका सौ शारदाताई गुरनुले सावली, ग्रामपंचायत साखरी सरपंच ईश्वरदास गेडाम, उपसरपंच दादाजी पा. किनेकार, नारायनजी गंदेवार, देवराव सा. मुदमवार,आरोग्य अधिकारी जोगडन सर आरोग्य सेविका पुनवटकर, सा. आ. अ. वृषाली गौ. थुल आणि कु. रामटेके त्याचप्रमाणे इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
 मा खासदार अशोक नेते यांनी दिलेला शब्द पाळला यामुळे या वेळी श्री पुण्यभूमी देवस्थान खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचे आभार मान्यण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमपूज्य संत मुरलीधर महाराज तर संचालन जकुलवार सर, आभार डॉ.पवन कवठे यांनी मानले. यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर ट्रस्ट चे सचिव नरेश जक्कुलवार, गुणाजी ठोंबरे, नामदेव हजारे, सूरज बोम्मावार, भास्कर पोवनवार, राकेश गोलेपल्लीवार, प्रतीक संगीळवार, निलखंठ फाले, कवेशर पुल्लीवार,यांच्या सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

एकाधिकारशाही गाजवणारा तो अधिकारी झाला सेवानिवृत

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : एकाधिकारशाही गाजवणारा तो अधिकारी अखेर सेवानिवृत्त झाला. आपल्या कार्यकाळातील विविध कारामतींमुळे हा अधिकारी नेहमी चर्चेत राहिला. उर्मटपणा व अहंकारी बाणा हा त्याचा स्वभावगुण होता. आक्रमक शैलीचा तो पुरस्कर्ता होता. आक्रमक शैलीमुळे त्याने अनेकांचा रोष ओढवून घेतला. विरोधाभासी प्रवृत्तीमुळे त्याला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याचे कधी कुणाशीच पटले नाही. या अधिकाऱ्याच्या त्रासदायक वागणुकीमुळे कार्यालयीन कर्मचारीही वैतागले होते. कारण कर्मचाऱ्यांशी बोलतांना हा अधिकारी नेहमी शिवराळ भाषा वापरायचा. त्याच्या सेनिवृत्तीसाठी सर्वच आतुर झाले होते. बरं झालं रिटायर झाला, हे एकच वाक्य सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळालं. सेवानिवृत्तीचा काळ जवळ येताच त्याने टक्केवारीही वाढवली. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली. त्याच्या वाढलेल्या टक्क्यांमुळे सेवकांनी निधीची उलाढाल व कंत्राटदारांनी कामेच थांबवून दिली. विकासकामांतही गटबाजी करणारा असा हा अधिकारी होता. तो सेनिवृत्त झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या अधिकाऱ्याने अधिकाराचा वापर करत अनेक कारनामे केले, व अनेक कारनामे पचवलेही. फॅगिंग मशीन व्यवहारात त्याच्या बदलीची मागणी झाली, पण ते प्रकरण त्याने पद्धशीरपणे हाताळलं. मधातल्या काळात चौकशी समित्यांच्या चौकशीलाही त्याला सामोरे जावं लागलं, पण त्याच काहीही वाकडं झालं नाही. कार्यालयात पत्रकारांसाठी त्याने नोटीस लावून पत्रकारांची नाराजी ओढवून घेतली. शासकीय कार्यालयाला स्वतःची जहागीरदारी समजणारा हा अधिकारी कित्येकदा तोंडघशी पडला. पण अकड मात्र गेली नाही. कुणाशीही वाद घालण्यामुळे त्याचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरला. कोरोनाचे कडक निर्बंध असतांना हा अधिकारी कार्यालयात विना माक्स वावरायचा. नियमांचे पालन करण्याऐवजी नियमांना पायदळी तुडविण्याचं काम या अधिकाऱ्याने केलं. कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा पराक्रमही त्याने आपल्या अधिकाराचा वापर करून केला. वाढदिवसाचा भन्नाट सोहळा साजरा केला. कार्यालयाला एक दिवसाची अघोषित रजाच त्याने देऊन टाकली. गेटवर चपराशी तैनात केले. ते फक्त साहेबांच्या वाढदिवसाकरिता आलेल्यानाच आत जाऊ देत होते. साहेबांवर स्तुती सुमनांचा वर्षाव करणारे स्तुती पाठकाचे गोडवे माईकवरून ऐकायला मिळत होते. त्याला नाईलाजास्तव वाजवाव्या लागणाऱ्या टाळ्यांचा गडगडाट होत होता. कार्यालयात वाढदिवस साजरा करणारा हा पराक्रमी अधिकारी संपूर्ण तालुक्यात चर्चेस पात्र ठरला. या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दोन दिवसाआधी पंचायत समिती कार्यालयाला आग लागली. सर्व योजनांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज या आगीत जळून खाक झाले. ही आग कशी लागली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. या आगीबाबत या अधिकाऱ्यानेच संशय व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात असे अवचित प्रकार घडले. या अधिकाऱ्याच्या अशाच प्रतापांमुळे त्याची बढती न होता गळती झाली. त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, व याकाळात तो येथेच स्थिरावला. त्याच्या वागणुकीमुळे तर प्रत्येकाचीच तळपायाची आग मस्तकात जायची. त्याच्या शब्द प्रयोगामुळे कित्येकदा वादही उद्भवले. आता हा अधिकारी कौटम्बिक जिवनात कसा वावरेल व कुटुंबियांना कशी वागणूक देईल, ही चर्चा आता या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर ऐकायला मिळत आहे. या अधिकारयाच्या सेवानिवृती नंतर येथिलच एका अधिकारयांकडे प्रभार देण्यात आला आहे.

देवटोक येथे सामाजिक सभागृहाचे व रस्त्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरील या तीर्थस्थानी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या क्षेत्राचे आमदार, नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 35 लक्ष रुपयाचे सामाजिक सभागृहाचे व रस्त्यासाठी 60 लक्ष रुपयांच्या कामाचे  आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष  परम पूज्य संत मुरलीधर महाराज उपस्तीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  काँग्रेसचे युवा नेते दिनेश चिटनूरवार,तर प्रमुख पाहुणे म्हणून सावलीचा नगराध्यक्षा लता लाकडे, साखरी चे सरपंच गेडाम उपसरपंच दादाजी किन्हेकार, जीबगाव सरपंच पुरुषोत्तम चुधरी, कांग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहणे ,राकेश गड्डमवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिवाकर भांडेकर,पतरु पाटील चुधरी,नप उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार, नगरसेवक विजय मूत्यालवार,प्रफुल वाळके,प्रीतम गेडाम त्याचप्रमाणे इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

 रस्त्यासाठी  60 लक्ष रुपयाचे रस्त्याचे खडीकरण चे भूमिपूजन व सामाजिक सभागृहासाठी 35 लक्ष रुपयांचे भूमिपूजन आज पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिलेला शब्द पाळला यामुळे या वेळी श्री पुण्यभूमी देवस्थान खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचे आभार  मान्यण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमपूज्य संत मुरलीधर महाराज तर संचालन सुरेंद्र उरकुडे, आभार सुनील बोमनवार यांनी मानले.यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर ट्रस्ट चे सचिव नरेश जक्कुलवार,गुणाजी ठोंबरे,नामदेव हजारे,सूरज बोम्मावार, भास्कर पोवनवार,राकेश गोलेपल्लीवार, प्रतीक संगीळवार,निलखंठ फाले,कवेशर पुल्लीवार,यांच्या सह  मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

रेतीचे भरधाव ट्रॅक्टर अंगावर चालविण्याचा प्रयत्न , पाेलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागांव : तालुक्यात काही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती तस्करांनी (वाहन व्दारे) दिवस रात्र अवैध रित्या रेती नेण्याचा सपाटा लावला आहे.

अश्यातच वराेडी मार्गावर उभ्या असणा-या अनिल माराेती अडकीने यांचे वर एका वाहन चालकाने काही कारण नसतांना भरधाव अवैध रेती वाहन नेण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नाही तर त्या चालकाने अडकीने यांस जिवानिशी मारण्याची धमकी सुध्दा दिली.या बाबतीत अनिल अाडकीने यांनी महागांव पाेलिस स्टेशनला दि.२६फेब्रुवारीला रितसर तक्रार दाखल केली आहे. वराेडी येथील रेती घाटाचा अद्याप लिलाव झाला नसुन रेती तस्कर सर्रासपणे दिवसाढवळ्या या ठिकाणाहुन रेती नेत असल्याची जनतेत आेरड आहे.यास गांव पातळीवरील तलाठ्याचा रेती तस्करांना आशीर्वाद असल्याचे खुलेआम बाेलल्या जाते.

महागाव पाेलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचा-यांनी या घटनेतील मुजाेर व हेकेखाेर वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचेवर याेग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अनिल अडकीने यांनी केली आहे .तदवतचं महागांव महसुल प्रशासनाने अश्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना वेळीच याेग्य धडा शिकवावा अशी वराेडी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.